“स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्।’ मोक्षाची दारे श्रीकृष्णाने खाडखाड सर्वांसाठी मोकळी केली. स्त्रियांना म्हणे ज्ञानाचा अधिकार नाही. मोक्षाचा अधिकार नाही! श्रीकृष्ण म्हणतो, “चुलीजवळ बसणारी, दळण दळणारी, शेण लावणारी, पाळणा हालविणारी स्त्रीही मोक्षाची अधिकारी आहे.” जी पतीच्या इच्छेत स्वत:ची इच्छा मिळवून टज्ञकते, मुलाबाळांच्या संवर्धनात स्वत:ला विसरते, त्या कर्णयोगी स्त्रीस मोक्ष नाही, तर मग कोण बाबा मोक्षाचा अधिकारी?

समाजाच्या सेवेचे कोणतेही कर्म हाती घ्या. त्याने तुम्ही मुक्त व्हाल. सारे संत ही गोष्ट सांगत आहेत. संत टाळकुट्ये नव्हते. संत आळशी नव्हते. परपुष्ट नव्हते. समाजावर स्वत:चा भार त्यांनी कधीच घातला नाही. कोणताही संत घ्या, कोणते तरी समाजोपयोगी कार्य तो करीत असे. कबीर वस्त्रे विणी, गोरा कुंभार, मडकी भाजी, सावता माळी भाजी देई, सेना न्हावी हजामत करी, जनाबाई दळी, तुलाधार वैश्य वाण्याचा धंदा करी, सजन कसाई खाटकाचा धंदा करी. हे सारे संत मोक्षाचे अधिकारी होते.

कसाई मुक्त कसा, असा कोणी प्रश्न करील. समाजात जोपर्यंत मांस खाणारे लोक आहेत, तोपर्यंत समाजात कसायाचा धंदा करणारे लोक असणारच. तो धंदा समाजाच्या सेवेचाच झाला म्हणावयाचा. कसाईखाने म्युनिसिपालिटीस बांधून द्यावे लागणार. तो कसाई प्राण्याचे हाल न करता त्याला मारील, त्या कसाई-कामातही ज्ञान वापरील, तो मुक्त होईल. तो घाण होऊ देणार नाही. वाटेल तेथे पशुहत्या करणार नाही. लहान मुलाबाळांच्या डोळ्यांआड कोठेतरी ते कर्म करील. कसाई स्वत: मांस खातही नसेल. परंतु पुर्वजांचा धंदा चालत आला आहे, समाजाला तो पाहिजे आहे, तर मग त्या धंद्यात अनभ्यस्त माणसाने पडून पशूंचे अधिक हाल करण्याऐवजी त्या धंद्याचे नीट ज्ञान असणारानेच त्यात पडणे भूतदयेच्या दृष्टीने अधिक श्रेयस्कर आहे. अनासक्त राहून ते काम तो करील.

कसायाप्रमाणेच फाशी देणारा मांगही. समाजात जोपर्यंत फाशीची शिक्षा आहे, तोपर्यंत फाशी देणारे कोणीतरी पाहिजेत. कोणा अनभ्यस्त माणसाने कसातरी वेडावाकडा फास गळ्याला लावून द्यावा व तो दुर्दैवी अपराधी धडपडत अधिक वेळ लोंबकळावा, यात किती दु:ख आहे! फाशी द्यावयाचेच आहे तर त्याला नीट द्या. पटकन फास बसेल व झटकन, फार वेदना न होता, फार हाल न होता प्राण जाईल असे करा. आणि ही गोष्ट त्या कर्मात कुशल असाच मनुष्य करू शकेल. इंग्लंडमध्ये कु-हाडीने डोके तोडावयाचे अशी शिक्षा असे. ज्या वेळेस मोठमोठ्या मोह-यांना ही शिक्षा देण्यात येई, त्या वेळेस मुद्दाम दूरदूरचे कु-हाडवाले बोलावण्यात येत. एका घावासरसे मुंडके सफाईने दूर करील अशाला मुख्यत्वेकरून बोलावून आणीत. हेतू हाच की कैद्याला कमी दु:ख व्हावे.

फाशी देणा-या मांगाने तो फास नीट काळजीपूर्वक दिला, कसायाने पशूला फार त्रास न देता एकदम नीट मारले, तर तो मांग व तो कसाई मुक्त आहेत. दोषी कोणी असेलच तर सारा समाज दोषी आहे.

अशा रीतीने समाजाच्या सेवेची जी जी कर्मे आहेत ती ती करणारे मुक्त होतात, असे गीता-महाभारत सांगत आहेत. त्या त्या कर्माची योग्यता सारखीच; कोणालाही अहंकार नको. मी श्रेष्ठ वर्णाचा म्हणून कोणाची मान फार वर व्हावयास नको. कोणाची मान मी नीच वर्णाचा असे मनात येऊन खाली व्हावयास नको. सर्वांची मान सरळ असू दे. सर्वांची एकच उंची, एकच किंमत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel