पहाटेच्या वेळेसच स्टेशनवर रामराव, त्यांची पत्नी व गुणा येऊन पोचली. गाडी परत गेली. गाडीवानास काही बोलू नको असे रामरावांनी सांगितले. गाडीवानाच्याहि डोळ्यांत पाणी आले. रामरावांकडे त्याचे घरोब्याचे संबंध होते. पूर्वीपासून ऋणानुबंध होते. गाडीवानाने परत गाडी हाकली.

इकडे तिघे स्टेशनवर बसली. कोणीहि ओळखीचे भेटू नये असे रामरावांना वाटत होते. दीच एक त्यांची प्रार्थना सुरू होती. गुणा प्लॅटफॉर्मवर हिंडत होता. आकाशांतील थोड्याशा उरलेल्या तेजस्वी व निर्मळ ता-यांकडे तो पहात होता. त्याला जगन्नाथची आठवण येत होती. सकाळी लौकर ये म्हणून त्याने पुन: पुन्हा सांगितले होते. परंतु केवढी निराशा त्या प्रेमळ हृदयाची होईल. घराला कुलूप लागलेले पाहून तो काय म्हणेल? आणि माझे पत्र मिळेल. मिळेल का पण? का त्याच्या दादाच्या हातांत पडेल? दुष्ट आहे त्याचा दादा. त्याने फाडून टाकले तर? जगन्नाथला काहीच कळणार नाही. काय म्हणेल तो! परंतु बाबांची इच्छा आहे काही कळू नये, काही कळवू नये. त्यांची इच्छा प्रमाण.

आतां उजाडले. त्यांनी तोंडे धुतली. उजाडत गाडी होती. थोड्या वेळाने गाडी आली. स्टेशनवर आज हे तीनच जाणारे. तिघे एका डब्यांत बसली. गाडी चालू झाली. जळगावपर्यंतची तिकिटे काढली होती. जळगावला पुढे कुठली तरी काढायची. खानदेश सोडून दूर दूर त्यांना जायचे होते. प्रिय, सुपिक समृद्ध खानदेश! काळ्या काळ्या मातीचा खानदेश! मेहरूणच्या बोरांचा गोड खानदेश! सुंदर कपाशी पिकवणारा खानदेश! काळी काळी माती, आणि तिच्यांत पिकणारा पांढरा पांढरा कापूस! आणि ती उंच ज्वारी! एका कणसांतून अघोलीभर दाणे देणारी ज्वारी! आणि ती धान्याची नयनमनोहर सुकुमार शेते. हिरव्या मृदु गालिच्यावर बारीक शुभ्र फुलांचा गालिचा जणुं. धान्याचा हंगाम असला म्हणजे खानदेशांतील खेड्यांतून कसा घमघमाट सुटलेला असतो! परंतु अशी शेते आता पुन्हा कोठे पाहायला मिळणार? खानदेशांत काय होत नाही? सारे होते. हजारो पल्ले शेंग होते. उडीद होतो, तूर होते, गहू होतो. ममुराबादचा गहूं दिल्लीचा बादशहा नेत असे. इतका तो प्रसिद्ध. येथे संत्री होतात, मोसंबी होतात. येथील पेरू फारच गोड. अंजीर व द्राक्षेहि लोक करू लागले. गावोगाव दाट आमराया, आणि रसाळ केळी! खानदेशी केळी दिल्लीपर्यंत जातात व महाराष्ट्राचा रसाळपणा गाजवतात.

खानदेश निसर्गदृष्ट्याच सुंदर व समृद्ध आहे असे नाही. तापी, गिरणा, पांझरा, पूर्णा वगैरे नद्यांनी खानदेशाच्या भूमीलाच समृद्ध केले असे नाही. येथे बुद्धि व हृदय यांचाहि विकास झाला. जगाला ललामभूत अशी अजिंठ्याची लेणी खानदेशनेच दिली. अजिंठ्याची चित्रकला अनुपम आहे! किती सहजता व उत्कटता तेथील चित्रांत आहे! किती नाजुक छतावरचे नकाशे, डिझाइन्स! आणि प्रख्यात ज्योतिषी भास्कराचार्य या खानदेशचेच. येथे कला फुलल्या, विद्या फुलली. फुलामुलांचे बालकवि झाले! आणि संतांचे पावित्र्य फुलले. ते प्रसिद्ध संत श्रीसखाराममहाराज! झोपडीला काडी लावून दरवर्षी वारीला निघायचे व म्हणायचे मागची चिंता नको! भजन चालू असताना साप आला तरी प्रेमाने भजन चालू ठेवणारे! ज्यांच्या जयजयकाराने सारा खानदेश निनादून जातो! आणि तो शेंदुरणीचा कडू तेली! भजनांत मस्त होऊन जाताना निंबाची फांदी ज्याच्या जोक्यावर जोराने लागली, परंतु ती कडू फांदीच गोड होऊन गेली! संताला मारणार् हात तारणारे होतील! संताजवळ विष न्याल तर ते अमृत होईल! आणि गिरणेच्याच काठी कण्व ऋषींचा आश्रम होता. आणि खानदेशांतील सातपुडयावरच त्या थोर आर्य ऋषीचे-अगस्ति ऋषीचे-स्थान! खानदेशांत राम, लक्ष्मण, सीता राहिली, पांडव राहिले. खानदेशांत चांगदेव नांदला, मुक्ताबाईने मोक्षसुख मिळविले. प्यारा प्यारा खानदेश!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel