६ क्षान्तिपारमिता

उत्साहाबरोबरच क्षमेचा अभ्यास केला नाहीं तर त्याचें त्वरित क्रोधांत परिवर्तन होईल, व त्यायोगें तुम्हास अत्यंत दुःख भोगावें लागेल. कित्येकांना क्रोध आणि उत्साह एकच आहेत असे वाटतें. परंतु तो त्यांचा भ्रम आहे. शूराला कधीं क्रोध येत नसतो, त्याच्या आंगचा उत्साह क्रोधाला तेव्हांच दाबून टाकतो. जो क्रोधाला वश होतो, त्याला शूर म्हणतां यावयाचें नाहीं; कारण शूर अशा दुष्ट मनोविकाराच्या स्वाधीन कसा होईल ? म्हणून खरें शौर्य संपादण्यासाठीं तुम्ही क्षान्तीचा अभ्यास केला पाहिजे ? जर कोणी मूर्खपणानें आपला अपराध केला तर त्याच्यावर रागवण्यानें त्याहिपेक्षां अधिक मूर्खपणा आपण केला असें होईल. म्हणून अशा प्रसंगीं शान्तपणें त्या माणसाचा दोष आपण दाखवून द्यावा; पण त्यावर कधींहि रागावूं नये, किंवा त्याचा द्वेष करूं नये. राग आपोआप येत असतो; पण क्षमा प्रयत्‍नानें संपादावी लागते. तिचा तुम्ही लहानपणापासून अभ्यास केला नाहीं तर पुढें तुम्हास सत्कार्यांत यश येणें फार कठीण होईल. म्हणून क्षमा करण्याची संधि तुम्ही फुकट दवडतां कामा नये.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel