अहो मुशाफर, घर सोडुन तुम्ही आला प्रवासामधीं ।
निजा स्वस्थ, थकला असाल कीं पथ चालतां पदीं ॥धृ०॥
चांगुलपणा विशेष अप्रतिम हें वय नूतन असे ।
पती गेले टाकून परदेशीं, येतिल संशय नसे ।
काय जगासी कारण अपला स्वधर्म अपणा दिसे ।
बोलूं नका भलतेंच, भासतें तुम्हां लागलें पिसें ।
इंद्रपदा इच्छुन राज्य करूम म्हणशी स्वलाभमिषें ।
तपसामर्थ्याविण तुल तें प्राप्त होईल कसें ? ।
वाटचे वाटसरू तुम्ही ।
पडतसा व्यर्थ कां भ्रमीं ? ।
राहिला परके आश्रमीं ।
विषयाचे अनुक्रमी लुब्ध होउनी अहो गुणनिधी ।
बरळतसा हें काय गोष्ट घडणार नाहीं जी कधी ॥१॥
जातां गांवावरून अधिं ज्या गृहीं चंद्र पाहिला ।
तें घर चुकलें असाल, येथें व्यर्थ येउन राहिला ।
विषयअंध होऊन बोलतां तरी कसे भलतिला ? ।
मी नाहीं बाहेर निघतां पडियेले दृष्टी कुण्या सवतीला ।
तूर्त आहे माहेरीं, सभवते भाऊबंद चौकीला ।
रात्रंदिवस जपतात उभे न राहूं देती गल्लीला ।
लौकिक वडलांचा आहे ।
येवढाच मोठा संशये ।
न घडे मशिं तुमचा स्नेहे ।
धरून मनामधिं भये चालते लवुन भजुन मी अधीं ।
याउपर मज न कळे कपाळीं काय लिहिलें विधीं ॥२॥
कपाळ फुटकें पुर्वजन्मीचें कोण पाप संग्रहीं ।
असा पणामधें टाकुन गेला तो भ्रतार निर्दयी ।
कोण जिवाची सखी केली असल तिचे आग्रहीं ।
गुंतुनिया वचनास राहिला म्हणुन पडला अशा संशयी ।
किंवा होउन संन्यासी फिरतो अलख म्हणत अक्षई ।
कुळिवंत स्त्रियांच्या रिती ।
स्वामीचरण वंदिती ।
व्यभिचारपणा निंदिती ।
या सुकुळीं निश्चिती निर्मिल्या मर्यादेच्या हादी ।
न भरतां ही आली जवळ वाटते आयुष्याची अवधी ॥३॥
मध्यस्थ घालुन दुसरी भाषणें करितां नाना परी ।
असे स्त्रियांसी फासूं शिकला करुन कवायत बरी ।
यापेक्षां सायास न प्रयत्न उदंड केले जरी ।
घडे प्रीत येकदां पूर्वींच्या ऋणानुबंधें खरी ।
चतुर अढळला म्हणून राहविले दुसरे दिशीं मंदिरीं ।
न कळे उद्यांची घडि काय येईल ह्रदयमंदिरीं ।
कल्पुन तुम्हां इतुके ।
चतुराइ करूं कौतुकें ।
भाषण म्या केलें मुखें ।
आज भोगिला सुखें, असा नाहीं चतुर अढळला कधीं ।
होनाजी बाळा म्हणे, धन्य एक तूं ज्ञानाची निधी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel