आपण माझ्या हातून ज्या चुका, जे अपराध झाले असतील ते पोटात घाला. आपणास दर महिना जो पैसा पाठविण्यात येई, तो अतःपरही पाठविण्यात येईल. कृपाकरून अनुज्ञा द्याल अशी आशा आहे.’

वरील आशयाचे पत्र वडिलांस गेले. वडिलांनी जरा रागाने पत्र लिहिले की, ‘हा काय मूर्खपणा चालिवला आहेस? चोर ताट चोरून नेतील म्हणून का भुईवर, जमिनीवर आपण भात खावा? हे अगदी अनुचित आहे. दुष्ट त्रास देणारच. त्यामुळे कपाळात, डोक्यात राख घालून जाणे हे धीराचे काम नव्हे.’ मुक्ताबाईने ज्ञानेश्वरास सांगितले ‘तरीच संत व्हावे। जग बोलणे सोसावे।‘ जगाची बोलणी, भाऊबंदांचे त्रास हे सर्व सहन करून आपण आपला मार्ग चोखाळीत राहावयाचे, हे मोठ्या माणसाचे काम. विद्यासागरांच्या इतर भावांची पण पत्रे आली. त्यांनीही हात जोडून विनंती केली, ‘आपण असे करू नये. आमचे अपराध पोटात घाला.’ आईने पण गळ घातली. शेवटी विद्यासागर समाज सोडून गेले नाहीत, परंतु ते आपल्या मातृभूमीस परत गेले नाहीत. तेथे गेल्यावर कौटुंबिक भांडणे पाहावयास लागतील तर जाणेच नको.

विद्यासागर यांचे वडील काशीस आजारी पडले. त्यांचे पत्र आले. त्याबरोबर विद्यासागर, दीनानाथ, शंभुचंद्र व भगवती ही सर्व काशीस ताबडतोब निघून आली. ठाकुरदास यांस उतार पडला; यामुळे विद्यासागर पुन्हा कलकत्त्यास निघून आले. परंतु इकडे विद्यासागरांची आई भगवती ही एकाएकी फार आजारी झाली. तिला रक्ताचा अतिसार झाला व लवकरच आसन्नमरण झाली. शेवटपर्यंत भगवती नीट शुद्धीत होती. ती आपल्या पतीस म्हणाली, “असे माझ्याजवळ बसा; मला आशीर्वाद द्या.” ठाकुरदास म्हणाले, “मी काय आणखी आशीर्वाद देणार? तू पुण्यपावन साध्वी स्त्री आहेस, तू आपल्या पुण्याईने अहेवपणी स्वर्गारोहण करीत आहेस. तुला मी काय देणार?” पतीच्या मांडीवर तिने काशीत, पूर्वी म्हटल्याप्रमाणे पतीच्या आधी प्राण सोडला. विद्यासागर मरताना आईजवळ नव्हते. जेव्हा कलकत्त्यास त्यांस ही वार्ता कळली तेव्हा केवढा आकांत केला! एवढे मोठे विद्यासागर, परंतु दुःखाने अगदी वेडे झाले. जेव्हा त्यांस आईची आठवण येई, त्या त्या वेळेस ते रडू लागायचे. त्यांच्या भावना फार कोमल होत्या. पूर्वीचे सर्व प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर ताबडतोब उभे राहावयाचे. कल्पना व स्मरण ही फार. एकदा एका मित्राजवळ सहज गप्पागोष्टी चालल्या होत्या. बोलता बोलता विद्यासागरांच्या आईसंबंधी गोष्टी निघाल्या. आईचा संबंध आल्याबरोबर गतकाळच्या सर्व आठवणी एकदम विद्यासागरांसमोर उभ्या राहिल्या व ते आपले रडू लागले. त्यांच्या मित्रास आईचा उल्लेख केल्याबद्दल वाईट वाटले व तो मित्र म्हणाला, “आपल्या दुःखास मी नकळत कारणीभूत झालो याची मला क्षमा करा.” डोळे पुसून विद्यासागर म्हणाले, “यात क्षमा कसली करावयाची? अहो, उलट मी तुमचा आभारी आहे; कारण या निमित्ताने तरी मातेची पूज्य स्मृती होऊन कृतज्ञतेचे चार अश्रू आले.”

आई मरण पावल्यावर विद्यासागर आपल्या वडिलांस पुनःपुन्हा कलकत्त्यास येण्यास लिहीत. कारण काशीस जाणे विद्यासागरांच्या जिवावर येई. काशीची आठवण झाली म्हणजे आईची आठवण व्हावी व मग डोळे डबडबून यावे. ज्या काशीच्या कल्पनेने इतका शोकपूर यावा, त्या प्रत्यक्ष काशीत जाऊन, जेथे आई गतप्राण झाली, जेथे आपण नव्हतो, असे ते स्थान, ती खोली पाहून विद्यासागर यांस किती वाईट वाटले असते याची कल्पना तुम्हीच करा. ठाकुरदास यांनी विद्यासागरांस असा हुकूम केला की, तूच मला येऊन भेट, आता पुष्कळ दिवस झाले. मी काही तिकडे येणार नाही; तू ये. तुला पाहण्याची मला इच्छा आहे. शेवटी विद्यासागर काशीस आले. आईच्या आठवणीने शोकगंगा लोटली. पित्याची भेट झाली. परंतु पित्याचा पूर्वीचा आजार वाढला व विद्यासागर तेथे असता ठाकुरदास पण १८७६ मध्ये निजधामास गेले. आई-बाप दोघेही आता कैलासवासी झाले. ईश्वरचंद्रांची दैवते शरीररूपाने, पार्थिवरूपाने त्यांस अंतरली. आता मनोमय मूर्ती राहिल्या. फोटोतील मूर्ती राहिल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel