(चार आर्यसत्यें आणि आर्य अष्टांगिक मार्ग.)

चतुन्नं अरियसच्चानं यथाभूतं अदस्सना ।
संसरितं दीघमद्धान तासु तास्वेव जातिसु ।।
तानि एतानि दिद्वानि भवनेत्ति समूहता ।
उच्छिन्नमूलं दुक्खस्स नत्थि दानि पुनब्भवोति ।।

“चार आर्यसत्यांचें यथाभूत ज्ञान न झाल्यामुळें दीर्घ काळपर्यंत त्या त्या योनींत जन्मलों. परंतु आतां त्या सत्यांचे ज्ञान झाले; व त्यामुळें तृष्णेचा नाश झाला. दु:खाचें मूळ समूळ नष्ट झालें. आतां आणखी पुनर्जन्म राहिला नाही.”

(महापरिनिब्बाणसुत्त)

त्रिपिटकांत चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणीं आलेला आहे. हीं चार आर्यसत्यें बौद्धधर्मांचा पाया आहेत असें म्हटलें असतां चालेल. बुद्ध भगवंतानी प्रथमत: वाराणसींत पंचवर्गीय भिक्षूंना ह्या चार आर्य सत्यांचाच उपदेश केला. हा उपदेश पहिल्या व्याख्यानाच्या शेवटी मीं दिलाच आहे. ह्या उपदेशाची अनेक सुत्तांतून विस्तृत व्याख्या केली आहे. अद्वकथाकारांनींहि यावर विस्तारनें टीका लिहिली आहे. पहिल्या व्याख्यानांतील चार आर्यसत्यांचे वर्णन धम्मचक्कपवत्तनसुत्तात अनुसरुन केल्यामुळें अतिसंक्षिप्त झालें आहे. ह्या आर्यसत्यांचा आमच्या वाचकवर्गास विशेष बोध व्हावा, म्हणून त्या अतिसंक्षिप्त वर्णनाचा इतर सुत्तांतील वर्णनाच्या आधारें थोडा विस्तार करीत आहें.

दु:खः- दु:ख हें पहिलें आर्यसत्य. ह्या जगांत दु:ख आहे हें मनुष्यानें प्रथमत: जाणलें पाहिजे. ज्याला दु:ख काय आहे हें ठाऊक नाहीं, त्याची बुद्धि धर्माकडे वळणें कठीण. ह्या प्रपंचांत दु:ख आहे, असें वाटल्यावरुनच सर्वपंथांच्या लोकांना परमार्थविषयीं प्रयत्न करण्याची बुद्धि होते. दु:ख कोणते? जन्म दु:खकारक म्हणजे मूल जन्मतांच दु:ख बरोबर घेऊन येतें. ह्यातारपणाहि दु:खकारक; मरते-वेळींहि प्राण्याला दु:ख होतें; ह्या आयुष्यामध्यें शोकाचे अनेक प्रसंग येतात, तेहि दु:खकारक; अप्रिय पदार्थांशीं किंवा प्राण्यांशीं संबंध आला म्हणजे  तोहि दु:खकारक; प्रियपदार्थांचा किंवा प्राण्यांचा वियोग झाला, तरी तो दु:खकारक होतो. एखाद्या वस्तूची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होतें. संक्षेपानें सांगावयाचें म्हटलें म्हणजे पांच उपादानस्कंध (वासनायुक्त स्कंध) हे दु:खकारक आहेत. याप्रमाणे धार्मिक मनुष्यानें दु:ख सत्याचें ज्ञान संपादिलें पाहिजे.

दु:खसमुदय:- ह्या सगळ्या दु;खाचें कारण काय? कोणी म्हणतात, दु:ख आत्म्याचा धर्म आहे, कोणी ह्मणतात, दु:ख जगताच्या कर्त्यानें किंवा आपणाहून भिन्न अशा कोणत्यातरी व्यक्तीनें उत्पन्न केलें असावे; परंतु बुद्ध भगवान् म्हणतात दु:ख हा आत्म्याचा धर्म नव्हे किंवा तें दुस-या कोणीतरी उत्पन्न केलें आहे, असेंहि नव्हे, तर तें कार्यकारण नियमानें उत्पन्न झालें आहे. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नाहीं तर दु:खहि नाही. तृष्णा म्हणजे अतृप्ति. ती तीन प्रकारची, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा, कामतृष्णा म्हणजे चैनीच्या पदार्थांची तृष्णा. ह्या तृष्णेपासून जगाच्या दु:खांत मोठी भर पडली आहे. “कामतृष्णनें क्षत्रिय क्षत्रियाबरोबर भांडतात, ब्राह्मण ब्राह्मणांबरोबर भांडतात, पिते पुत्रांबरोबर भांडतात, पुत्र पित्यांबरोबर भांडतात, आणि आप्त आप्तांबरोबर भांडतात, ह्या चैनींसाठींच हीं सारी भांडणें होतात.१” बरें भांडण करुन एखाद्यानें चैनीच्या पदार्थांचा मोटा वांटा मिळविला, तरी त्यापासून त्याला सुख होत नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ महादुक्खक्खंधसुत्त, मज्झिमनिकाच
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अबला नं बलीयन्ति मद्दन्ते नं परिस्स्या ।
ततो नं दु:खमन्वेति भिन्नं नावमिवोदंक२ ।।
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२-सुत्तनिपात, कामसुत्त
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel