बोधिसत्त्वानें याप्रमाणें गृहत्याग केल्यावर तो राजगृह नगरास गेला. तेथें त्या काली बिंबिसार नावांचा राजा राज्य करीत होता. त्यानें बोधिसत्त्वास भिक्षेसाठी फिरत असतांना पाहिलें. हा कोणी तरी अद्वितीय पुरुष असावा असें त्याला वाटलें व तो जेथें बोधिसत्त्व रहात होता, त्या पांडव नांवाच्या पर्वतावर स्वत: गेला. तेथे बोधिसत्त्वाची भेट घेऊन त्यानें त्याला संन्यास सोडून क्षत्रियधर्म स्वीकारण्यासाठी बराच आग्रह केला. परंतु बोधिसत्त्वाच्या निर्वाण प्रश्नप्त करून घेण्याच्या दृढनिश्चयापुढें त्याचें कांहीं चालले नाहीं. ही कथा सुत्तनिपातांतील पब्बज्जासुत्तांत वर्णिली आहे.

यापुढील बोधिसत्त्वाचें वृत्त मज्झिमानिकायांतील महासच्चक२ (२ महासच्चक सुत्तांतील मजकुराचा संस्कृत अनुवाद ललितविस्तराच्या १६ व्या अध्यायांत आला आहे.) सुत्तांत सांपडतें. त्याचें शब्दश: भाषांतर न देतां सारांश  येथें देतों. सच्चक नांवाचा एक जैन (निर्ग्रन्थ) पंडित वैशाली नगरीत राहत असे. त्याला अग्गिवेरसन असेंहि म्हणत. त्याला उद्देशून बुद्ध म्हणतो:-

‘‘हे अग्निवेस्सन, याप्रमाणें प्रवज्या धारण करून मी घरांतून बाहेर पडलों. परम सुखावग गोष्ट कोणती याचा मी शोध करीत होतों. अनुत्तर श्रेष्ठ शान्तिस्थानाचा पत्ता लावण्यासाठी मी फिरत होतों. अशा समयीं आळार कलामाजवळ जाऊन त्याला मीं म्हटले होतें कीं, ‘आयुष्मन्, तूं या मताप्रमाणें वाग. विद्वान मनुष्य या मताप्रमाणें वागला तर तो आमचें तत्त्व काय आहे हे लवकर जाणूं शकेल.

‘‘लवकरच आळार कलमाचें तत्त्वज्ञान मी शिकलों. वादविवाद करण्यांत मी पटु झालों. ती सारी पोपटपंची होती. दुसरेहि कालामाचे शिष्य माझ्याप्रमाणें पोपटपंचीत प्रवीण होते. या पोपटपंचीनें माझें समाझान झालें नाहीं. मीं माझ्या मनाशी असा विचार केला कीं, केवळ श्रद्धा ठेवल्यानें कालामाला अनुभवज्ञान झालें नसावें. त्याला या तत्त्वज्ञानाचा पूर्ण अनुभव मिळाला असला पाहिजे. तेव्हां मी कालामाजवळ गेलों आणि त्याला असा प्रश्न केला, कीं, ‘भो कलाम, या तत्त्वज्ञानाचा तुला साक्षात्कार कसा झाला?’’ तेव्हा कालामानें मला अकिंचन्यायतन१ (१ या समाधीनें मन वृत्तिशून्य होतें.) नांवाची समाधि शिकविली. तेव्हां मी माझ्याशींच म्हटलें कीं, कालामाला जशी श्रद्धा आहे. तशीच ती मलाही आहे. कालामाला जसा उत्साह आहे, तसाच तो मलाहि आहे. कालामाला जसा विवेक (स्मृति) आहे तसाच तो मलाहि आहे. कालमाला जशी एकामताशक्ति (समाधि) आहे तशीच ती मलाहि आहे. कालामाला जशी प्रज्ञा आहे. तशीच ती मलाहि आहे, तर आळारकालामाप्रमाणें मीहि ह्य़ा धर्माचा साक्षात्कार कां करून घेऊं नये? असा विचार करून, हे अग्गिवेस्सन, थोडक्याच अवकाशात मी आकिंचन्य समाधि साध्य केली. हें वर्तमान जेव्हां मी कालामाला कळविलें, तेव्हां तो मला म्हणाला, ‘‘ज्या समाधीचा मला साक्षात्कार झाला, त्या समाधीचा तुलाहि साक्षात्कार झाला आहे. जें मी जाणत आहे तेंच तूंहि जाणत आहेत. माझी आणि तुझी योग्यता आतां सारखीच आहे. तेव्हां आजपासून तूं आणि मी मिळून या पंथाचे मुख्य होऊं या, व या शिष्यांस शिकवूं या.’’ याप्रमाणें कालामानें माझा बहुमान केला. तो आचार्य व मी शिष्य असें असतां आपल्या योग्य-तेव्हाच त्यानें मला चढविलें. ही अग्गिवेस्सन, या थोरवीनें माझें समाधान झालें नाही, हा कालामाचा धर्मं काहीं निर्वाणप्राप्तीला उपयोगी पडणार नाहीं, याची आकिंचन्यायतनसमाधीपर्यंतच काय ती गति आहे, असें मला वाटूं लागलें, व त्या कालामाच्या पंथांतून मी बाहेर निघालों.

‘‘तद्नंतर मी उद्दक रामपुत्र याजपाशी गेलों. त्यानें मला नैवसंज्ञानासंज्ञायतन१ (१ ही समाधीची शेवटची पायरी.) नांवाची समाधि शिकविली. अल्पावकाशानेंच ही समाधि मला साध्य झाली. हें वर्तमान जेव्हां मी रामपुत्राला कळविलें  तेव्हां त्यानें माझा कालामाप्रमाणेंच सत्कार केला. तो आचार्य आणि मी शिष्य अशी स्थिती असतां, त्यानें मला आपल्या योग्यतेस चढविलें. परंतु एवढय़ानें माझी तृप्ति झाली नाहीं. या रामपुत्राच्या धर्मानें कांही निर्वाणप्रश्नप्ति होणार नाही, याची गति नैवसंज्ञानासंज्ञायतनसमाधीपर्यंतच काय ती आहे, असें मला वाटलें व रामपुत्राला सोडून मी निघालों.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel