कपिलवस्तु नांवाच्या शहरांत इ. स. पूर्वी ६०० वर्षाच्या सुमारास शाक्य नांवाच्या क्षत्रियांचें एक लहानसें महाजनसत्ताक१ (१ निरनिराळ्या क्षत्रिय घराण्यांतील प्रमुख पुरुषांनां महाजन म्हणजे राजा असें म्हणत. हे राजे संथागार नांवाच्या नगरमंदिरांत जमून राज्यकारभार पहात असत. आपणांपैकी एकाला अध्यक्ष निवडीत. त्याला महाराजा असें) राज्य होतें. तेथल्या महाराजांनं राजे अशी संज्ञा होती. या राजांपैकीं शुद्धोदन नांवाच्या एका राजाला दोन बायका होत्या, पहिलीचें नांव मायादेवी व दुसरीचें नांव महाप्रजापती. या दोघी अंजनशाक्याच्या मुली. मायादेवी प्रसूतीसाठीं माहेरीं जात असतां वाटेंतच लुंबिनी नांवाच्या वनांत प्रसूत होऊन तिला जो मुलगा झाला तो पुढें बुद्ध नांवाने प्रसिद्धीस आला. त्याचें नांव सिद्धार्थ असें ठेविलें होतें असें म्हणतात. परंतु त्रिपिटकांत हें नांव माझ्या पाहण्यांत आलें नाहीं; म्हणजे बोधिसत्त्व- म्हणजे भावी बुद्ध- य़ा प्रसिद्ध नांवानेच मी येथें त्याचा उल्लेख करिते. बोधिसत्त्वाच्या जन्मसमयी घडले म्हणून म्हणतात अशा अद्भुत चमत्कारांस त्रिपिटक ग्रंथांत आधार सापडत नाहीं अर्थात या गोष्टी बुद्धचरित्रांत मागाहून सामिल केल्या गेल्या असाव्या हे फार संभवनीय दिसतें.

बोधिसत्त्व जन्मल्यावर त्याला आईसहवर्तमान शुद्धोदन राजानें परत आपल्या घरीं नेलें. तेथें असित नांवाच्या ऋषीनें येऊन हा मुलगा जगदुद्धारक होणार आहे, असें भविष्य कथन केल्याची कथा सुत्तपिटकांतील सुत्तनिपात ग्रंथांत आढळते. मायादेवी बोधिसत्त्वाच्या जन्मानंतर ७व्या दिवशी निवर्तली, यालाही विनयपिटकांतील चुल्लवग्ग ग्रंथांत आधार सापडतो.

तदनंतर घडलेल्या बोधिसत्त्वाच्या विवाहसंस्कारादि गोष्टींचा त्रिपिटक ग्रंथांत कोठें उल्लेख सांपडत नाहीं. तथापि २९ व्या वर्षी जेव्हां बोधिसत्त्वाने गृहत्याग करून अरण्यवास पत्करला त्यावेळी त्याला एक राहुल नांवाचा मुलगा होता असें विनयपिटकांतील महावग्ग ग्रंथांत आलेल्या राहुलाच्या गोष्टीवरून दिसून येतें.

बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाचा१ (१ याला महाभिनिष्क्रमण अशी संज्ञा आहे.) प्रसंग बुद्धचरित्र काव्यादि ग्रंथांतून चमत्कारिक रीतीनें वर्णिला आहे. "त्याच्या बापानें त्याला मोठमोठाले तीन राजवाडे बांधून दिले होते, व तो त्या वाडय़ांतून बाहेर न पडतां चैनीनें कालक्रमण करी. पुढें अकस्मात् त्याला बाहेर फिरावयास जाण्याची इच्छा
म्हणत. या प्रकारची आणखीहि कांही राष्ट्रें उत्तर हिंदुस्तानात होतीं. विशेष माहितीसाठी प्रो. ऱ्हिस डेव्हिड्सचे Buddhist India हें पुस्तक पहावें. उत्पन्न झाली, व तो आपल्या छन्न नांवाच्या सारथ्यासहवर्तमान रथांतून फिरत असतां एक देवता व्याधिग्रस्त, म्हातारा आणि मृत अशीं रूपें अनुक्रमें धारण करून त्याच्या समोर आली. छन्न सारथ्याकडून व्याधिजरामरणाचें उग्र स्वरूप त्याला समजलें, व संसाराविषयीं तीव्र वैराग्य त्याच्या मनांत उत्पन्न झाले. इतक्यांत ती देवता भिक्षुरूप धारण करून पुन: त्याच्या समोर आली, व तिला पाहून त्यानें गृहत्यागाचा दृढ निश्चय केला," इत्यादि गोष्टी आजकाल झालेल्या बुद्धचरित्रांतून सविस्तर वर्णिलेल्या आहेत; आणि आमच्या श्रोत्यांस त्यांचा बराच परिचय असण्याचा संभव असल्यामुळें त्या येथें सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही.

आतां या गोष्टींस त्रिपिटकाचा कांही आधार सांपडतो कीं काय तें पाहूं. बोधिसत्त्वाला राहण्यासाठी तीन राजवाडे होते. याला सुत्तपिटकांतील अंगुत्तरनिकायांत आधार सांपडतो. आपल्या पूर्वस्थितीतील गोष्ट सांगत असतां भिक्षूंला उद्देशून बुद्ध भगवान् म्हणतो:-

"भिक्षु हो, मी फार सुकुमार होतों; माझ्या सुखासाठीं माझ्या पित्यानें तलाव खणून त्यांत नाना जातींच्या कमळिणी लावल्या होत्या. माझीं वस्त्रेंप्रश्नवरणें रेशमी असत. शीतोष्णाची बाधा न व्हावी म्हणून बाहेर निघालों असतां माझ्यावर माझे नोकर श्वेतच्छत्र धरीत असत. हिंवाळ्यासाठीं, उन्हाळ्यासाठीं व पावसाळ्यासाठी माझे निरनिराळे तीन प्रासाद होते. जेव्हां मी पावसाळ्यासाठी बांधलेल्या महालांत राहण्यास जात असें. तेव्हां चार महिने बाहेर न पडता स्त्रियांच्या गीतानें आणि वाद्यानें कालक्रमण करीत असें. इतरांच्या घरीं दासांनां आणि नोकरांनां निकृष्ट प्रतींचे अन्न देतात; पण माझ्या घरीं माझ्या दासदासींनां मिळणारें अन्न म्हटलें म्हणजे मांसमिश्रित उत्तम भात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel