हा महाश्रमण मागधांच्या गिरिव्रज१ (राजगृह) नगरास आला. हा सर्व संजयाच्या शिष्यांना घेऊन गेला आतां हा कोणास नेणार ?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- राजगृह नगरास गिरिव्रज असें ह्मणत असत. हें शहर डोंगराच्या मध्यभागीं वसलें होतें, ह्मणून त्यास हें नांव पडलें असावें.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हें वर्तमान भिक्षूंनीं भगवंतास कळविलें. तेव्हां ते ह्मणाले “भिक्षू हो, लोकप्रवाद कांही फार दिवस टिकायाचा नाहीं. एका आठवड्यांतच हा प्रवाद नाहींसा होईल. जे तुह्मांला ह्या (वर दिलेल्या) श्लोकानें दोष देतील त्यांस तु्ह्मी ह्या श्लोकानें उत्तर द्या.

नयन्ति वे महावीरा सद्धम्मेन तथागता।
धम्मेन नीयमानानं का उस्सुय्या विजानतं।।

महाशूर तथागत लोकांना सद्धर्मानें नेत असतात. ते धर्मानें लोकांना वळवितात, हें जाणणारांनीं त्यांचा मत्सर कां करावा?

पहिल्या गाथेनें लोकांनी भिक्षूंस दोष दिला असतां ह्या गाथेनें भिक्षू त्यांस उत्तर देत असत. धर्मानेंच २शाक्यपुत्रीय श्रमण लोकांस वळवितात, अधर्मानें वळवित नाहींत, हें जेव्हां मनुष्यांस समजलें तेव्हां त्यांनीं भिक्षूंस दोष देणें सोडून दिलें. एक आठवड्यांतच तो लोकप्रवाद नष्ट झाला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(२. बौध संघांतील भिक्षूंस शाक्यपुत्रीय श्रमण ह्मणत असत.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भिक्षुसंघाचा चोहोंकडे बहुमान होऊं लागला. हें पाहून कांहीं उदरंभरी लोकहि त्यांत प्रवेश करूं लागले. एकदा कांही दिवसपर्यंत शहरांत साऱखी भिक्षूंला आमंत्रणें होत होती. लोक सुग्रास अन्न तयार करून भिक्षूंस मोठ्या आदरानें जेवावयास घालीत असत. हें एका ब्राह्मणानें पाहिलें आणि आपणास यथेच्छ भोजन मिळावें या उद्देशानें भिक्षूसंघांत त्यानें प्रवेश केला. जेव्हां हीं आमंत्रणे संपली, तेव्हां भिक्षूंनीं भिक्षापात्र घेऊन आपणाबरोबर भिक्षेस चल, असें त्यासं सांगितलें. त्यावर तो ह्मणाला “जर तुह्मी मला जेवायास घालाल तर मी राहीन, नाहींतर भिक्षूसंघ सोडून चालता होईन.” ह्याच्यासारखे दुसरे कित्येक प्रापंचिक लाभासाठींच संघांत प्रवेश करूं लागले. त्यांच्या बंदोबस्ताकरितां निरिच्छ भिक्षांच्या विनंतीस मान देऊन बुद्ध भगवंताला उपसंपदेचे नवीन नवीन नियम करणें भाग पडलें. हें नियम कोणत्या कोणत्या प्रसंगीं करण्यांत आले, हें सांगण्यास येथं सवड नाहीं. तथापि प्रस्तुत ब्रह्मदेश, सिलोन इत्यादि ठिकाणीं जो उपसंपदाविधि सुरू आहे त्यांत बुद्धांनीं घालून दिलेल्या बहुतेक सर्व नियमांचा समावेश होत असल्यामुळें त्याचा सारांश येथें सांगितल्यावांचून राहवत नाही.

संघांत प्रवेश करूं इच्छिणार्‍या उमेदवारास प्रथमत: एका भिक्षूस आपला उपाध्याय करण्यास सांगतात. भदन्त,(महाराज) तुह्मी माझे उपाध्याय व्हा, असें, त्या भिक्षूस त्रिवार त्यानें विनविलें पाहिजे. उपाध्यायानें उपाध्याय होण्याचें कबूल केल्यावर त्याचें भिक्षापात्र व चीवर(भिक्षुवस्त्र) त्यास दाखनिण्यांत येतें. नंतर ज्या ठिकाणीं जाऊन रहाण्यास त्यास सांगण्यांत येतें तेथें तो राहतो. नंतर भिक्षुसंघापैकीं दुसरा एक विद्वान् भिक्षु पुढें होऊन त्याला त्यानें कायकाय केलें पाहिजे, कोणत्या प्रश्नांचीं काय काय उत्तरें दिलीं पाहिजेत हें नीट समजावून सांगण्यासाठीं परवानगी मागतो. संघाची परवानगी मिळाल्यावर त्याला तो असेल तेथें जाऊन तो भिक्षु सर्व समजावून देतो; व सर्व गोष्टी समजावून दिल्याचें वर्तमान तो पुन; येऊन संघास कळवितो. तेव्हां संघ त्या उमेदवारास पुन; परत येण्यास सांगतो. संघ बसलेला असेल तेथें जाऊन उमेदवारानें संघाची येणें प्रमाणे त्रिवार प्रार्थना केली पाहिजे:- “भदन्त संघापाशीं मी उपसंपदेची याचना करितो. अनुकपा करून संघ माझा उद्धार करो.” नंतर दुसरा एक विद्वान् भिक्षु उपसंपदेला प्रतिबंध करणार्‍या गोष्टींपासून हा नवीन उमेदावार मुक्त आहे किंवा नाहीं हें त्यास विचारण्याची संघाजवळ परवानगी मागतो. ती मिळाल्यावर तो भिक्षु त्याला प्रश्न करितो ते असे:-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel