बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणाच्या ७ व्या दिवशी महाकाश्यप पांचशें भिक्षूंसहवर्तमान पावाहून कुसिनाराला जाण्यास निघाला होता. वाटेंत एका आजीवक पंथाच्य परिव्राजकाकडून बुद्धनिधनाची वार्ता त्याला समजली. हें वर्तमान ऐकून ज्यांना अद्यापि अर्हत्पदाचा लाभ झाला नव्हता, ते भिक्षु अत्यंत शोकाकुल झाले. महाकाश्यप त्यांनां म्हणाला:- “सखे हो, शोक करूं नका. ‘सगळ्या प्रिय वस्तूंपासून आम्हांसा कधीं ना कधीं पृथक् व्हावें लागणार’ असें भगवंतानें सांगितलें नाही काय? जें उत्पन्न झालें, तें नष्ट होणार नाहीं, असें कधीहि घडणार नाहीं.”

त्या भिक्षुसंघांत वृद्धपणी भिक्षु झालेला सुभद्र२ (२ बुद्धाचा शेवटचा शिष्य सुभद्र निराळा, आणि हा निराळा.) नांवाचा एक भिक्षु होता, तो म्हणाला:-  “सखे हो, शोक करूं नका त्या महाश्रमणाच्या (बुद्धाच्या) तडाक्यांतून आम्ही मुक्त झालों आहों. अमुक करावें, आणि अमुक करूं नये, अशा प्रकारें तो आम्हांला उपद्रव करी. परंतु आतां आम्ही आमच्या इच्छेप्रमाणें वागूं.” हें त्या भिक्षूचें भाषण ऐकून महाकाश्यप भिक्षुसंघास म्हणाला:- “सखे हो, आतां आपण धर्म१ (१. धर्म = बुद्धोपदेश) आणि विनय२ (२. भिक्षुसंघाचे नियम) बु. ध. सं. ५ यांचा संग्रह करूं. कारण त्यांच्या अभावीं अधर्मवादी (सुभद्रासारखे) भिक्षु बलवान् होतील, आणि धर्मवादी भिक्षु दुर्बल होतील.”

तेव्हां भिक्षूंनी धर्म व विनय यांचा संग्रह करण्याला समर्थ असे भिक्षू निवडण्यास महाकाश्यपास विनंति केली. तिला अनुसरून महाकाश्यपानें ४९९ भिक्षु निवडले. ते सर्व अर्हत्पदाला पावलेले होते. त्या वेळीं आयुष्यमान् आनंद अर्हत्पदाला पावला नव्हता. तथापि भिक्षु महाकाश्यपाला म्हणाले:-  “भदन्त हा आयुष्यमान आनंद जरी अर्हत् नाहीं तरी तो छंद, द्वेष, भय आणि मोह, यांच्या योगें कुमार्गानें कधींहि जाणार नाहीं. आणखी यानें भगवंतांपासून धर्मविनयाचें पुष्कळ अध्ययन केलें आहे. म्हणून आपण यालाहि निवडावें अशी आमची विनंती आहे.” महाकाश्यपानें भिक्षूंच्या विनंतीस मान देऊन आनंदालाहि निवडलें. या सर्व निवडक भिक्षूंनीं त्या चातुर्मास्यांत राजगृहांत राहण्याचा बेत केला, व त्याप्रमाणें सर्व राजगृहास गेले. तेथें त्यांनीं धर्मविनयाचा संग्रह केला. ज्या दिवशीं धर्मसंग्रहाला आरंभ झाला त्याच्या पूर्व रात्रीच आनदानें अर्हत्पद मिळविलें. या संघाचा महाकाश्यप अध्यक्ष होता. त्यानें उपालीस विनय विचारला व आनंदास धर्म विचारला. त्या दोघांनी आपल्या स्मरणांतील सर्व गोष्टी सांगितल्या. सर्वांच्या संमतीनें धर्म आणि विनय यांच्या रूपानें त्यांचा संग्रह करण्यांत आला. याप्रमाणें पहिल्या संगीतीचें (परिषदेचें) काम संपलें.

बुद्धपरिनिर्वाणाला १०० वर्षे झाल्यावर वैशाली नगरींतील वालिकाराम नांवाचा विहारांत दुसरी संगीति (परिषद) झाली. वैशालींतील वज्जिपुत्तक भिक्षु विनयाविरुद्ध दहा गोष्टी प्रतिपादूं लागले. त्यांतील मुख्य गोष्ट म्हटली म्हणजे भिक्षूंनी सोनें रूपे घेणें योग्य आहे, ही होय. एका उपोसयाच्या दिवशीं त्या भिक्षूंनी भिक्षुसंघाच्या बसण्याच्या जागीं एका पाण्यानें भरलेली कांशाची थाली ठेवली, आणि उपासकांना संघाला पैशाच्या रूपानें कांहींना कांहीं मदत करण्यास उपदेश केला. तेथें काकंडकपुत्र यश नांवाचा भिक्षु होता, त्याला हें त्या भिक्षुंचें कृत्य आवडलें नाहीं. तेथेंच या कृत्याचा निषेध केला. परंतु त्याच्या निषेधाकडे लक्ष न देतां उपासकांनीं संघाला बरेच पैसे दिलें. दुसर्या दिवशीं त्या भिक्षुंनीं त्या पैशांचे वांटे करून यशाचा वाटा यशास दिला. परंतु यशानें तो घेतला नाही. इतकेंच नव्हे तर त्यानें वैशाली नगरीत जाऊन उपासकगणास एकत्र करून बुद्धोपदिष्ट धर्माप्रमाणे भिक्षूंनीं पैसा घेणें गैरशिस्त, असें त्यांना समजावून सांगितलें. हे वर्तमान त्या भिक्षुंस समजल्यावर त्यांनी यशास बहिष्कार घालण्याचा बेत केला. यशास वैशालीत बहुमत मिळण्याचा संभव नव्हता. म्हणून तो एकदम तेथून कोशांची नगरीस गेला, व तेथून त्यानें पावा नगरींतील आणि अवंतीकडील भिक्षूंपाशीं मनुष्य पाठवून त्यांना हें वर्तमान कळविलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel