खरी गीर्वाण वाणी
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.

आज तुला निराळयाच गोष्टीविषयीं लिहिणार आहे. राष्ट्रभाषेविषयीं आज थोंडें सांगणार आहे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी; त्याप्रमाणें स्वतंत्र होऊ पाहणा-या हिंदुस्थानला सर्व राष्ट्राची अशी एक भाषा असणें जरूर आहे. त्या त्या प्रांतांतून प्रांतीय भाषा असतीलच, परंतु अखिल भारतीय भाषा हवी.

काँग्रेसचें प्रथम प्रथम सारें कामकाज इंग्रजीतून चाले. इंग्रजी बोलणारे व इंग्रजी जाणणारें यांचा मेळावा तेथें जमे. बहुजनसमाज या सर्व गोष्टींपासून अलग राही. बंगालमधील देशबंधु बंगालबाहेर पडले कीं त्यांना इंग्रजींची कास धरावी लागे. बाबू बिपिनचंद्र पाल यांनी स्वदेशीवरील व्याख्यानांनी मद्रासचा समुद्र किनारा दणाणून सोडला. परंतु इंग्रजी वक्तृत्वानें !

महात्मा गांधीच्या लक्षांत ही गोष्ट आली. सारी जनता काँग्रेसशीं एकरुप करायची असेल तर काँग्रेसचा कारभार सर्व जनतेला समजेल अशा प्रकारे चालला पहिजे. राष्ट्रांचें हृदय एक होण्यासाठी एक भाषा हवी. एक हिंदी सोडली तर सर्व हिंदुस्थानची होण्यास सोपी अशी दुसरी कोणती भाषा आहे?

हिंदुस्थानांतील ब-याचशा प्रांतिक भाषा संस्कृतोध्दव आहेत. हिंदी व उर्दू यांच्यांत पुष्कळ समान शब्द आहेत. संस्कृतोध्दव भाषा बोलणा-यांस हिंदी समजावयास कठीण नाही. प्रश्न होता तो द्रविडी प्रांतांचा. कन्नड, तामिळ, तुलगु, मल्याळम या भाषा बोलणा-यांना हिंदी समजणें कठीण. म्हणून महात्माजींनीं प्रथम त्या प्रांतांतच प्रचार सुरू केला. १९१७ मध्यें इंदूरच्या हिंदी साहित्य संमंलनाचे महात्माजी अध्यक्ष होते. अध्यक्ष होण्यापूर्वी महात्माजींनी, '' हिंदी प्रचारासाठी एक लाख रुपये जमत असतील तर मी अध्यक्ष होतो. '' एक लाख रुपये मिळाले. हिंदी प्रचार समिति स्थापन करण्यांत आली. दक्षिण हिंदुस्थानांत गाजावाजा न करतां तिचे काम सुरूं झालें. आणि हजारो लाखों लोकांनी हिंदीच्या परीक्षा दिल्या.

उद्यांची सर्व राष्ट्राची म्हणून जी हिंदी भाषा होईल तिच्यांत इतर प्रांतीय भाषांतील शब्दांचीहि भर पडणार. मूळची हिंदी अधिक व्यापक व संग्राहक होईल. ती आम जनतेची भाषा होईल. ती सबकी बोली होईल. प्रांतीय हिंदी भाषा ' राष्ट्रभाषा ' या संज्ञेस पोंचेल.

भाषेचें काम हृदयाची ओळख करुन देणें हें आहे. त्या त्या प्रांतीय भाषांनीसुध्दा अखिल हिंदुस्थानची एकता निर्मिण्यासाठीं प्रयत्न करायला हवा. आज आपण अखंड भारत, अखंड भारत असें तोंडानें नेहमीं बोलतों. परंतु या भारताची आपणांस ओळख आहे का? गुजराती भाषेंत, बंगाली भाषेंत, उर्दू भाषेंत, हिंदी भाषेंत, कन्नड, तामिळ, तेलगु, मल्याळम् इत्यादि भाषांतून जें वाङमय आहे त्याची ओळख प्रांतीय भांषानीं आपापल्या लोकांस करून दिली पाहिजे. महाराष्ट्रांतील लोकांस प्रेमचंद, शरच्चं व रवींद्रनाथ थोडेसे माहीत आहेत. परंतु दक्षिणात्यांतील कोण माहीत आहेत? गुजरातेमधील नर्मद, मेघाणी, खबरदार, कलापी, न्हान्हालाल वगैरेंची कितीशी माहिती आहे?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel