४८. दांभिक कोल्हा.

(अग्निकजातक नं. १२९)


एका काळीं बोधिसत्त्व उंदराच्या कुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर पुष्कळ उंदरांचा राजा होऊन तो अरण्यांत एका गुहेंत रहात असे. त्या अरण्यांत एके दिवशीं गवताला आग लागून ती जिकडे तिकडे पसरली. तींत एक कोल्हा सांपडला. पळावयास दुसरी वाट न सांपडल्यामुळें त्यानें एका झाडाच्या बुंध्याचा आश्रय केला. बुंध्याला डोकें टेंकून तो तेथें मृतप्राय पडून राहिला. जवळपास गवत नसल्यामुळें तो भाजून मेला नाहीं. परंतु त्या दावाग्नीच्या ज्वालांनीं त्याच्या अंगावरील सर्व केस जळून गेले. डोकें बुंध्याला टेकलें असल्यामुळें त्यावर मात्र शेंडीसारखे वर्तुलाकार केस राहिले. एके दिवशीं पाणी पिण्यास गेला असतां आपली पडछाया पाहून त्याला मोठा चमत्कार वाटला. धार्मिक ब्राह्मणासारखी डोक्यावर तेवढी शेंडी, आणि बाकी अंग गुळगुळीत. तो आपल्याशींच म्हणाला, ''शहाणा मनुष्य विपत्तीचा देखील फायदा करून घेतो. आगींनें होरपळून गेल्यामुळें जरी माझें नुकसान झालें आहे, तथापि या शेंडीचा चांगला उपयोग करून घेतां येईल.''

आमच्या बोधिसत्त्वाचें निवासस्थान त्याला माहीत होतें; परंतु त्याच्या गुहेंतील शतमुखी बिळांत त्याचा रिघाव होणें केवळ अशक्य होतें. पण ते लठ्ठ लठ्ठ उंदीर या कड्यावरून त्या कड्यावर उड्या मारीत असतांना पाहून त्याला वारंवार पाणी सुटत असे. या नवीन शेंडीचा फायदा घेऊन आपला कांहीं डाव साधेल तर पहावा या हेतूनें त्यानें बोधिसत्त्वाच्या बिळापासून कांहीं अंतरावर तपश्चर्येला सुरुवात केली. आकाशाकडे पहात दोनच पायांवर उभें रहावें. तोंड वासून सूर्याकडे टकमक बघत बसावें, इत्यादि तपश्चर्येचे प्रकार त्यानें आरंभिले. त्याला पाहून बोधिसत्त्वाला वाटलें कीं हा कोणीतरी मोठा धार्मिक प्राणी असावा. तो कोल्ह्याजवळ जाऊन त्याला म्हणाला, ''बाबारे, हें तूं काय चालविलें आहेस ? कोल्हा म्हणाला, ''आयुष्याचे दिवस प्राण्याच्या हिंसेंत आणि दुसर्‍या अनेक पापकृत्यांत गेल्यामुळें मला दृढतर पश्चात्ताप झाला आहे. आणि त्या कृत्यांच्या परिमार्जनासाठीं घोर तपश्चर्या करण्याचा माझा निश्चय झाला आहे. यापुढें कोणत्याही प्राण्याला न दुखवितां त्यांची सेवा करावी. सर्व प्रकारें त्याच्या उपयोगी पडावें हेंच माझें व्रत आहे. तुम्हाला जर माझा कांहीं उपयोग झाला तर मला धन्य समजेन !''

मूषकराज म्हणाला, ''आम्हाला तुमच्यापासून कांहीं नको आहे. तुम्ही सत्पुरुष आहा तेव्हां तुमच्या सारख्याच्या सहवासानें आमच्यावर फार मोठे उपकार होणार आहेत. तुम्ही या प्रदेशांत राहिलांत म्हणजे आम्हाला तुमचें वारंवार दर्शन होऊन मोठें पुण्य संपादण्याचा मार्ग खुला होईल.''

कोल्हा म्हणाला, ''हें सर्व खरें आहे. तथापि माझ्या तपश्चर्येला बळकटी आणण्यासाठीं मी तुमची सेवा करूं इच्छित आहे. लहानपणीं मी गणित शिकलों होतो, त्याचा मला येथें चांगला उपयोग होईल, तुम्ही सर्व उंदीर चरावयाला जात असतांना मी तुमची संख्या मोजीत जाईन व त्याप्रमाणेंच बिळांत जात असतां गणना करून एखादा दुसरा उंदीर हरवला तर आपल्याला कळवीत जाईन.

बोधिसत्त्वाला ही गोष्ट फारच पसंत पडली. उंदराच्या कळपाची यायोगें अभिवृद्धि होईल असें त्यास वाटलें; व कोल्ह्याच्या विनंतीस त्यानें रुकार दिला. तेव्हां कोल्हा म्हणाला, ''मी तुमच्या कळपाची गणना करीत असतां तुम्हीं सध्यांच्याप्रमाणें झुंडीनें जातां कामा नये. क्रमशः एक एकानें सरळ माझ्या जवळून गेलें पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel