मी हिंदुस्थानभर भटकल्ये. किती संकटातून गेले. विश्वभारतीत तुमचा पत्ता लागला. तेथे तुमचा मोठा फोटो पाहिला. किती आनंद झाला तेव्हा. 'भेटले-भेटले' असं मी नाचत म्हटलं. तेथील मंडळींनी मला वेड लागलं आहे असं ठरवलं. मी वेडीच होते. प्रेमवेडी होते. प्रेमवेडी, मुकुंदाची वेडी. '' मीना म्हणाली.

''ते दहा हजार रुपये आणलेस तेव्हा वडील काय म्हणाले? त्यांच्याकडूनच आणलेस, मी समजलो.'' मुकुंदराव म्हणाले.

''मी तुमची वेडी व वडील माझ्यासाठी वेडे. ते रोज गावाबाहेर टेकडीवर जात अन् माझी वाट बघत. 'एक दिवस मिनी येईल' असं म्हणत आणि मला समोर पाहताच रडू लागले. 'आलीस? दया आली पित्याची,' असं म्हणू लागले. मला जायचं आहे लगेच. असं जेव्हा सांगितलं तेव्हा म्हणाले, 'जा; हे सारं तुझं आहे. घेऊन जा.' 'मला दहा हजार रुपये आता द्या' मी म्हटलं. त्यांनी पुडकी आणून दिली. मी निघताना ते म्हणाले, ''मिने, मी आता वाचणार नाही. तू गेलीस म्हणजे तुझ्यासाठी थांबलेले प्राण उडून जातील. ही सारी इस्टेट कोणाला देऊ, सांग.' मी सांगितलं, 'सोनखेडीच्या दयारामच्या आश्रमाच्या नावे करा.' ते म्हणाले, 'बरं, तसं करून कागद पाठवीन.' परंतु त्या दिवशी पावसातून तुम्हाला आणलं. ओळखलं का मला?'' तिने विचारले.

''मला फक्त त्या कित्येक वर्षांपूर्वीच्या गोष्टींची आठवण झाली. मला घेऊन अशीच तू घोडा पळवीत होतीस. मी ओळखलं नाही. परंतु दारापाठीमागे लपून उभी राहिलीस तेव्हा ओळखलं व पळालो. भीतीनं का आनंदानं देवाला माहीत. मी आता डोळे मिटतो. तूही मीट.'' ते म्हणाले.

''मृत्यूला येऊन भेटू दे. आपण उघडेच ठेवू. ओठ बोलू देत. डोळे बघू देत. कान ऐकू देत. माझी खाट जरा जवळ ठेवायला सांगा. म्हणजे हातही हातात राहील. हातात हात घेऊन स्वर्ग चढू म्हणजे पडणार नाही. खरं ना? हसलेत. हसा जरा. मीनेकडे बघून  गोडसं हसा.'' ती म्हणाली.

इतक्यात रामदास आला.

''काय बातमी?'' दयारामने प्रश्न केला.

''पगारवाढ २० टक्के नाही, परंतु १७॥ टक्के मिळाली. तडजोड केली. मागील पगार पूर्वीचाच. उद्यापासून नवीन करार. या पाहा कामगारांच्या विजयगर्जना- 'क्रांती यशस्वी होवो' रामदास म्हणाला.

''मी आता सुखानं मरतो, सुखानं झोपतो.'' मुकुंदराव म्हणाले. मीना व मुकुंदराव दोघांना ग्लानी आली होती.

''हे पाहा माझे बाबा वर चालले. आपल्यापुढे त्या पाहा शांताबाई, ते मोहन. चला, चला.'' मीना जणू वातात बोलत होती.

बाहेर हजारो कामगारांचा समुद्र उचंबळला होता.

''माझी खाट जरा सरकवा ना तिकडे.'' मीना म्हणाली.

रामदासने मीनेची खाट मुकुंदरावांजवळ आणली. मीनेने मुकुंदरावांचा हात घेऊन हातात ठेवला. दोघांचे डोळे मिटले होते. इतक्यात गीता आली. चिमुकली क्रांती तिच्या हातांत होती. तिने ती लहानगी क्रांती मुकुंदराव व मीना यांच्याजवळ नेली.

''क्रांती चिरायू होवो !'' हजारो किसान-कामगार बाहेर गर्जले. मुकुंदराव व मीना यांनी डोळे उघडले. तो त्यांच्याजवळ कोण होते? ती छोटीशी बिटुकली धिटुकली क्रांती. दोघांनी आपले हात क्रांतीच्या अंगावरून फिरविले.

''क्रांती चिरायू होवो.'' दोघांनी क्षीण स्वरात म्हटले.

गीता क्रांतीला घेऊन उभी राहिली. रामदास, दयाराम, अहमद उभे राहिले. मीनेने मुकुंदरावांचा हात अधिकच एकदम बावळट धरला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले व कायमचे डोळे मिटले. चिर-मीलन झाले; चिर-जीवन आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel