६०. निंबाचा रोप.

(एकपण्णजातक नं. १४९)


दुसर्‍या एका जन्मीं बोधिसत्त्व औदिच्य ब्राह्मणकुलांत जन्मला होता. तरुणपणीं कांहीं काल गृहस्थाश्रमाचें सुख भोगल्यावर प्रपंचाला कंटाळून त्यानें हिमालयाची वाट धरली. कांहीं वर्षे हिमालयावर वास केल्यावर खारट आणि आंबट पदार्थ खाण्याच्या उद्देशानें फिरत फिरत तो वाराणसीला आला. रस्त्यांतून भिक्षेसाठीं फिरत असतां त्याची चर्या पाहून वाराणसीचा राजा अत्यंत प्रसन्न झाला आणि आपल्या नोकरांना म्हणाला. ''हा तपस्वी मोठा योगी असावा. त्याला घेऊन राजवाड्यांत या. राजाच्या हुकुमाप्रमाणें बोधिसत्त्वाजवळ जाऊन त्या नोकरांनीं त्याला राजवाड्यांत येण्याची विनंति केली. तेव्हां तो म्हणाला, ''बाबानों, मी राजकुलांत जाणारा तापस नव्हे. राजाची गैरसमजूत झाल्यामुळें त्यानें मला बोलाविलें असलें पाहिजे. मी हिमालयावर राहणारा एक प्रवासी तापस आहे.''

तें वर्तमान त्या नोकरांनीं आपल्या धन्यास कळविलें. तेव्हां राजा म्हणाला, ''माझ्या घरीं येणारा असा दुसरा कोणी तपस्वी नाहीं. ज्या तपस्व्याच्या मागोमाग तुम्ही गेलां त्यालाच मी बोलावतों आहे. मी त्याची चर्या पाहून अत्यंत प्रसन्न झालों आहें असें त्यास सांगा व येथें घेऊन या.''

त्याप्रमाणें त्यांनी बोधिसत्त्वाला मोठ्या, आग्रहानें राजवाड्यांत नेलें. बराच वेळ संवाद झाल्यावर राजा म्हणाला, ''भदंत, ''आपण पुष्कळ वर्षे अरण्यवास केला आहे. आतां आपल्या दर्शनाचा आम्हांला सतत लाभ होईल असें करा.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''पण माझ्यासारख्या तपस्व्याला नगरवास आवडणें शक्य नाहीं. पुष्कळ वर्षे अरण्यांत घालविल्यामुळें मला एकांतवासाची आवड लागली आहे.''

राजा म्हणाला, ''या नगराच्या आसपास माझीं पुष्कळ उद्यानें आहेत. त्यापैकीं एकाद्या उद्यानांत तुम्ही आश्रम बांधून खुशाल रहावें. लोकांकडून कोणत्याहि रीतीनें तुम्हाला उपसर्ग पोचणार नाहीं आणि तुमच्या शांततेचा भंग होणार नाहीं, असा मी बंदोबस्त करतों.''

राजाचा फारच आग्रह पडल्यामुळें एका रमणीय उद्यानांत आश्रम करून बोधिसत्त्व तेथें धर्मचिंतनांत काळ घालवूं लागला.

वाराणसीच्या राजाला एकुलता एकच मुलगा होता. त्याचे फार लाड करण्यांत आल्यामुळें तो अत्यंत द्वाड झाला होता. वडील माणसांचा तो मुळींच बोज ठेवीत नसे. नोकराचाकरांना तर शिव्या दिल्यावांचून सरळपणें तो कधींहि बोलला नाहीं. या त्याच्या असभ्य वर्तनानें राजा फार कंटाळला. त्यानें पुष्कळ गुरु ठेविले; परंतु मुलगा सुधारला नाहीं. शेवटीं उद्यानांत रहाणार्‍या बोधिसत्त्वाची त्याला आठवण झाली व त्याजपाशीं जाऊन तो म्हणाला, ''भदंत, माझ मुलगा फार वाचाळ निघाला आहे. ज्याच्या त्याच्या अंगावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखा तो तुटून पडत असतो. परंतु हें त्याचें वर्तन माझ्या कुळाला अत्यंत लांछनास्पद आहे. आपण कांहीं उपदेश करून माझ्या मुलास ताळ्यावर आणाल तर मजवर अनंत उपकार होतील.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel