आपल्या मनात सर्व प्रकारच्या वासनांची बीजे आहेत, परंतु त्यांतील कोणती अंकुरित होऊ द्यावयाची आणि कोणती नाही हे ठरवावयाचे असते. जी बीजे अंकुरीत व्हावयास नको असतील, त्यांना पाणी घातले नाही म्हणजे झाले. ती तशीच पडू द्यावीत. ती मरत नाहीत. ती फार चिवट असतात. परंतु अनेक जन्म जर त्यांना ओलावा न मिळाला, तर मग ती बीजे जळून जातात, मरून जातात.

डोळे हे जुलमी गडे । आग उगा उगा लावु नका

अशी पदे सारखी माझ्याभोवती ऐकू येतील तर माझे ब्रह्मचर्य कसे राहावे? मासिकांतून सारख्या स्त्रैण कथाच येतील तर माझे ब्रह्मचर्य कसे राहावे?  सिनेमांतून मी सारखी चुंबने-आलिंगनेच पाहिन तर माझे ब्रह्मचर्य कसे राहावे? माझ्या आजूबाजूचे सारे वातावरण मला भोगशिक्षण देत असताना, काम-वासनांना उत्तेजन देत असताना, माझे ब्रह्मचर्य कसे राहावे?

बालवाचनालये, छात्रवाचनालये यांची आपणांस अद्याप कल्पना नाही. निरनिराळ्या विषयांस वाहिलेल्या मासिकांची आपणांस कल्पना नाही. आपल्याकडे प्रत्येक मासिकात सारे प्रकार असतात. शास्त्रास वाहिलेले, इतिहासास वाहिलेले, वाङ्मयास वाहिलेले, आरोग्यास वाहिलेले, राजकारणास वाहिलेले, शिक्षणास वाहिलेले, व्यापारास वाहिलेले, खेळास वाहिलेले अशा रीतीची जी मासिके असतील. तीच छात्रवाचनालयांतून हवीत. परंतु  अशी मासिके आहेत कोठे?

निरनिराळ्या विद्यांचे अध्ययन करावयाचे आहे. या शास्त्रांत कामशास्त्रही येईल. परंतु कामशास्त्र म्हणजे चुंबन-आलिंगन-प्रकार नव्हे. मुलानां जननेंद्रियांची माहिती, त्यांची कार्ये, त्यांची निगा, त्यांची स्वच्छता, हे सारे शास्त्रीय दृष्टीने शिकवण्यास हरकत नाही. परंतु हे शास्त्रशुध्द शिक्षण तर मिळत नाही आणि केवळ वासना उसळविणारे व लपंट करणारे शिक्षण मात्र पैसे मिळवू कथालेखकांकडून देण्यात येत आहे. हे कथालेखक म्हणतील, ''आमच्या गोष्टी मुलांच्या हाती देऊ नका. '' बरोबर आहे त्यांचे म्हणणे;  परंतु समाजाचे तिकडे लक्ष नाही. शाळांचे नाही, ग्रंथालये-वाचनालये यांचे नाही, पालकांचे नाही. मुलांचे मन कोणते खाद्य खात आहे, इकडे कोण बघतो? जेथे देहाला कोणते खाद्य द्यावे, सडीक तांदूळ द्यावे की असडीक द्यावे, शास्त्रीय आहार कोणता याचीही चिकित्सा व काळजी नाही, तेथे मनाच्या खाद्याकडे कोण वळतो?

ब्रह्मचर्याश्रमात या सगळ्या गोष्टींचा विचार आहे. मी काय खावे, काय ऐकावे, काय बघावे, काय वाचावे, कसे निजावे, कसे बसावे, केव्हा उठावे वगैरे सर्व  गोष्टींचा विवेकपूर्वक  निश्चय केला पाहिजे. मी जीभ वाटेल तशी सैल सोडली, उत्तेजक पदार्थ खाल्ले, शारीरीक श्रम करीत नसतानाही भजी-कांदे वगैरेंचा भरपूर आहार घेतला तर माझे ब्रह्मचर्य राहणार नाही. मसाले वर्ज्य केले पाहिजेत. तिखटे वर्ज्य केली पाहिजेत. शास्त्र म्हणजे थटटा नाही. ब्रह्मचर्याचे एक शास्त्र आहे. ते पाहिजे असेल तर त्या शास्त्राप्रमाणे वागले पाहिजे. म्हणून महात्माजी नेहमी सांगतात, की ब्रह्मचर्य म्हणजे एकेन्द्रियाचा संयम नव्हे. ब्रह्मचर्य म्हणजे जीवनाचा संयम. ब्रह्मचर्य पाळणे तेव्हाच शक्य होईल. ज्या वेळेस कान, डोळे, जीभ वगैरे सर्वांचे संयमन केलेले असेल. कानांनी शृगांरिक गाणी ऐकणार नाही, डोळ्यांनी शृगांरचित्रे पाहणार नाही, स्त्रियांकडे रोखून पाहणार नाही. वाचन शृगांरिक कथांचे करणार नाही, मसालेदार व उत्तेजक पदार्थांचे सेवन करणार नाही. मऊ, मऊ गाद्यांवर निजणार नाही, इत्यादी व्रते घेतली तरच ब्रह्मचर्य शक्य होईल, एरव्ही नाही.

लोकमान्य टिळक परस्त्री पाहताच खाली मान घालीत. एका स्त्रीचा तीन तास बसून अर्ज लिहून देत असताना त्यांनी त्या स्त्रीकडे पाहिले नाही. लोकमान्यांच्या डोळ्यांत जसे तेज आहे तसे तेज जगातील कोणत्याही महापुरुषाच्या दृष्टीत मी पाहिले नाही, असे नेव्हिन्सन् म्हणाला होता. हे तेज कोठून येते, ब्रह्मचर्याने!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel