त्यावेळीं संभूत नांवाचा प्रसिद्ध भिक्षु अहोगंग पर्वतावर रहात होता. तेथें यशाच्या आमंत्रणावरून आलेले पावांतील ६० व अवंतीकडील ८८ भिक्षू जमा झाले. त्या सर्वांनी सोरेय्य प्रदेशांत राहणार्‍या रेवत भिक्षूला आपल्या पक्षाचा पुढारी करण्याचा विचार केला. हें वर्तमान रेवतास समजलें, तेव्हां त्यानें आपलें स्थान सोडून दुसरीकडे प्रयाण केलें: कारण त्याला पुढारीपणा नको होता. त्याच्या मागोमाग ते भिक्षू त्या ठिकाणीं गेले. अशा रीतीनें चार पांच ठीकाणीं फिरून त्यांनीं त्यास गांठलें, व आपल्या पुढारीपणा त्याला दिला. हे वर्तामान वज्जिपुत्तक भिक्षूंला समजलें तेव्हां त्यांनी उत्तर भिक्षूच्या मार्फत रेवतांचे मन आपल्या पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सिध्दीस गेला नाहीं.

नंतर हे सर्व भिक्षू जेथें हा वाद उपस्थित झाला, तेथेंच तो मिटवावा या उद्देशानें वैशालीस आले. वैशाली नगरींत सर्व कामी नांवाचा एक अतिवृद्ध भिक्षु रहात होता. आनंदाचा (ज्याला महाकाश्यपानें धर्मसंबधीं प्रश्न विचारले त्याचा) हा सोबती. ह्याचीहि वाद मिटविण्याच्या कामीं त्या भिक्षूंनीं मदत घेतली. ते सर्व भिक्षु एकत्र जमले. परंतु एका पक्षानें एक ह्मणावें, तर दुसर्‍यानें दुसरें, अशी स्थिति झाली. वाद कांहीं मिटेना. तेव्हां त्यांनी प्रत्येक पक्षाचे चार चार भिक्षु निवडले, व त्यांनीं बहुमतानें वाद मीटवावा, असें ठरविलें. वज्जिपुत्तकांच्या तर्फे, सर्वकामी, साळ्ह, खुज्जसोभित आणि वासभगामिक या चाराची निवड झाली. पावांतील वगैरे भिक्षूंच्या तर्फें, रेवत, संभूत, य़श आणि सुमन या चारांची निवड झाली. ह्या आठांनीं वालीकाराम विहारांत एकत्र होऊन वादाचा निकाल यशाच्या तर्फें केला. याप्रमाणएं दुसर्‍या संगीतीचें काम संपलें.

पहिल्या आणि दुसर्‍या संगीतीची हकिगत त्रिपिटकांतील चुल्लवग्गांत आली आहे. तिसर्‍या संगीतीची हकिगत त्रिपिटकांत सांपडत नाहीं. बुद्धघोषाचार्यांच्या समन्तपासदिका (विनयठ्ठकथा) नामक ग्रंथाच्या आरंभीं ही हकिगत दिली आहे. तिच्या खरेपणाविषयीं पाश्चात्य पंडितांत बराच मतभेद आहे. तथापि अशोक राजा राज्य करीत असतां तिसरी संगीति झाली असावी, यांत शंका नाहीं.

अशोकानें दूरदूरच्या प्रदेशांत बौद्ध धर्मोपदेशकांला पाठविलें, याला आधार त्याच्या १शिलालेखांतच सांपडतो. (१- मासिक मनोरंजनाच्या दिवाळीच्या अंकांतील “अशोकाच्या शिलालेखांतील वेंचे” हा लेख पहावा.) शिवाय दुराचारी भिक्षूंनां सफेत वस्त्रें देऊन संघांतून घालवून दिलें जाईल, अशा अर्थाचा मजकूर सारनाथ (काशी) येथील शिलास्तंभावरील लेखांत आहे. तेव्हां उपदेशक पठविण्यासाठीं आणि दुराचारी भिक्षू कोणते हें ठरविण्यासाठीं अशोकानें एकादी परिषद भरविली असल्यास, त्यांत कांहीं नवल नाहीं. ह्या तिसर्‍या संगीतीचें अध्यक्षस्थान मोग्गलिपुत्त तिस्स यांजकडे होतें असें महावंसदि ग्रंथांत सांगितलें आहे. कथावत्थु नांवाचें जें अभिधर्मपिटकांत एक प्रकरण आहे, तें यानेंच रचलें असें ह्मणतात. संगीतीचें काम संपल्यावर यानें निरनिराळ्या देशांत भिक्षू पाठविल्याचा उल्लेख महावंसांत आहे, तो असाः-

थेरो मोग्गलिपुत्तो सो जिनसासनतोतको।
निट्ठपेत्वान संगीतिं पेक्खमानो अनागतं।।१।।
सासनस्स पतिट्ठानं पच्चन्तेसु अवेक्खिय।
पेसेसि कत्तिकेमासे ते ते थेरे तहिं तहिं।।२।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel