१२३. मैत्रींतच स्वार्थ आहे.
(सुवर्णकक्कटकजातक नं. ३८९)

आमचा बोधिसत्त्व एका जन्मी मगध राष्ट्रांतील ब्राह्मण ग्रामांत जन्मला होता. त्या गावचे सर्व ब्राह्मण आपला निर्वाह शेतीवर करीत असत. बोधिसत्त्व वयांत आल्यावर तोच धंदा करूं लागला. एके दिवशीं पहांटेला उठून तो आपल्या शेतांत गेला. शेतीच्या सीमेवर एक लहानसें डबकें होतें. त्यांतलें पाणी बहुधा आटत नसे. पण तेथें मासे वगैरे रहात नसत. तेवढा एक खेंकडा मात्र पावसाच्या पुरानें तेथें आला व पुढें पुराचें पाणी ओसरून गेल्यावर त्याच डबक्यांत राहिला. बोधिसत्त्व त्या डबक्यांत तोंड धुण्यासाठीं गेला असतां त्याला हा खेंकडा आढळला. खावयास कांहीं न मिळाल्यामुळें खेंकडा अत्यंत दुर्बळ झाला होता. बोधिसत्त्वाला त्याची कींव आली, व त्यानें तोंड वगैरे धुवून त्या खेंकड्याला आपल्या उपवस्त्रांत बांधून शेतांत नेलें, आणि तेथे आपल्या जवळ असलेलें कांहीं फराळाचें खावयास घालून पुनः त्याला आणून त्या डबक्यांत सोडलें. याप्रमाणें रोज बोधिसत्त्व त्या खेंकड्याला कांहीं तरी खाण्याचा पदार्थ आणून देत असे. परंतु त्या डबक्यांतील पाणी हळू हळू आटत जाऊं लागलें. तेव्हां आपणाला कोणी तरी मारून खाईल अशी खेंकड्याला भीति पडली, व आपणाला नदींत नेऊन सोडण्याबद्दल बोधिसत्त्वाला त्यानें विनंती केली. नदी जरा दूर असल्याकारणानें आपलें काम सोडून ताबडतोब तिकडे जातां येणें बोधिसत्त्वाला शक्य नव्हतें. तो म्हणाला, ''बा खेंकड्या, तूं जरा दम धर. या डबक्यांत तूं रहात आहेस अशी कोणाला शंका देखील नाहीं. आणखी दोन चार रोजांत शेतांतील काम संपल्याबरोबर मी तुला नेऊन नदींत सोडतों.''

त्या शेताजवळच एक कावळा आपलें घरटें बांधून रहात असे. त्याच्या बायकोला जिवंत माणसाचे डोळे खाण्याचा डोहळा झाला. तेव्हां ती कावळ्याला म्हणाली, ''आमच्या या घरट्याजवळच्या शेतांत येणार्‍या तरुण ब्राह्मणाचे डोळे खाण्याचा डोहळा मला झाला आहे, तो पूर्ण करा.''

कावळ्यानें तिची समजूत घालण्याचा फार फार प्रयत्‍न केला; पण तें कांहीं जमेना. शेवटीं तो म्हणाला, ''बरें, या कामीं कांही युक्ति असली तर सांग.''

ती म्हणाली, ''येथें आसपास एक कृष्णसर्प रहात असतो, त्याची सेवा करून त्याला तुम्ही वश करून घ्या, व हा ब्राह्मण शेतांत आल्याबरोबर त्याला दंश करावयास लावा. आणि त्यानें असें केले म्हणजे ब्राह्मण भूमीवर पडेल. इतक्यांत त्याचा प्राण जाण्यापूर्वी तुम्ही त्याचे दोन्ही डोळे उपटून घेऊन या.'' कावळ्याला ही मसलत पसंत पडली, व त्यानें दोन दिवसांतच कृष्णसर्पाला प्रसन्न करून घेतलें. बोधिसत्त्वाच्या पायवाटेवर कृष्णसर्प दडून बसला, व कावळा जवळच्या झाडावर बसून बोधिसत्त्व खालीं पडण्याची वाट पहात बसला.

त्या दिवशीं बोधिसत्त्व खेंकड्याला घेऊन आपल्या शेतांतून नदीवर जाण्यास निघाला. इतक्यांत त्या कृष्णसर्पानें त्याला दंश केला. बोधिसत्त्व खालीं पडला, व त्याच्या छातीवर उपरण्यांत गुंडाळलेला तो खेंकडा पडला. बोधिसत्त्व खालीं पडला कसा हें पहाण्यासाठीं खेंकडा हळूच उपरण्यांतून बाहेर निघाला तोंच कावळा येऊन तेथें बसला. या कावळ्याचेंच हें कृत्य असेल असें जाणून आपल्या आंकड्यांत खेंकड्यानें कावळ्याची मानगुटी घट्ट धरली. तेव्हां कावळा का का करून मोठ्यानें ओरडून सापाला म्हणाला, ''मित्रा, या भयंकर प्राण्यानें मला धरलें आहे ! याला दोन शिंगें असून हाडासारखी घट्ट कातडी आहे ? तेव्हां धांवत येऊन मला या संकटांतून सोडव !''

सापानें आपल्या मित्राचे शब्द ऐकून मोठी फणा केली आणि फुत्कार टाकीत खेंकड्याच्या अंगावर धांव घेतली. पण खेंकड्यानें दुसर्‍या आंकड्यांत त्याचीही मानगुटी चिरडली. तेव्हां गयावया करून तो म्हणाला, '' हें काय आश्चर्य आहे बरें ! खेंकडे कावळ्याचें किंवा सापाचें मांस खात नाहींत. मग तूं आम्हां दोघांना कां पकडलेंस ?''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel