सुत्तनिपातांत या सुत्तांतील मजकुराचा म्हणजे चार आर्यसत्यांचा निर्देश द्वयतानुपस्सनासुत्तांत (नं. ३८) आरंभींच आला आहे. बाकी अशोकाच्या लेखांतील मुनिगाथा, मोनयसूते आणि उपतिसपसिने हे तीन धर्मपर्याय अनुक्रमें मुनिसुत्त (नं. १२), नालकसुत्त२(२. ‘मोनयसूते’ हेंच होय (मोनेय्यं ते उपञ्ञिस्सं, ७०१). [संपादक]) (नं. ३७) आणि सारिपुत्तसुत्त३(३. सारिपुत्तालाच उपतिस्स असेंही नांव असे. पहा—Dictionary of Pali Proper Names by Prof. G. P. Malalasekera. [संपादक]) (नं. ५४) हीं सुत्तनिपातांतील सुत्तें आहेत. अलियवसानि आणि अनागतभयानि हीं दोन अंगुत्तरनिकायांत सांपडतात, व लाघुलोवाद हे मज्झिमनिकायांतील अम्बलट्ठिक-राहुलोवादसुत्त (नं. ६१) होय१.( १. ह्या अशोकाच्या शिलालेखांतील उल्लेखासंबंधीं विशेष चर्चा Indian Antiquary Vol. 41, February 1912, P. 37-40 आणि पुरातत्त्व पु. १ नं. ४ यांत सांपडेल. जिज्ञासू वाचकांनीं ते लेख वाचावेत.) म्हणजे सातांपैकी एक सर्वत्र, मज्झिम निकायांत एक, अंगुत्तरांत दोन आणि लहानशा या सुत्तनिपातांत ती सांपडतात; आणि या ती सुत्तांची जी धरती आहे तीच या प्रकरणांतील इतर सुत्तांचीही आहे. यावरून बहुतेक सुत्तनिपात अशोकापूर्वी होता असें अनुमान करण्यास हरकत नाहीं.

खुद्दकनिकायांत निद्देस नांवाचें जें प्रकरण आहे त्याचे महानिद्देस आणि चूळनिद्देस असे दोन विभाग आहेत. महानिद्देस म्हणजे दुसरें कांहीं नसून सुत्तनिपातांतील अट्ठकवग्गावर टीका आहे. आणि चूळनिद्देस खग्गविसाणसुत्तावर व वत्थुगाथाखेरीज करून पारायणवग्गावर टीका आहे. टीकांचा तिपिटकांत समावेश झाला असल्यामुळें ज्यांच्यावर ह्या टीका आहेत ते सुत्तनिपाताचे भाग फारच प्राचीन असले पाहिजेत. त्या भागांशिवाय जीं बाकी सुत्तें आहेत त्यांच्या भाषासरणींत आणि त्या भागांतील सुत्तांच्या भाषासरणींत विशेष फरक नाहीं. ह्यावरूनही सुत्तनिपात फार प्राचीन असला पाहिजे ह्या अनुमानाला अधिक बळकटी मिळते. परंतु या पुस्तकांत जे गद्य भाग आहेत ते मात्र मागाहून दाखल केले असावेत असें वाटतें. त्यांपैकीं बहुतेक ठराविक असून ते इतर निकायांत अनेक ठिकाणीं सांपडतात. त्यांत विशेषनामाचा तेवढा फरक असतो.

पब्बज्जासु्त्त (नं. २७), पधानसुत्त (नं. २८), नाळकसुत्ताच्या वत्थुगाथा (नं. ३७), यांचा बुद्धचरित्राशीं निकट संबंध आहे. त्यासंबंधीं थोडीबहुत चर्चा बुद्धचरित्र लेखमालेंत२ (२. पुरातत्त्व त्रैमासिक, पुस्तक दुसरें, बुद्धचरित्र लेखमाला, लेखांक २, ३ आणि ४ पहा.) येऊन गेली असल्यामुळें पुनरपि येथें विशेष माहिती देण्याची जरूरी वाटत नाहीं. राहुलसुत्तासंबंधानें (नं. २३) मात्र थोडी चर्चा करणें इष्ट वाटतें.

बुद्ध भगवान् गृहत्यागानंतर सात वर्षांनीं कपिलवस्तूला आला, व त्या प्रसंगी राहुलाच्या आईनें त्याला आपलें दायाद्य मागण्यासाठी बुद्धाजवळ पाठविलें. बुद्धानें त्याला विहारांत नेलें व सारिपुत्ताकडून प्रव्रज्या देवविली. तेव्हांपासून राहुल कुमार श्रामणेर झाला. ही कथा महावग्गांत१ (Oldenberg’s Edition P. 82.) व त्याच्या अट्ठकथेंत आली आहे, व तिचा उल्लेख सुत्तनिपाताच्या अर्थकथाकारानेंही केला आहे. आतां असा प्रश्न उपस्थित होतो कीं जर बुद्धानें राहुलाला सात वर्षांचा असतांना प्रव्रज्या दिली, तर हें राहुलसुत्त कधीं उपदेशिलें? प्रव्रज्येपूर्वीं म्हणावें तर सारिपुत्ताचा आणि राहुलाचा ‘अतिपरिचय’ (श्लोक ३३५) झाला होता असें म्हणणें अशक्य आहे. दुसरें “मनाला आवडणारे व उल्लसित करणारे विषय सोडून” इत्यादिक उपदेश बुद्धानें अशा अल्पवयस्क राहुलाला केला असेल हें संभवत नाहीं. प्रव्रज्येनंतर राहुलाला हा उपदेश करण्यांत आला असें म्हणावें, तर ‘श्रद्धापूर्वक घरांतून नीघ’ – या म्हणण्यांत अर्थ राहत नाहीं. तेव्हां या सुत्तावरून असें अनुमान करावें लागतें कीं पुष्कळ वर्षे राहुल गृहस्थाश्रमांत असतांनाच सारिपुत्ताचा शिष्य होता किंवा आजकालची श्रामणेर२ (बौद्धसंघाचा परिचय. पान २०) करून अल्पवयस्कांना विहारांत ठेवण्याची पद्धति त्या वेळीं अस्तित्वांत नव्हती. हें राहुलसुत्त फार प्राचीन असें गृहीत धरलें तर महावग्गांतील आणि अट्ठकथांतील राहुलाची कथा मागाहून रचली गेली असें म्हणावें लागतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel