आतां आपण माझ्या दुःखाचें निरसन करण्यास समर्थ आहां असे जाणून तें मी आपणास निवेदन करितों. गुरुदक्षिणा देण्यासाठीं मी मोठ्या कष्टानें सात मोहरा मिळविल्या परंतु होडी उलटल्यामुळें त्या गंगेंत पडल्या. आतां पुनः या अकिंचन राष्ट्रांत मोहरा कशा मिळतील व गुरूच्या ॠणांतून मी कसा मुक्त होईन या विवंचनेंत पडल्यामुळें माझा दुःखोद्वेग मला सहन होत नाहीं म्हणून मी प्रायोपवेशन व्रत स्वीकारलें आहे.

आपल्या नगरवासी लोकांना किंवा सेवकाला माझें दुःख सांगून कांहीं फायदा झाला असता असें नाहीं. कां कीं, ते सर्व निष्कांचन आहेत हें मला ठाऊक आहे. ह्या राज्यांत जो कांहीं सुवर्णसंचय आहे तो आपल्या पाशींच आहे आणि म्हणून आपण या संकटसमयीं मला मदत करूं शकाल. यदाकदाचित् माझी याचना निष्फळ झाली तरी त्याचें मला वाईट वाटणार नाहीं. कां कीं, मी योग्य पुरुषापुढेंच हात पसरला आहे.''

बोधिसत्त्वाच्या भाषणानें राजा प्रसन्न झाला व त्याला त्यानें एकदम चौदा मोहरा देण्याचा हुकूम केला. राजाला आपल्या द्रव्यलोभाबद्दलहि वाईट वाटलें व तेव्हांपासून आपले लोक संपत्तिमान् कसे होतील याची तो काळजी वाहूं लागला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel