सारे मोजूनमापून केले पाहिजे. मोजके खाणे, मोजके पिणे, मोजके बोलणे, मोजके चालणे, मोजकी निद्रा. इंद्रियांना सारे द्यावयाचे, परंतु मोजूनमापून प्रमाणात द्यावयाचे. असे करीत गेल्याने जीवनात प्रसन्नता राहील. ही गोष्ट केवळ काल्पनिक नाही, ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे.

आपण समजा-अधिक जेवलो. भजी आहेत, खाल्ली वाटेल तितकी ; बासुंदी आहे, ओरपली भराभर ; तर काय होईल ? आलस्य येईल. अधिक खाल्ले की अधिक लोळावे लागते. एवढ्याने भागले असे नाही. अपचन होईल, अजीर्ण होईल, पोट दुखेल. कदाचित आजारीही पडण्याचा संभव. क्षणभर जिभेचे सुख अनुभवले, परंतु पुढे दहा दिवस अन्नाची रुची वाटणार नाही. पुढे दहा दिवस काही करता येणार नाही. कोठले कर्म नि कोठले काय !

रात्री गाणे आहे, बसलो दोन वाजेपर्यंत ऐकत. मग झोप पुरी होत नाही. झोप पुरी मिळाली नाही तर पचन नीट होत नाही. दुस-या दिवशी कामही नीट होणार नाही. काम करताना डोळे पेंगू लागतील. अशा प्रकारे कर्मसिद्धी होणार नाही.

ज्याचे जीवन काहीतरी ध्येयासाठी आहे, त्याचे जीवन सेवेसाठी आहे, त्याने म्हणून प्रमाणात सारे केले पाहिजे. प्रमाणात सारी शोभा आहे, प्रमाणात सौंदर्य आहे, संयमात सौंदर्य आहे. संयमाची पुष्कळ अविवेकी लोक टिंगल करतात. आम्हांला ही बंधने नकोत असे ते म्हणतात. परंतु स्वतःस्वतःवर घातलेली बंधने ही बंधने नाहीत. आपल्या लहरीचे गुलाम असणे म्हणजे काही स्वातंत्र्य नाही. स्वातत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे विकास ; आणि संयमाशिवाय विकास नाही.

तुम्ही सर्व सृष्टीत पाहा. सर्वत्र संयम दिसेल. वृक्षच पाहा ना. हा वृक्ष मुळांनी बांधून ठेवलेला आहे. वृक्ष जर म्हणेल, “मी असा पृथ्वीवर काय म्हणून बांधला जाऊ ? उडू दे मला आकाशात, तोडा माझी मुळे”, तर तो मरेल. जर वृक्षाची मुळे तोडली, तर वृक्ष जगेल का ? वृक्ष मुळांनी बांधलेला आहे, म्हणूनच तो उंच जात आहे. म्हणूनच फुले-फळे त्याच्यावर येत आहेत. त्याच्या संपत्तीचे रहस्य त्या दृढ संयमात आहे.

सतार घ्या. सतारील तारा असतात. त्या तारा नुसत्या जमिनीवर ठेवा. त्या तारांवरून बोट फिरवा. त्या तारांतून ध्वनी बाहेर पडणार नाही. त्या तारांतून संगीत बाहेर पडणार नाही. परंतु त्या तार सतारीच्या खुंटीला बांधा, मग त्या बंधनात घातलेल्या तारांतून डोलविणारे संगीत स्रवू लागते. त्या जड तारा चिन्मय होतात. त्यांच्यातून अपरंपार माधुरी पाझरू लागते. संयमातून संगीत प्रकट होते.

नदी पाहा. डोंगरावरील पाणी दाही दिशांस गेले तर त्याचा प्रवाह होणार नाही. परंतु ते पाणी एका विशिष्ट दिशेने जाईल तर त्याचा प्रवाह होईल. प्रवासाला तीरांचं बंधन असते. नदी दोन तटांनी बांधलेली आहे. त्या दोन तीरांतून ती वाहते. मला तीरांच बंधन नको असे जर ती म्हणेल, तर काय होईल ? पाणी सर्वत्र पसरेल व चार दिवसांत ते आटून जाईल. नदीला बंधन आहे म्हणून तिला गती आहे, खोली आहे, गंभीरता आहे. तिला बंधन आहे म्हणूनच ती पुढे पुढे वाढत जाते व महासागराला जाऊन भेटते. तिला बंधन आहे म्हणूनच हजारो एकर जमीन ती सुपीक करते ; सदैव ओलावा देते. नदीला बंधनामुळे अमरता आली आहे. नदीला संयमामुळे सागराची भेट घेता येत असते.

वाफ पाहा. वाफ बंधनात नसेल तर तिला शक्ती नाही. स्वैर संचार करणारी वाफ दुबळी आहे. प्रचंड नळीत बद्ध केलेली वाफ प्रचंड यंत्रे चालविते. मोठमोठ्या आगगाड्या ओढते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel