इंदिरा संत - Indira Sant Biography

इंदिरा संत
 
इंदिरा संत (जन्म : इंडी, कर्नाटक, जानेवारी ४, १९१४; मृत्यू : पुणे, जुलै १३, २००० पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या.

शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या.

जन्म आणि शिक्षण

पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म जानेवारी ४, १९१४ रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी. ए., बी.टी. डी. व बी. एड. या पदव्या प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९५६ ते १९७४ या काळात प्राचार्यपद देखील भूषवले.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील सहाध्यायी नारायण संत यांच्याशी त्या १९३५ साली विवाहबद्ध झाल्या.

व्यक्तिमत्त्व आणि जीवनप्रवास

गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत वासंती मुझुमदार ह्यांनी इंदिरा संतांविषयी सांगितले आहे की, "आपला आनंद अक्का (इंदिरा संत) स्नेहीजनांना सुंदर भेटवस्तू देऊन जरी साजरा करत तरी त्या स्वतः मात्र ह्या सर्वांतून अलिप्त असत. ही अलिप्तता त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या खडतर अनुभवांनी मिळवून दिली होती. मात्र त्या खुल्या मनाने बदलांचं आणि नव्या गोष्टींचं स्वागत करत. यश आणि अपयश त्या एकाच मापाने तोलत असत." एका उमद्या आणि जीवनाचा भरभरून आस्वाद घेत त्याच्याशी दोस्ती करण्याच्या त्यांच्या ह्या स्वभावधर्मामुळेच आपल्याला त्यांच्या कवितांतून गहिऱ्या, अंतरंग व्यापणाऱ्या आणि तरीही नवोन्मेशशालिनी अशा कवयित्रीचे दर्शन घडते.