संघभेद.

बुद्धाचा संघ आणि कीर्ति हीं दोन्ही सारखीं वाढत चाललीं होतीं. त्यावेळीं भद्दिय नांवाचा तरूण शाक्यांच्या राज्याचा अध्यक्ष होता. त्याचा परम मित्र अनुरूद्ध शाक्य याच्या आग्रहानें त्यानें राज्य सोडून भिक्षुसंघांत प्रवेश करण्याचा विचार केला. ह्या दोघांबरोबर आनंद, भगु, किमिल आणि देवदत्त हे चार शाक्यकुमार व त्यांचा न्हावी उपाली यांनी भिक्षुसंघांत प्रवेश केला. उपालील सर्वांत प्रथम उपसंपदा देण्यांत आली. हा पुढें विनयधर ह्मणजे भिक्षुसंघाच्या कायद्यांत प्रवीण झाला; आंनद धर्मधर ह्मणजे बुद्धोपदेशांत प्रवीण झाला; आणि देवदत्त संघभेदक ह्मणजे बौद्धसंघात भेद उत्पन्न करणारा झाला.

बुद्ध भगवान् राजगृहांतील वेळुवनविहारांत राहत असतां देवदत्त त्याजकडे गेला, आणि त्यांना हात जोडून ह्मणाला:- “भगवान् आपण आतां वृद्ध झालां आहां, आतां स्वस्थ बसण्याचा आपला काळ आहे. आता आपण संघाला माझ्या स्वाधीन करावें. मी भिक्षुसंघाचें नायकत्व स्वीकारितों.”  यावर बुद्ध भगवान् ह्मणाले,  “देवदत्त, सारिपुत्त आणि मोग्गल्लान यांच्या स्वाधीन सुद्धां भिक्षुसंघ करायास मी तयार नाहीं. मग तुझ्यासारख्या असमंजस सामर्थ्यहीन माणसाच्या स्वाधीन मी भिक्षुसंघ कसा करीन?” हें ऐकून देवदत्त मनांतल्यामनांत फारच संतापला, आणि तेव्हांपासून तो बुद्धाचा सूड उगविण्याच्या दुष्टवासनेला बळी पडला.

बिंबिसार राजाचा पुत्र अजातशत्रु हा देवदत्तचा भक्त होता. स्वत: त्यानें आपल्या बापास ठार मारून गादी मिळविली होती: व बुद्धाला ठार मारून देवदत्ताला बुद्धपद मिळवून देण्याच्या कामीं मदत करण्याचें त्यानें अभिवचन दिलें होतें. कांही मारेकरी पाठवून बुद्धाला ठार मारण्याचा त्यानें प्रयत्न करून पाहिला; परंतु तो सिध्दीस गेला नाहीं. उलट ते मारेकरी बुद्धाचेच उपासक झाले. तेव्हां त्यानें बुद्ध भगवान् राजगृहांत भिक्षेसाठीं फिरत असतां त्यांजवर नाळगिरि नांवाचा मस्त हत्ती सोडला. बुद्ध भगवांतांनीं प्रेममयअंत:करणानें त्याजकडेस पाहिलें, तो त्यांना कांहींएक इजा न करतां सरळ त्याजपुढें जाऊन उभा राहिला. व त्यांची पायधूली त्यानें आपल्या मस्तकावर टाकिली. तेथून तो सरळ हस्तिशाळेंत आपल्या ठिकाणावर जाऊन उभा राहिला. हें परम आश्चर्य पाहून राजगृहवासी लोक फारच चकित झाले, व ते ह्मणूं लागले कीं,

“दण्डेनेके दमयन्ति अंकुसेहि कसाहि च।
अदण्डेन असस्थेन नागो दन्तो महेसिना।।”

( कोणी काठीनें, कोणी अंकुशानें आणि कोणी चाबकानें (जनावराचें) दमन करितात. पण महर्षि बुद्धानें काठीवांचून किंवा कोणत्याहि शस्त्रावांचून हत्तीचें दमन केलें।)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel