भाग 1

फायनल इयरची परीक्षा संपली. सुट्ट्या सुरू झाल्या. रिझल्ट यायला अवकाश होता. पुढे करिअर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन याबद्दल निर्णय व्हायचा होता. सर्व ताणतणावातून मुक्ती मिळण्यासाठी सहा मित्रांनी सहलीची योजना आखली आणि बघता बघता सहलीचा दिवस उजाडला. सहा मित्र म्हणजे दोन तरुणी, स्वरा आणि मीना, आणि चार तरुण, अमर, पवन, करण, आणि अजय, हे सर्व जण उत्साहात जंगलात जाण्यासाठी तयार झाले होते. पाठीवर बॅग, आणि मनात अद्भुत साहसी गोष्टींची स्वप्नं घेऊन ते सहा मित्र उत्साहाने करणच्या वडिलांनी त्याला भेट दिलेली "महिंद्रा मारेझो" ही सिक्स सिटर गोल्डन कलर कार घेऊन करणच्या बोरिवलीच्या घरी जमले होते आणि तिथून "पंच पालक" या जंगलात जाण्यासाठी निघाले. त्या जंगलाचे फॉरेस्ट ऑफिसर पवनच्या वडिलांचे मित्र होते. त्यांना एकदा भेटून मग ते सर्वजण फिरायला निघणार होते. देश विदेशातून सुद्धा अनेक पर्यटक तिथे येत असत.

त्यांनी सोबत टेंट, स्लीपिंग बॅग आणि स्लीपिंग पॅड, हेडलॅम्प, टॉर्च, बॅटरीवर चालणारे छोटे टेबल फॅन, फोल्डिंग चाकूचा सेट, जास्तीचे कपडे, ग्रिप असलेले चांगले बूट, टोपी, सनग्लासेस, टॉवेल, टूथब्रश, टूथपेस्ट, इतर वैयक्तिक वस्त्र, फर्स्ट एड किट (औषधे, बँडएज, अँटीसेप्टिक क्रीम), पाणी, अनेक दिवस टिकू शकतील असे खाण्याचे पदार्थ जसे ड्राय फ्रूट वगैरे, तसेच कटलरी, आपत्कालीन शिट्टी, सिग्नलिंग डिव्हाइस, छापील नकाशा, बॅकपॅक, दोर, कॅमेरा, कचऱ्याच्या पिशव्या आणि पाऊस आलाच तर रेनकोट, छत्र्या आणि इतर अनेक वस्तू असे सर्व आवश्यक साहित्य सोबत घेतले होते. या सर्व सामानामुळे त्यांच्या बॅग्स जड जरूर झाल्या होत्या परंतु त्याला काही इलाज नव्हता.

मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर हा पंच पालक नावाचा पाच पर्वतांचा एक समूह होता. त्या पाचही पर्वतांच्या मध्यभागी उंच पर्वत होता तो शिवलिंगाच्या आकारासारखा दिसत होता. प्रत्येक पर्वतात अनेक गुहा होत्या. त्या सर्व गुहा एकमेकांना जोडलेल्या होत्या, जमिनीवरून आणि जमिनीखालून सुद्धा! मध्यभागी असलेल्या त्या शिवलिंगासारख्या आकाराच्या पर्वताच्या टोकावर एक मंदिर होते तिथे जाण्यासाठी कच्ची पायवाट होती.

भगवान शिव यांना पंच महाभूतांचे (पाच महान तत्वांचे) स्वामी मानले जाते. पंच महाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आणि आकाश (अंतरिक्ष). हे तत्वे सृष्टीच्या निर्मिती, स्थिती, आणि लयाशी संबंधित आहेत आणि भगवान शिव यांना या सर्व तत्वांचे अधिपति, नियंत्रक आणि रक्षक मानले जाते. शिव तत्त्वज्ञानात, हे पंच महाभूत संपूर्ण ब्रह्मांडाचे मूळ घटक मानले जातात. त्या मंदिराचे नाव पंचपालक शिव मंदिर. तसेच या सर्व पर्वतांना वेढलेले एक जंगल होते. म्हणून या सर्व भागाला म्हणजे पर्वतरांगा आणि जंगलाचा भाग मिळून पंचपालक जंगल असे नाव होते. या सर्व पर्वतांच्या आजूबाजूला आणि संपूर्ण जंगलामधून एक नदी वाहत होती. या सर्व जंगलात आणि पर्वतराजींमध्ये कुठेतरी एक अमूल्य खजिना दडलेला आहे अशी एक दंतकथा फार पूर्वीपासून या जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावांमध्ये सांगितली जाते. आज पर्वतांपैकी अवकाश पर्वता मधल्या गुहेत जाण्याची मनाई होती. कोणी म्हणे तिथेच खजिना दडलेला आहे म्हणून कोणाला जाऊ देत नाही. मात्र खरे कारण असे होते की पूर्वी अनेक वेळा त्या गुहेत चोरून काहीजण गेल्यानंतर ते परत आले नव्हते. त्यांची बॉडी सुद्धा सापडली नव्हती. बाकी इतर चार तत्वांच्या गुहांमध्ये जायला परवानगी होती. प्रत्येक गुहेमध्ये काही रस्ते आणि ठिकाणं अशी होती की तिथून पुढे जायला पर्यटकांना परवानगी नव्हती.

जंगलामध्ये पायी फिरणे, म्हणजेच जंगलातील मार्गांवर चालणे, याला सामान्यतः "जंगल ट्रेकिंग" किंवा "फॉरेस्ट ट्रेकिंग" असे म्हणतात. या प्रकारच्या ट्रेकिंगमध्ये जंगलातील निसर्गरम्य आणि विविध मार्गांचा समावेश होतो. यामध्ये वनस्पती, प्राणी, आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो. जंगल ट्रेकिंग करताना पायवाटांचा वापर केला जातो आणि काही वेळा हे मार्ग असमान, खडबडीत आणि अडचणीचे असू शकतात. जंगल ट्रेकिंगच्या प्रकारांमध्ये, वाइल्डलाइफ ट्रेकिंग म्हणजे जंगलातील विविध वन्यजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी केले जाणारे ट्रेकिंग, नेचर हाइकिंग म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी सहज आणि सोप्या मार्गांवर चालणे, रिव्हर ट्रेकिंग म्हणजे जंगलातील नदीच्या काठाने किंवा प्रवाहाच्या मार्गाने चालणे, ज्यामध्ये नदी ओलांडणे आणि पाण्यातून चालणे याचा समावेश असू शकतो. या सहा जणांचा उद्देश वरील सर्व प्रकारची ट्रेकिंग करणे हा होता. अजयचे मनात मात्र काहीतरी वेगळे होते. त्याला ऐतिहासिक पौराणिक गोष्टींमध्ये खूप रस होता. या सर्व प्रवासामध्ये त्या जंगलाच्या ऐतिहासिक पाऊल खुणा जाणून घेण्याचा अजयचा निर्धार होता. तसेच त्या खजिनेच्या दंतकथेबद्दलही त्याला उत्सुकता होती.

"खरंच तिथे खजिना असेल का?", असे अजयने म्हणतात मागच्या सीटवर बसलेली स्वरा त्याच्या डोक्यावर टपली मारून त्याला चिडवू लागली, "ए बाबा, तिथे आमच्या सोबत जरा निसर्ग एन्जॉय कर नाहीतर उघडून बसशील इतिहासाची पुस्तके!"

त्या सगळ्यांमध्ये स्वरा ही सगळ्यात बोल्ड आणि स्वतंत्र विचारांची मुलगी होती. तिचे दोन वेळा ब्रेकअप झाले होते.

गाडी चालवणारा करण म्हणाला, "हो. तंबूमध्ये जर हा पुस्तक वाचत बसलेला दिसला तर याला आपण तिथेच तंबूमध्ये सोडून निघून जाऊ बरं का!"

"अरे मी असा तसा तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या मागे मागे येईल. अरे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जातोच आहे तर तिथला खजिना शोधू!", खादी कपडे घातलेला अजय कोरगांवकर म्हणाला.

"अरे बाबा! तो खजिना शोधण्याचा आजपर्यंत पुष्कळ लोकांनी प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही असे रस्तोगी काका सांगतात. फॉरेस्ट ऑफिसर. पप्पांचे मित्र!", पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला पवन पाटील सांगू लागला.

ड्रायव्हर सीटवर करण, त्याच्या बाजूला अजय. सर्वात मागच्या सीटवर अमर पवन आणि मधल्या सीटवर स्वरा आणि मीना बसले होते.

"अरे, पण अजय म्हणतो आहे तर आपण एकदा चान्स घ्यायला काय हरकत आहे?" मीना मोरे म्हणाली.

"वाटलंच मला! की मीना अजून कशी बोलली नाही ते. अजय काहीतरी म्हणेल आणि मीनाचा त्याला सपोर्ट नसणार असे कधी झाले आहे का बरं?", पिवळा टी शर्ट आणि शॉर्ट्स घातलेल्या स्वराला अमर आपटे याने टाळी दिली.

"नीट बघ स्वरा, मिनाकडे! लाजली असेल ती!",निळा कुर्ता घातलेला करण सक्सेना म्हणाला.

"लाजली म्हणजे! अरे चांगले गाल लाल झाले तिचे!", स्वरा त्रिवेदी म्हणाली.

"ती लाजली आणि तू? लाजणे, नटणे, मुरडणे हे तुझ्या डिक्शनरीतच नाही आहे वाटतं!", करण स्वराला चिडवू लागला.

"हट रे! तू कोण मला सांगणारा पोरीसारखे वाग म्हणून!" स्वरा.

आरशात बघून करण म्हणाला, "बघा! एका पोरीचे चिडलेले नाक! वेडवलेला चेहरा, थरथरणारे ओठ! असे वाटते ना की गाडी थांबवावी आणि तिच्या ओठांना...."

"स्वप्नातही तसा काही विचार करू नको करण! मला तू अजून ओळखले नाही! एक उलट्या हाताची..." स्वरा.

"अगं मी तुला चांगलं ओळखतो म्हणून तर मी म्हणणार होतो की तुझ्या ओठांना चिकटपट्टी लावावी म्हणजे प्रवास शांततेने होईल! तुला काय वाटत होतं मी तुझ्या ओठांना काय करणार ते?", करण चिडवत म्हणाला.

"ए, गप बसा दोघेजण! सर्वांनी आता आपापल्या तोंडाला चिकटपट्टी लावा. आता आपण मस्तपैकी शांततेत गाणे ऐकू!", अजय म्हणाला आणि त्याने गाणे लावले: "आय एम इन लव्ह!" गायक गायिका मधुर आवाजात गाणे म्हणत होते पण प्रत्यक्षात पडद्यावर हे गाणे आक्रमक सुनील शेट्टी वर चित्रित झालेले होते. भेदक नाच करत तो आपल्या प्रेमाचा इजहार आपल्या हीरोइन कडे करत होता. त्याची हिरोईन मात्र वेगळ्याच पद्धतीच्या नाच गण्यात आजपूर्वीच्या कोरस सोबत दंग होती. कुणाचं सर्जनशीलतेच्या नावाखाली आनंदी आनंद होता.

आता अजयने आपल्या बॅगेतून इतिहासाची कादंबरी वाचायला घेतली. इकडे खिडकीच्या काचेला डोके टेकून डोळे बंद करून आपले लांब लचक केस मोकळे सोडलेली गुलाबी साडीतली मीना, "आय एम इन लव्ह!" हे गाणे ओठांनी गुणगुणत कुठल्यातरी दिवास्वप्नात दंग झाली होती.

रस्तोगी अंकलकडे पोहोचल्यावर त्यांचे चांगले स्वागत झाले. रात्री त्यांच्या बंगल्याच्या अंगणात मस्तपैकी सतरंजी टाकून त्यांनी सर्वांनी एकत्र जेवण केले. अजयच्या म्हणण्यानुसार जरी खजिना शोधायचा तरीही तो इतर पर्यटक असताना शोधता येणार नव्हता. संध्याकाळी पाच वाजेनंतर जेव्हा पर्यटकांना बंदी असते तेव्हा तो शोधायला हवा. पण प्रवासातच त्यांनी ठरवले की खजिना शोधण्याची आयडिया रस्तोगी अंकल त्यांना सांगू नये. अन्यथा ते नक्कीच परवानगी देणार नाहीत आणि ते त्यांच्या पेरेंट्सना सांगून गोष्टी आणखी बिघडतील. अर्थात ते सहा जण रोज रात्री अंकलच्या बंगल्यात मुक्कामाला येणार नव्हते कारण बंगला मूळ पर्यटन ठिकाणाहून खूप दूर होता. फक्त आज आणि जमल्यास परत जाताना ते भेट देणार होते. पर्यटक जिथे तंबू टाकून मुक्काम करतात त्या भागात ते थांबणार होते. सर्व सुख सुविधा असलेले तंबू किंवा झोपड्या सुद्धा तिथे भाड्याने मिळत होते किंवा मग तुम्ही लॉजवर थांबू शकता.

रात्री जेवण करतांना अंकल कडून बरीच माहिती मिळाली. त्यांनी जंगलातील विविध धोके समजावून सांगितले. त्यांना मूलबाळ नव्हते. मात्र नवीन पिढीशी रस्तोगी दाम्पत्य चांगले जुळवून घेत.

जेवण झाल्यावर गप्पा मारता मारता अंकल म्हणाले,"ही आणि मी, स्वतः ला खूप व्यस्त ठेवतो कारण अन्यथा आम्हाला मूळ नसल्याचे शल्य बोचत राहते!"

"ते कसे काय?", करणने डोळ्यांनी मना केले तरीही स्वराने विचारले.

"ही गरोदर असताना एकदा अनपेक्षितरित्या तरसाने आमच्या घरात शिरून हल्ला केला. भितीने ही इकडे तिकडे पळायला लागली आणि फरशीवरील पाण्यावर पाय घसरून पडली. मिस कॅरिएज झाले. नंतर शरीरात असे काही कॉम्पलिकेशन तयार झाले की तो पुन्हा आई होऊ शकणार नाही असे डॉक्टर म्हणाले!"

एकूण सर्वच जण अस्वस्थ झाले. ते बघून ताण हलका करण्यासाठी रस्तोगी अंकल म्हणाले, "अरे पोरांनो. बाकी कसं काय? तुमचे शिक्षण? करीयर? मैत्री? आणि केव्हापासून बघतोय ही, काय नाव बरं तिचं?"

"सुट्ट्या संपल्यावर आम्ही ठरवणार आहोत हाईयर एज्युकेशन की नोकरी की बिझिनेस! आणि हिचे नाव आहे स्वरा!", तिच्या डोक्यावर टपली मारत करण म्हणाला.

"हां! स्वरा. ही आणि करण यांचं काहीतरी डोळ्यांनी एकमेकांना हातवारे किंवा डोळ्यांनी इशारे देणं सुरू असतं, काय भानगड आहे?", चिडवण्याच्या सुरात रस्तोगी अंकल म्हणाले.

हे एकदाच अजयकडे बघून मीना लाजली. आणि सर्वजण हसले.

"त्याचं काय आहे ना अंकल? ह्या करणची ती बस नेहमी चुकते. यांनी हात दाखवला की ती थांबतच नाही! यांनी एक दोनदा पळत जाऊन तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण हा तोंडावर आपटला!", स्वरांकडे इशारा करत अमर म्हणाला.

सर्वजण खळाळून हसले. स्वराने दोन बुक्के अमरच्या पाठीत हाणले.

पवन पुढे म्हणाला, "हीचे दोन ब्रेकअप झालेत आधी!"

हे ऐकून रस्तोगी आण्टी म्हणाल्या, "अरे पण सर्वांनी एक लक्षात ठेवा. प्रेम हे काही गमतीत घेण्याची गोष्ट नाही. प्रेम एकदाच होते. तुमच्या आजच्या पिढीच्या विचारानुसार जोडीदार बदलत राहणे हा नुसता एक जीवघेणा खेळ आहे, जो तुम्हाला कोणत्याच मुक्कामावर घेऊन जाणार नाही. परफेक्ट जोडीदाराच्या शोधात हे लक्षात राहत नाही की आपण स्वतः तरी कुठे परफेक्ट असतो? परफेक्ट मॅच असे कधीही नसते. असते ते फक्त एकमेकांना समजून घेऊन ऍडजस्ट करणे. एकमेकांना सुख दुःखात साथ देणे!"

ऐकून सर्वच जण अंतर्मुख झाले.

रस्तोगी अंकल म्हणाले, "ज्या काळात राजांसाठी बहुपत्नीत्व सामान्य बाब होती त्या काळात प्रभू श्रीरामांनी एक पत्नी व्रताचा अंगिकार केला! विसरलात? हां! आणि मैत्री जरूर असावी. निखळ असावी. कृष्ण द्रौपदी सारखी असावी. भानुमती कर्ण सारखी असावी. कृष्ण सुदामा सारखी असावी. दुर्योधन कर्ण सारखी असावी. अर्थात मित्र चुकत असेल तर त्याला वाईट मार्गावरून चालण्यास रोखणारी असावी! एकमेकांना वाईट गोष्टींमध्ये साथ देणारी मात्र नसावी!"

"पण कृष्णाबद्दल काय? त्यांनी तर अनेक बायका केल्या. त्यांची तर एक प्रेयसी सुद्धा होती?", कारण ने अडचणीत आणणारा प्रश्न केला.

"कृष्णाने करंगळीवर पर्वत सुद्धा उचलला होता. तुम्ही उचलू शकणार काय?", रस्तोगी अंकल म्हणाले.

"नाही! आम्ही सर्वजण मिळून सुद्धा नाही!" एकमुखाने सर्वजण म्हणाले.

"अरे मित्रांनो, भगवान विष्णू यांनी मानवी जन्म घेऊन त्या त्या काळानुसार वागण्याचा आदर्श घालून दिला तरीही त्यांच्या आयुष्यातील घटना या शेवटी त्यांच्या विविध आधीच्या जन्मातील आणि सध्याच्या जन्मातील कर्मांच्या फळानुसार घडल्या. आपण त्यातील चांगल्या त्या गोष्टी घ्यायच्या!"

"तुमच्या बोलण्याने खरंच आमच्या विचारांना एक नवीन दिशा मिळाली!", स्वरा म्हणाली.

अजय म्हणाला, "मी यांना ऐतिहासिक पौराणिक गोष्टी सांगायचो तेव्हा हे सर्वजण मला हसतात, चिडवतात. पण आता त्यांच्या लक्षात आली असेल की जो इतिहास वाचत नाही त्याला इतिहास घडवता येत नाही. इतिहासापासून शिकले नाही तर आपल्या सोबत तो इतिहास पुन्हा पुन्हा घडत राहतो. आणि सर्व पौराणिक कथांमध्ये आपले जीवनाचे सार लपलेले आहे. जीवनातील सर्व समस्यांचे समाधान आपल्याला आपल्या पुराणांमध्ये कोणत्या ना कोणत्या कथेत मिळते!"

आता मात्र सर्व जणांनी अजय साठी टाळ्या वाजवल्या.

"चला झोपा आता! तुम्हाला सकाळी लवकर उठून निघायचे आहे ना. तुमच्या पुढील सुट्ट्या आणि जंगल सफारी एन्जॉय करा गुड नाईट!"रस्तोगी दाम्पत्य म्हणाले.

दिवसभराच्या प्रवासाच्या थकव्याने लवकरच सर्वजण गाढ झोपून गेले.

सकाळी सगळे मित्र जंगलाच्या प्रवेशद्वारावर भेटले. तेथे त्यांची भेट त्यांच्या मार्गदर्शक शिवराज यांच्याशी झाली. शिवराज एक अनुभवी आणि ज्ञानसमृद्ध मार्गदर्शक होते. त्यांनी सर्वांना जंगलातील नियम आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना समजावून सांगितल्या. गाडी एके ठिकाणी पार्क केली.

सर्वांनी हायकिंगची सुरुवात उत्साहाने केली. जंगलातील पायवाटांवरून चालताना त्यांना विविध प्रकारच्या झाडा-फुलांचे दर्शन झाले. अजय आणि मीना जंगलातील फुलांचे फोटो काढण्यात गुंग होत्या, तर करण आणि स्वरा पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात मग्न होते.
अमर आणि पवन विविध प्राणी न्याहाळत होते.

थोडे अंतर चालल्यानंतर शिवराज यांनी सर्वांना विश्रांतीसाठी थांबण्याचे सांगितले. त्यांनी त्या परिसरातील विशेष वनस्पतींची माहिती दिली. अजय आणि मीना त्यांच्या बोलण्यात विशेष रस घेत होते. मीना नेहमीच वनस्पतींच्या अनोख्या गुणधर्मांबद्दल जिज्ञासू असायची.

हायकिंगच्या मध्यावर मित्रांना एक मोठी आनंददायक भेट मिळाली. त्यांना एका जलाशयाच्या काठावर हरिणांचा एक कळप दिसला. हरिणांच्या या कळपाला पाहून सगळेच रोमांचित झाले. अजयने त्याचे कॅमेरा बाहेर काढले आणि हरिणांचे फोटो काढले.

आता प्रवास थोडा कठीण झाला. खडकाळ भागातून चालताना सर्वांनी एकमेकांना मदत केली. एकदा अजयचा पाय घसरला, पण मीनाने त्याचा हात घट्ट धरून ठेवला आणि अजय सावरल्यावर लाजून लगेच तिने हात सोडला. सर्वं मित्रांमध्ये मीना अबोल होती. पण दुपारी नदीच्या काठावर असलेल्या एका झाडाखाली सर्व जण थोडी विश्रांती घेत असताना, व्हॉट्स ॲप ग्रुप वर आलेले जोक्स एकमेकांना सांगून त्यांनी मीना ला हसविण्याचा आणि बोलतं करण्याचा प्रयत्न केला. ती पण हळू हळू खुलली. मोकळं बोलायला लागली.

दिवसाच्या प्रवासाच्या शेवटी, शिवराज त्यांना एका जंगलातील झोपडीवर घेऊन गेले. येथे सर्वांनी थोडी विश्रांती घेतली आणि त्यांच्या ताज्या अनुभवांबद्दल चर्चा केली. दिवसभरात त्यांना लंडनमधली क्लारा फ्लिंट भेटली. ती सुद्धा आठ दिवसांसाठी येथे जंगल सफारी वर आलेली होती. तीसुद्धा एकटी! त्यांच्यात आणि क्लारामध्ये लवकरच मैत्री झाली. विशेष म्हणजे क्लारा ही एक शिव भक्त होती. दर सोमवारी ती लंडन मधल्या वेंबली येथे असणाऱ्या शिव मंदिरात न चुकता शिवलिंगावर जल अर्पण करते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर सुद्धा ती शिव पुराणातील छोट्या छोट्या कथा सांगणारे व्हिडिओ पोस्ट करत असते. विशेष करून अजय सोबत तिची चांगली मैत्री जमली, कारण दोघांची आवड जवळपास सारखी होती.

संध्याकाळी हायकिंगचा प्रवास संपला. सर्व जण आनंदी पण चालून चालून थकलेले होते. पर्यटकांसाठी बनलेल्या विविध सोयींनी युक्त अशा एका भव्य झोपडीतच त्यांनी पुढील सर्व दिवस मुक्काम करायचे ठरवले. त्यांची गाडी जास्त दूर नव्हती. पण झोपडीपर्यंत गाडी आणता येणार नव्हती. तसा रस्ता नव्हता.

रात्री झोपडीत त्यांनी जेवण बनवले. साहित्य झोपडीत आधीच होते. उरलेले त्यांनी शिवराज कडून मागवले. आणि जेवण संपल्यानंतर त्यांचा एक प्लॅन बनवला. खजिना आता शोधायचाच यावर सर्वांचे एकमत झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिवसभर गुफा बघण्यात घालवायचा. पाच वाजेनंतर सर्वांची नजर चुकवून गुहेमध्ये लपून राहायचे असे ठरले. एकदा हिंमत करून हे साहस करायचेच असे सर्वांनी ठरवले.

"मित्रांनी खजिना सापडला तर आपली आयुष्य भराची पैशांची गरज मिटेल!", अमर.

"पण, आपण संकटात सापडलो तर?", मीना.

"आणि जास्त पैशांचा मोह बारा नाही.", पवन.

"हो! नशिबात नसलेले जर मिळवायला गेले तर आपले नुकसान होते!" अमर.

"अरे पण आपण हे फक्त पैशांसाठी करत नाही आहोत. पैसा दुय्यम आहे. एक पौराणिक सत्य जे सर्वजण दंतकथा म्हणून दुर्लक्ष करतात ते खरे आहे हे ठरवण्याची ही एक संधी आहे. विचार करा ही संधी आपल्याला पुन्हा मिळणार आहे का?", अजय.

अजय चे म्हणणे सर्वांना पटले.

"अरे रस्तोगी अंकल यांनी प्राण्यांना मारण्यासाठी सोबत एक आपल्याला बंदूक दिली आहे ना! डोन्ट वरी!", करण.

"पण बंदूक एकच आहे!", स्वरा.

"मग आपण सर्वजण सोबत राहू. मग तर झालं!", अजय.

"पण सोबत पोरींना घेऊन जाणे धोकेदायक आहे. त्यांना इथेच झोपडीत राहू द्या. लागलं तर क्लाराला तुम्ही दोघी आपल्या सोबत झोपडीत घ्या! सकाळी आम्ही परत येतोच!", करण.

"खरं तर तुम्ही दोघीजणी तुम्ही अंकलकडे जास्त सुरक्षित राहाल पण परंतु त्यामुळे त्यांना कळेल की आम्ही खजिना शोधायला रात्री पाच वाजेनंतर गुहेत जातो आहे त्यामुळे ते शक्य नाही!" अजय.

"आम्ही दोघी जणी राहू. क्लाराला घेऊ सोबत!", मीना आणि स्वरा

"अरे, पण तिला विचारा तर खरं आधी!", अमर.

सर्वजण लाराच्या टेंट कडे गेले. ती टेन्ट समोर आकाशाकडे बघत पहुडली होती. तिचा टेंट झोपडी जवळच पाच मिनिटांच्या अंतरावर होता. तिला सर्वांनी त्यांची योजना समजावून सांगितली झाली.

"अरे, आधी इथली दंतकथा काय आहे ते तरी नीट ऐका! आज ती दंतकथा मी शिवराज कडून नीटपणे ऐकली. शिवराज इथल्या गावात राहणाऱ्या नागरिकांपैकी एक! इथल्या गावातील नागरिक पुढारलेले नसले तरी त्यांची निसर्गाशी जवळीक आहे.", अजय म्हणाला.

"अच्छा म्हणजे आज दुपारी तासभर हा अजय आपल्या टीम मधून गायब होता त्याचे रहस्य समजले!", करण म्हणाला.

"हो! मी दुपारी शिवराजच्या घरी गेलो होतो. त्याने मला खजिन्याची कथा सांगितली!"

क्लाराच्या टेंट समोरच्या मोकळ्या अंगणात जमिनीवर सर्वजण खाली बसले आणि अजय ती कथा सांगू लागला. हे दंतकथा कुठेही लिहिलेली नव्हती. इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध नव्हती. विकिपीडियावर सुद्धा नव्हती. पण आसपासच्या गावांमध्ये मात्र ही दंतकथा आवडीने आणि चवीने सांगितली आणि ऐकली जायची.

अजय सांगू लागला, "सृष्टी निर्मितीनंतरच्या सुरुवातीच्या काळात एकदा देव असुर संग्राम सुरू होता. त्यात इंद्र देवाची मदत करण्यासाठी भाग घेतांना तेव्हा भगवान शंकर यांनी त्यांची पंच महाभूत नियंत्रक शक्ती द्रवरूपी काचेत तात्पुरती डमरू मध्ये ठेवली. त्याला डमरू सारखा म्हणजे वाळूच्या घड्याळ सारखा आकार प्राप्त झाला कारण काळ भगवान शंकरांच्या अधीन असतो. समुद्रमंथनाच्या वेळेस अमृत मिळवणे शक्य झाले नाही त्याचा राग मनात ठेवून राहू आणि केतू हे असुरांचे गुरू शुक्राचार्यांकडे गेले. त्यांच्याकडून संजीवनी विद्येच्या आधारे पुन्हा दोघे एकत्र झाले. दोघांचां मिळून एक मोठा सर्प तयार झाला. बहुतेक सर्व देव युद्धात व्यस्त असताना हा राहूकेतू एकत्रित झालेला सर्प सगळ्यांच्या नजरा चुकवून वेगाने भगवान शंकरांच्या डमरू ठेवलेल्या जागी निघाला. शिवाच्या अनेक गणांचा घोळका तिथे आसपास बसलेला होता. त्यांची नजर चुकवून हळूच तो सर्प डमरूकडे खालून वर वेटोळे घालून चढू लागला. त्याने डमरू तोडून त्यातील वाळूच्या घड्याळाच्या आकाराचा पंचमहाभूत नियंत्रक बाहेर काढला. वरच्या बाजूला दोन म्हणजे पृथ्वी आणि अग्नी, खालच्या बाजूला दोन म्हणजे जल आणि वायू व मध्यभागी उरलेल्या जागेत दोन्ही बाजू व्यापून अवकाश तत्व असे पाच स्तर त्यात होते. अवकाश तत्व काळाला नियंत्रित करते. आपल्या वेटोळ्यात त्या नियंत्रकाला घेऊन सर्प हवेत उडून पाताळातील अज्ञात जागी जाण्यासाठी निघाला. एवढ्यात शिवाच्या गणांचे तिकडे लक्ष गेले. ते सर्पाचा पाठलाग करू लागले!"

"व्हॉट हॅपन आफ्टर?", क्लारा उत्सुकतेने पुढे सरसावून विचारू लागली.

"भगवान शंकर त्रिशूळ घेऊन एका राक्षसासोबत लढत होते. त्यांना आपल्या गणांकडून त्याबद्दल कळले. ते राक्षसांसोबत लढाईत व्यस्त असल्याने त्यांनी भगवान विष्णूंना कसेही करून राहू केतू यांना पंचमहाभूत नियंत्रक घेऊन जाण्यापासून रोखण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र त्या दिशेने भिरकावले. सापाचे पुन्हा दोन तुकडे झाले म्हणजे राहू आणि केतू वेगळे झाले. पण त्या सुदर्शन चक्रामुळे त्या पंचपहाभूत नियंत्रकाचे पाच वेगवेगळे गोल तुकडे झाले आणि ते पृथ्वीवर पडले. नंतर त्यांचे हे पाच पर्वत झाले!"

"अरे फारच अदभुत कथा आहे ही!" अमर म्हणाला.

अजय पुढे म्हणाला, "पण काही लोक म्हणतात की ते तुकडे पर्वत बनले नसून या पाचही पर्वतांच्या आत, गुहांमध्ये कुठेतरी गुप्तपणे दडलेले आहेत! आणि त्या तुकड्यांना लपविण्यासाठी हे पर्वत आपोआप तयार झालेत किंवा उगवले!"

"मग याचा खजिन्याशी काय संबंध?", स्वराने विचारले.

"ते पाच तुकडे पाच अमूल्य हिऱ्यांच्या रुपात परावर्तित झाले! तोच खजिना! सोने चांदीचां खजिना नव्हे!"

"आणि मग पँचमॅहाबुत कंट्रोलरचे काय झाले?", क्लारा तोडक्या मराठीत म्हणाली.

"भगवान शंकरांनी असुरांसोबत युद्ध जिंकल्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि विश्वकर्मा यांच्या मदतीने नवीन पंचमहाभूत नियंत्रक बनवून आपल्या तिसऱ्या डोळ्यात बसवले!" अजय.

"म्हणजे आता आपल्याला पाचही गुहेमध्ये लपलेले पाच काचेचे तुकडे शोधावे लागणार!", पवन म्हणाला.

"काचेचे तुकडे नाही, हिरे आहेत ते! अस्सल हिरे! आणि या सर्व दंतकथा आहेत. याबद्दल कोणत्याच पुराणात काहीच लिहिलेले नाही. यात काही भाग खरा असेल, काही भाग लोकांनी जोडला असेल. पण आपण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?"

"हो! तेही खरच आहे!"

"तर मग ठरले तर मग. आपण उद्या पाच वाजेनंतर शोध मोहीम सुरू करूया! प्रत्येक तत्वाच्या गुहेत त्या त्या तत्त्वाचा हिरा सापडेल अशी आपण अशा करूया"

"पण अवकाश गुहेमध्ये तर जायला बंदी आहे!"

"आपण इतर गुहांमधून मार्ग शोधून त्यात नक्की आपण प्रवेश करू! कारण सर्व गुहा एकमेकांशी जोडलेल्या आहेत."

क्लारा म्हणाली, "वुई लेडीज विल अल्सो कम विथ यू! व्हॉट से, स्वारा एंड मीनॅ! दिस इज ऑल सो एक्साईटिंग. वी कांट रेजिस्ट बट टू कम विथ ऑल ऑफ यु"

दोघीजणी सुद्धा क्लाराच्या म्हणण्याला दुजोरा देऊ लागल्या. म्हणजे आता तिन्ही लेडीजसुद्धा मोहिमेत येण्यासाठी आग्रह करू लागल्या. शेवटी सर्वांना ते मान्य करावे लागले.

"थांबा!", तंबूच्या मागच्या बाजूने आवाज आला. सर्वांनी माना वळवून तिकडे बघितले. तो शिवराज होता. त्याच्या हातात एक कंदील होता. केव्हापासून तो सगळ्यांचे बोलणे लपून ऐकत होता.

* * * 
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel