१०५. सशाचा आत्मयज्ञ.

(ससजातक नं. ३१६)

एकदां आमचा बोधिसत्त्व सशाच्या कुळांत जन्मला होता. तो वयांत आल्यावर आपला कळप सोडून एका शांत प्रदेशांत पर्वताच्या पायथ्याशीं रहात असे. तो प्रदेश फारच रमणीय होता. जवळच एक नदी मंदगतीनें वहात होती; आणि बाजूला एक खेडेगांव होता. तेथें आमच्या या शशपंडिताप्रमाणेंच एकांताची आवड धरणारे तिसरे तीन प्राणी होते, एक मर्कट, एक कोल्हा व एक ऊद. पण त्या सर्वांत आमचा बोधिसत्त्वच विशेष शहाणा होता, आणि त्याच्याच सल्ल्यानें बाकी तिघे प्राणी चालत असत. शशपंडित त्यांना वारंवार उपदेश करीत असे. दान, शील इत्यादि गोष्टींपासून फायदे तो त्यांच्या नजरेस आणून देई.

एके दिवशीं आकाशांतील तार्‍यांकडे पाहून बोधिसत्त्व आपल्या मित्रांला म्हणाला, ''गडे हो, उद्या पौर्णिमेचा उपोसय आहे. या दिवशीं आपण वेळेवर जेवण करून धर्मचिंतनांत काळ घालवूं या. सगळ्यांना ही गोष्ट पसंत पडली. दुसर्‍या दिवशीं प्रातःकाळीं ऊद आपले भक्ष्य मिळविण्यासाठीं नदीतीरावर फिरत असतां त्याला नदीतीरावर एका कोळ्यानें मारून टाकलेले रोहित मत्स्य सांपडले. त्यानें मालकाचा इतस्ततः शोध केला. परंतु कोणीच तेथें दिसून न आल्यामुळें हे बिनवारशी मासे असावे असें वाटून त्यानें ते आपल्या राहण्याच्या बिळांत आणून ठेविले; आणि दुपारीं वेळेवर खाईन असा विचार करून तो धर्मचिंतन करीत स्वस्थ बसला. कोल्ह्यालाहि जवळच्या शेतांत एका शेतकर्‍यानें टाकून दिलेलें दह्यानें भरलेलें भांडें व कांहीं भाजलेलें मांस सांपडलें. तें घेऊन त्यानें आपल्या घरांत आणून ठेविलें, आणि तोहि धर्मविचारांत मग्न होऊन बसला. माकडानें आपल्या दुपारच्या फराळासाठीं कांहीं पिकलेले आंबे गोळा करून ठेविले. पण आमचा शशपंडित दुपार झाल्यावर दूर्वा खाऊन आपला उदरनिर्वाह करीन अशा बेतानें स्वस्थ बसून राहिला.

इंद्राला या चार प्राण्यांची तपश्चर्या पाहून फार आश्चर्य वाटलें. आणि त्यांची कसोटी पहाण्यासाठीं ब्राह्मण वेषानें तो त्या अरण्यांत प्रकट झाला. प्रथमतः उदाजवळ जाऊन तो म्हणाला, ''बा उदा, मी या अरण्यांत उपोसथ व्रत पाळण्याच्या उद्देशानें आलों आहे. परंतु मजपाशीं शिधासामग्री कांहीं नाहीं, आणि आतां खेडेगावांत जाऊन भिक्षा मागण्याला हि अवकाश राहिला नाहीं. तेव्हां जर मला कांहीं खाण्यासाठीं देशील, तर मी तुझे उपकार मानून उपोसथव्रत पाळीन.'' ऊद म्हणाला, ''हे ब्राह्मणा, मजपाशीं नदीच्या कांठीं सांपडलेले सात रोहित मत्स्य आहेत. ते भाजून खाऊन या अरण्यांत खुशाल धर्मचिंतनांत काळ घालीव.''

इंद्र म्हणाला, ''मी इतक्यांत काष्ठें वगैरे गोळा करून घेऊन येतों तोंपर्यंत ते मांसे तसेंच राहूं द्या.''

असें बोलून इंद्र कोल्ह्यापाशीं गेला आणि त्याजवळहि कांहीं खावयास मागूं लागला. तेव्हां कोल्हा म्हणाला, ''हे ब्राह्मणा, शेतकर्‍यानें जवळच्या शेतांत टाकून दिलेलें आंबट दह्याचें भांडें आणि घोरपडीचें मांस मला सांपडलें तें मी येथें आणून ठेविलें आहे. या पदार्थावर आपला निर्वाह करून आजचा दिवस तूं खुशाल येथें रहा.''

जरा वेळानें येतों असें सांगून इंद्र तेथून माकडाजवळ गेला आणि त्याजवळ कांही खाण्याचा पदार्थ मागूं लागला. तेव्हां माकड म्हणाला, ''भो ब्राह्मणा, उत्तम पिकलेले आंबे आणून मी येथें ठेविले आहेत. जवळ नदीचें स्वच्छ आणि गार पाणी वहात आहे. व या झाडाची सावली फार घनदाट आहे. या सर्वांचा उपभोग घेऊन तूं आजचा दिवस येथेंच धर्मचिंतनांत घालीव.''

त्यालाही कांहीं वेळानें येतों असें सांगून इंद्र सशाकडे गेला आणि कांही भोज्य पदार्थ असेल तर तो देण्याविषयीं त्यानें नम्रपणें याचना केली तेव्हां ससा म्हणाला, ''ब्राह्मण महाराज, आपण येथें अग्नि प्रदीप्‍त करा म्हणजे तुम्हाला खाण्याला योग्य अशी एकच योग्य वस्तू मजपाशीं आहे ती मी अर्पण करतों.''

इंद्रानें शुष्क काष्ठें गोळा करून आपल्या प्रभावानें तेथें अग्नि उत्पन्न केला. तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज सशापाशीं तीळ किंवा तांदुळ कोठून असणार ? अथवा दुसरा एखादा खाद्य पदार्थ तरी माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्यानें कोठून आणावा ? आतां आपल्या उपयोगीं पडणारा असा माझा देहच काय तो मजपाशीं आहें ! मनुष्याला सशाचें मांस फार आवडतें असें आम्ही ऐकतों. तेव्हां या अग्नीनें भाजलेल्या माझ्या शरीरांतील मांस खाऊन आपण तृप्‍त व्हा ! आणि येथें धर्मचिंतनांत आपला काळ घालवा !''

असें म्हणून बोधिसत्त्वानें आपल्या लवेंत अडकलेले बारीकसारीक प्राणी निघून जावे व त्यांचा आपल्या बरोबर नाश होऊं नये म्हणून आपलें अंग त्रिवार झाडलें, आणि इंद्रानें उत्पन्न केलेल्या अग्नींत मोठ्या आनंदानें उडी टाकली ! सशपंडिताचें हें दानशौर्य पाहून इंद्र अत्यंत चकित झाला ! त्याच्या प्रभावानें सशाला अग्नीची बाधा मुळींच झाली नाहीं. त्याला बाहेर काढून आपल्या हातावर घेऊन इंद्र म्हणाला, ''तुझ्यासारखा दानशूर मला कोणी आढळला नाहीं. तुझें स्मारक चिरकाल रहावें म्हणून तुझें चित्र मी आज रात्रीं पूर्ण चंद्रावर काढून ठेवितों त्या रात्रीं इंद्राने एक डोंगर पिळून तयाचा रस काढला आणि त्या रसानें पूर्णचंद्रावर सशाचें सुंदर चित्र काढलें. चंद्र दूर अंतरावर असल्यामुळें आम्हांला तें चित्र नीट दिसत नाहीं. तथापि शसपंडिताच्या दानशौर्याची ती खूण आहे हें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे.

यःकश्चित् प्राण्याच्या या औदार्यापासून मनुष्यांनीं परोपकारासाठीं आत्मयज्ञ करण्याचा धडा शिकावयास नको काय ?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel