१३९. योग्य व्यक्तीशींच याचना करावी.

(दूतजातक नं. ४७८)


आमचा बोधिसत्त्व एका काळीं ब्राह्मणकुलांत जन्मला होता. तारुण्यांत तक्षशिलेला जाऊन वेद-वेदांग, शास्त्र इत्यादिकांचें त्यानें उत्तम प्रकारें अध्ययन केलें. परंतु घरच्या दारिद्य्रामुळें समग्र गुरुदक्षिणा त्याला देतां आली नाहीं. सात मोहरा देणें बाकी राहिलें. तेव्हां गुरूची आज्ञा घेऊन गुरुदक्षिणा मिळविण्यासाठीं तो फिरत फिरत वाराणसीला आला.

त्याकाळचा वाराणसीचा राजा फारच द्रव्यलोभी होता. असें सांगतात कीं, प्रजेच्या हातीं त्यानें एक देखील सोन्याचें नाणें राहूं दिलें नाहीं. या निष्कांचन देशांत बोधिसत्त्वानें मोठ्या प्रयासानें सात मोहरा गोळा केल्या. परंतु गंगा उतरून वाराणसीला येत असतां होडी एकाएकी पालथी होऊन त्याच्या त्या मोहरा पाण्यांत पडल्या. बोधिसत्त्वानें आपला जीवन मोठ्या प्रयासानें बचाविला व तो नदीच्या काठाला आला.

आतां त्याला अशी विवंचना झाली कीं, या निर्द्रव्य प्रदेशांत पुनः सात मोहरा मिळवाव्या कशा ? इतक्यांत त्याला एक युक्ति सुचली व शहराजवळील नदीकाठीं वाळवंटांत तो तसाच उपोषित बसला. पुष्कळ नागरिकांनीं येऊन अन्नग्रहण करावें अशी त्याला विनंती केली. परंतु तो कांहीं बोलेना कीं चालेना. असा असा एक ब्राह्मणकुमार नदीकाठीं बसून उपोषणानें त्रागा करण्यास सिद्ध झाला आहे हें वर्तमान हां हां म्हणतां राजाच्या कानापर्यंत गेलें आणि राजानें गडबडून जाऊन आपल्या अमात्यांना त्याच्या चौकशीस पाठविलें.

त्यांनीं जाऊन बोधिसत्त्वाला नानाप्रकारें प्रश्न विचारिले. परंतु काहीं एक उत्तर न देतां तो तसाच बसून राहिला. हें वर्तमान अमात्यांनीं राजाला कळविलें तेव्हां राजा चिंताक्रांत झाला व स्वतःच बोधिसत्त्वाच्या दर्शनाला गेला, आणि वंदन करून म्हणाला, ''भो ब्राह्मणकुमार, तूं याठिकाणीं प्रायोपवेशन (मरण्याचा नेम) करून बसला आहेस व त्याचें कारण काय हें कोणाला सांगत नाहींस. तुझ्यावर आलेलें संकट असेंच कांही आहे कीं तें कोणालाच सांगतां न यावें?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, जर आपल्यावर संकट आलें तर तें अशा मनुष्याला सांगावें कीं तो त्या संकटाचें निरसन करूं शकेल. परंतु जो मनुष्य भलत्याच मनुष्याला आपल्या दुःखाची कहाणी सांगतो त्याची फजीति होते, त्याचे शत्रू खूष होतात व मित्रांना त्याच्या या मूर्खपणापासून खेद होतो. म्हणून योग्यकाळीं आपलें दुःख शहाण्या मनुष्यानें योग्य माणसालाच योग्य शब्दांनीं सांगावें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel