५७. आश्चर्यकाश्रक मरण.

(सिगालजातक नं. १४२)


बोधिसत्त्व एका जन्मीं कोल्ह्याच्या योनींत जन्मला होता. कोल्ह्याच्या मोठ्या समुदायाचा राजा होऊन तो वाराणसी जवळच्या स्मशानांत रहात असे. त्या काळीं वाराणसी नगरांत एक मोठा उत्सव होत असे. त्या उत्सवांत शहरांतील लोक मत्स्यमांसादिक भक्षण करून मोठी चैन करीत असत. एका वर्षी ह्या उत्सवांत कांहीं धूर्त लोक अशा रीतीनें मजा मारीत असतां पहांटेच्या प्रहरीं त्यांच्यासाठीं केलेले मांसाचे पदार्थ खलास झाले. दारू मात्र अद्यापि शिल्लक राहिली होती. पुनः त्यांनीं मांस मागितलें तेव्हां त्यांना त्यांच्या नोकराकडून एक पळीभर देखील मांस नाहीं असें उत्तर मिळालें. त्यावर एक धूर्त म्हणाला, ''मी जिवंत असतांना मांस मिळत नाहीं असे कां म्हणतां ? मी दोन तासांच्या आंत मांस घेऊन येतो. तुम्ही येथेंच असा.'' असें म्हणून तो धूर्त एक मोठा दांडा घेऊन गटाराच्या वाटेनें शहरांतून बाहेर पडला व स्मशानांत जाऊन मेल्याचें सोंग करून उताणा निजला. बोधिसत्त्वाच्या कळपांतील कोल्हे बोधिसत्त्वाला विचारल्यावाचून कोणतेंहि साहसाचें कृत्य करीत नसत. त्यांनी या माणसाला पाहिल्याबरोबर तो मेला आहे असें जाणून त्याचें मांस खाण्याची बोधिसत्त्वाजवळ परवानगी मागितली. तेव्हां बोधिसत्त्व तें प्रेत कशाप्रकारचें आहें हें पहाण्यासाठीं त्या ठिकाणीं आला. दांडकें हातांत असलेलें प्रेत त्याच्या पहाण्यांत आलेलें नव्हतें. तेव्हां त्याला यांत कांहींतरी लुच्चेगिरी असावी अशी शंका आली, व हळूंच जाऊन त्यानें तें दांडकें दांतानीं चावून ओढण्याचा प्रयत्‍न केला; परंतु धूर्तानें बळकट धरलें असल्यामुळें तें त्याला ओढतां येईना. तो दूर जाऊन धूर्ताला म्हणाला, ''बाबारे तुझें हें मरण फारच चमत्कारिक दिसतें. तूं जर खरोखरच मेला असतास तर तुझ्या हातांतील दांडा सहज ओढून घेतां आला असता. आतां आम्हाला मारण्याची तुझी युक्ति आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्हीं तुझ्या तावडींत सांपडणार नाही.'' असें बोलून बोधिसत्त्वानें आपल्या समुदायासह तेथून पळ काढण्यास सुरवात केली. धूर्त उठून त्यांच्या पाठीमागें लागला, आणि हातांतील दांडा त्यानें त्यांच्या अंगावर फेकला; परंतु कोंणत्याहि कोल्ह्याला इजा न होतां ते सर्व पळून गेले. धूर्त वाकडें तोंड करीत गटाराच्या मार्गानें पुनः शहरांत गेला.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५८. शौर्य स्तुतीवर अवलंबून नसतें.

(विरोचनजातक नं. १४३)


एकदां बोधिसत्त्व सिंहयोनींत जन्मून हिमालयावर रहात असे. एके दिवशीं शिकारीस गेला असतां वाटेंत अकस्मात एक कोल्हा त्याला आढळला. सिंहाला पाहिल्याबरोबर त्या कोल्ह्याची बोबडीच वळली. अंगांत कंप भरला व तेथून हातभर देखील हालण्याचें सामर्थ्य त्याच अंगीं राहिले नाहीं. जात्याच धूर्त असल्यामुळें या संकटांतून पार पडण्याची त्यानें अशी एक युक्ति योजिली कीं, आपलें डोकें सिंहाच्या पायावर ठेऊन तो त्याला म्हणाला, ''मृगराज, मीं आपणाला शरण आलों आहे.''

सिंह म्हणाला, ''तुला माझ्याजवळ काय मागावयाचें आहे ?''

कोल्हा म्हणाला, ''मला दुसरें कांहीं नको आहे. केवळ आपल्या चरणाची सेवा करण्यास परवानगी द्या म्हणजे झालें.''

सिंह म्हणाला, ''हरकत नाहीं, तूं माझ्याजवळ रहा, मीं पकडलेल्या शिकारींतून तुला कांहीं भाग देत जाईन.''

कोल्ह्याला तरीं हेंच पाहिजे होतें. तो सिंहाजवळ राहून सुखानें आपला उदरनिर्वाह करूं लागला. कांहीं दिवसांनीं सिंह त्याला म्हणाला, ''तूं दुसरें कांहीं एक काम न करतां स्वस्थ बसून असतोस हें ठीक नाहीं. शिकार पकडण्याचें सामर्थ्य तुझ्या अंगीं नाहीं, हें मला कबूल आहे, परंतु या गुहेच्या आसपास एखादा हत्ती, गवा किंवा, गेंडा आला तर त्याची टेहळणी करून मला खबर देत जा व त्या प्रसंगीं ''महाराज, आपला पराक्रम दाखवा'' असें मला म्हणत जा म्हणजे मी तात्काळ धावत जाऊन शिकार पकडीन.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel