एका रात्रीं आचार्यानें उशीला कांहींतरी आण असें सांगितलें असतां दुसरें कांहीं न मिळाल्यामुळें त्या तरुण ब्राह्मणानें आपल्या मांडीस उशीला दिलें व सर्व रात्र बसून काढली. हें त्याचें गुरुप्रेम पाहून बोधिसत्त्वानें त्याला आपला मंत्र शिकविला आणि बजावून सांगितलें कीं, सत्याचा अपलाप केल्यास हा मंत्र केव्हांच नष्ट होईल.

ब्राह्मणकुमारानें आपण गुरूच्या वचनाप्रमाणें निश्चयानें वागेन असें अभिवचन देऊन निरोप घेतला व तो फिरत फिरत वाराणसीजवळ आला. तेथें आपल्या मंत्रसामर्थ्यानें अकालीं एका जंगलांतील अंब्याला फळें उत्पन्न करून व तीं विकून तो आपला निर्वाह चालवित असे. राजाच्या उद्यानपालानें एके दिवशीं त्याजकडून फळें विकत घेऊन राजाला अर्पण केलीं. ते अकालिक आंबे पाहून राजा चकित झाला व उद्यानपालाला ते कोठून मिळाले याची त्यानें चौकशी केली. अमूक तमूक ब्राह्मणकुमाराकडून ते मिळाले हें समजल्यावर राजानें आपल्या दुताकडून त्याचा पत्ता काढून त्याला बोलावून नेलें आणि आम्रफलांची प्राप्ति कशी झाजली इत्यादि प्रश्न विचारले. राजदर्शनानें हा तरुण ब्राह्मण जरा घाबरा झाला आणि आपला मंत्र उघडकीस येईल या भीतीनें घोटाळ्यांत पडला. शेवटीं राजानें अभिवचन दिल्यावर मंत्रसामर्थ्यानें आंबे तयार करतो ही गोष्ट त्यानें कबूल केली. तेव्हां राजा त्याला म्हणाला, ''भो कुमार, तूं आजपासून माझ्याच आश्रयाला रहा व मला लागतील तेव्हां आंबे तयार करून दे.'' राजाच्या आदरसत्काराला भुलून जाऊन त्यानें राजाश्रय धरिला व तेव्हांपासून राजाच्या मनाला येईल त्यावेळीं फळें उत्पन्न करून तो राजाला देऊं लागला.

एका उत्सवप्रसंगीं राजानें सर्व नागरिकांनीं तरुण ब्राह्मणाचें मंत्रसामर्थ्य पहाण्यासाठीं राजाच्या बागेंत जमावें अशी शहरांत दौंडी पिटून जाहीर केले. तरुण ब्राह्मणानें नेमलेल्या वेळीं सर्व लोकांसमक्ष अभिमंत्रण केलेलें पाणी एका अंब्याच्या झाडावर फेकून कांहीं पळांत उत्तम आंबे उत्पन्न केले. त्यावेळीं सर्व लोकांनीं 'साधु, साधु' अशा शब्दांनीं त्याचा जयघोष केला. राजानें आपल्या उजव्या हाताला आसन देऊन त्याचा बहुमान केला आणि त्याला असा प्रश्न विचारिला कीं, हा मंत्र तूं कोणत्या आचार्यापासून ग्रहण केलास ? एवढ्या मोठ्या पदावर आरूढ झाल्यामुळें तो तरुण ब्राह्मण आपल्या चांडाळ गुरूला विसरला. नव्हे, त्याला त्याचें नांव सांगण्याची अत्यंत लाज वाटूं लागली. तो म्हणाला, ''महाराज, हा मंत्र मी तक्षशिलेंतील एका प्रसिद्ध ब्राह्मण आचार्यापासून शिकलों आहे.''

हे शब्द त्याच्या तोंडांतून निघाले न निघाले तोंच मंत्राक्षराची स्मृति नष्ट होऊन मंत्र लुप्‍त झाला. मनांतल्या मनांत तो अत्यंत खिन्न झाला. तथापि मानाला भुलून गेल्यामुळें आपली भयंकर हानि त्यानें कोणाला उमगूं दिली नाहीं. काहीं दिवस राजानें केलेल्या बहुमानाचा यथेच्छ उपभोग घेतल्यावर खरी गोष्ट बाहेर पडण्याची वेळ आली. एके दिवशीं राजाला आंबे खाण्याची लहर लागल्याबरोबर तो याला घेऊन उद्यानांत गेला व एका अंब्याच्या झाडाखालीं बसून म्हणाला, ''मित्रा, आज आंबे खाण्याची मला फार इच्छा झाली आहे. तेव्हां मंत्राचा प्रयोग करून या क्षणीं कांहीं आंबे तयार कर.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel