८२. शठाला महाशठ.

(कूटवाणिजजातक नं. २१८)


एकदां एक ग्रामवासी व्यापारी कांहीं कारणानिमित्त परदेशीं जाण्यास निघाला. त्याच्या घरीं प्रपंच नव्हता म्हणून जातांना घरांत दुसर्‍या एकाला ठेवून आपला नांगर वगैरे सर्व शेतीचें सामान त्यानें वाराणशीनगरींत रहाणार्‍या आपल्या एका मित्राच्या घरीं ठेवून दिलें; आणि तो तेथूनच प्रवासाला गेला. बरेच दिवस गेल्यावर शहरांतील गृहस्थाला हा परत येणार नाहीं असें वाटून त्यानें तें सामान विकून टाकलें. परंतु कांहीं महिने लोटल्यावर प्रवासास गेलेला गृहस्थ परत आला, व तें सामान मागूं लागला. तेव्हां नगरवासी व्यापारी म्हणाला, ''मित्रा, मला फार वाईट वाटतें. तुझें सर्व सामान उंदीरांनीं खाऊन टाकलें ! त्याला मी काय करूं ?''

ग्रामवासी मनुष्यानें त्याची ती लबाडी तात्काळ ओळखली आणि सभ्यपणाचा आव आणून तो म्हणाला, ''हरकत नाहीं, नांगर वगैरे सामान उंदरांनीं खाल्लें तर त्याला तूं आणि मी काय करणार ? घडलेली गोष्ट होऊन गेली. चल आपण लवकर स्नान करून जेवण करूं.''

एक दोन दिवस त्याच्या घरीं राहून ग्रामावासी व्यापार्‍यानें खाऊ वगैरे देऊन त्याच्या लहानग्या मुलाचें फार प्रेम संपादिलें, आणि एके दिवशीं त्याला खांद्यावर घेऊन तो नदीवर स्नान करण्यास गेला. परंतु तेथून त्याला परत न आणतां दुसर्‍या एका मित्राच्या घरीं ठेऊन तेथल्या मंडळींस त्यानें असें सांगितलें कीं, कृपा करून या मुलास कोणाच्या नजरेस न पडूं देतां घरांतच ठेवून घ्या आणि त्याचा चांगला संभाळ करा. त्याला एकटाच आलेला पाहून नगरवासी म्हणाला, ''काय ! आमच्या मुलाला कोठें ठेवून आलास ? काय ! नदीवर तर विसरला नाहींस ना ?''

ग्रामवासी वेडेंवाकडें तोंड करून म्हणाला, ''मित्रा, काय सांगूं मोठ्या दुःखाची गोष्ट घडून आली. मुलाला स्नान घालून पुसून तीरावर बसवलें, आणि मी स्नान करण्यासाठीं पाण्यांत उतरलों. इतक्यांतएक ससाणा येऊन तुझ्या मुलाला घेऊन गेला. आरंभीं आरंभीं नगरवासी व्यापार्‍याला हा सर्व प्रकार थट्टेचा वाटला परंतु शेवटीं चिडीवर येऊन तो आपल्या ग्रामवासी मित्राला म्हणाला, ''तूं अगदींच मूर्ख आहेस; मला फसवण्याचा तुझा हा बेत दिसतो. एवढ्या मोठ्या मुलाला ससाणा घेऊन जाईल ही गोष्ट मठ्ठ डोक्यांच्या माणसाला देखील संभवनीय वाटावयाची नाहीं.''

शेवटीं प्रकरण हातघाईवर येऊन नगरवासी व्यापार्‍यानें ग्रामवासीवर फिर्याद ठोकली. त्यावेळीं आमचा बोधिसत्त्व वाराणसींत न्यायाधिशाचें काम करीत होता. त्यानें फिर्यादीचें म्हणणें ऐकून घेऊन प्रतिवादीस बोलावून आणलें, आणि तो म्हणाला, ''याच्या मुलाला ससाण्यानें उचलून नेलें असें जें तूं म्हणालास तें खरें आहे काय ?''

ग्रामवासी म्हणाला, ''होय महाराज, तें खरें आहे. परंतु आपणास मी एक असा प्रश्न विचारितों कीं फाळासकट नांगर उंदीर खात असतात काय ?''

बोधिसत्त्वाला हें काय कोडें आहे हें समजेना. तो म्हणाला, ''परंतु उलटे सुलटे प्रश्न करून न्यायाधिशाचा वेळ घेणें योग्य नाहीं. नांगराच्या फाळाचा आणि याच्या मुलाचा संबंध काय ?''

ग्रामवासी म्हणाला, ''महाराज, आपण रागावूं नका. याच्या घरीं मी माझी शेतीचीं आऊतें ठेऊन देऊन प्रवासाला गेलों; तीं सर्व उंदीरांनीं खाल्लीं, असें याचें म्हणणें आहे. म्हणून मी आपणास हा प्रश्न विचारला.'' बोधिसत्त्व नगरवासी व्यापार्‍याला म्हणाला, ''हा सांगतो ही गोष्ट खरी आहे काय ?''

त्यानें ती गोष्ट कबूल केली. तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, ''शाबास ! ग्रामवासी लोक अडाणी असतात, असें आम्हीं ऐकतों. परंतु या गृहस्थानें तर नगरांतील अत्यंत धूर्त माणसावर ताण केली आहे ! ठीक आहे ! नांगराचा फाळ जर उंदीर खाऊं शकतात तर मुलाला ससाण्यानें कां नेऊं नये !'' नगरवासी गृहस्थाकडे वळून तो म्हणाला, ''बाबारे, तूं याचें सामान याला परत कर, तेव्हांच ससाण्यानें नेलेला तुझा मुलगा तुला परत मिळेल ! नाहीं तर मला तुझा मुलगा परत देववितां येणार नाहीं.''

हा न्यायाधिशाचा निकाल ऐकून नगरवासी व्यापार्‍यानें ग्रामवासी व्यापार्‍याचें सर्व सामान पुनः विकत घेऊन त्याच्या स्वाधीन केलें. ग्रामवासी व्यापार्‍यानें नगरवासी व्यापार्‍याचा मुलगा त्याला आणून दिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel