२०. सत्कर्में करण्यास भिऊं नये.

(खदिरंगारजातक नं.४०)

दुसरा एक ब्रह्मदत्त राजा वाराणशी नगरींत राज्य करीत असतां बोधिसत्त्व तेथल्या महाश्रेष्ठीच्या कुलांत जन्मला. तो मोठ्या परिवारासह-वर्तमान वृध्दिंगत होऊन सोळा वर्षे होण्यापूर्वीच सर्व कलाकौशल्यांत निपुण झाला. पुढें कांहीं कालानें पित्याच्या मरणानंतर त्याला वाराणशी नगरींतील श्रेष्ठीस्थान (मुख्य व्यापार्‍याची जागा) मिळालें, व त्यानें आपल्या औदार्यानुरूप शहराच्या चारी बाजूस चार, मध्याला एक व आपल्या वाड्याशेजारीं एक अशा गोरगरीबांसाठीं सहा दानशाळा स्थापन केल्या. त्याशिवाय तो शीलाचें रक्षण करीत असे, व उपोसथाच्या दिवशीं उपोसथव्रत पाळीत असे.

एके दिवशीं माध्यान्ह भोजनापूर्वी बोधिसत्त्वाच्या द्वारासमोर एक बुद्ध भिक्षेसाठीं येऊन उभा राहिला. त्याला पाहून बोधिसत्त्व आपल्या आसनावरून उठला व त्याची पूजा करून आपल्या नोकराला त्यानें हांक मारली. नोकरानें 'महाराज काय आज्ञा आहे' असें म्हटल्यावर, बोधिसत्त्व म्हणाला, ''आपल्या दारांत उभा असलेल्या आर्यांचे पात्र घेऊन ये.''

त्याच क्षणीं मारानें तेथें येऊन ऐशीं हात लांबीचा जळणार्‍या कोळशांचा भयंकर खड्डा उत्पन्न केला. प्रत्येक-बुद्धाला भिक्षा मिळूं नये, व श्रेष्ठीच्या पुण्यकर्माला बाध यावी, अशी माराची इच्छा होती; म्हणून त्यानें हा खळगा आपल्या सामर्थ्यानें उत्पन्न केला. भिक्षापात्र आणण्यासाठीं गेलेला मनुष्य खदिरांगार परिंपूरीत अवीचि नरकासारख्या जळजळणार्‍या त्या खड्ड्याकडे पाहून अत्यंत भयचकित होऊन मागें फिरला. बोधिसत्त्वानें त्याला मागें फिरण्याचें कारण विचारलें तेव्हां तो म्हणाला ''धनीसाहेब, आपल्या दरवाजांत भयंकर आगीचा खड्डा उत्पन्न झाला आहे तेथून म्यां कसें जावें ?'' बोधिसत्त्वानें दुसर्‍या कित्येक नोकरांना प्रत्येक-बुद्धाचें भिक्षापात्र आणण्यास पाठविलें परंतु तो आगीचा खड्डा ओलांडून जाण्याचें एकालाहि धाडस झालें नाहीं. ते सर्व भयभीत होऊन पळाले.

तेव्हां बोधिसत्त्व स्वतः प्रत्येक-बुद्धाचें पात्र आणण्यासाठीं गेला व त्या जळणार्‍या खड्डयाच्या कांठावर राहून त्यानें इतस्ततः पाहिलें. अंतराळीं मार उभा होता त्याकडे वळून बोधिसत्त्व म्हणाला, ''तूं कोण आहेस ?'' ''मी मार आहें'' मारानें उत्तर दिलें. ''हा खड्डा तूं उत्पन्न केला आहेस काय ?'' श्रेष्ठीनें विचारिलें. मारानें ''होय.'' असें उत्तर दिल्यावर बोधिसत्त्वानें प्रश्न केला ''हा खड्डा तूं कशासाठीं उत्पन्न केलास ?'' मार म्हणाला, ''तुझ्या दानाला अंतराय व्हावा व प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळूं नये असा माझा उद्देश आहे.'' बोधिसत्त्व म्हणाला ''या खड्डयांतच नव्हे तर भयंकर नरकांत देखील खालीं डोकें आणि वर पाय करून पडण्याला मी तयार आहे, परंतु सत्कृत्यापासून परावृत्त होण्यास मी तयार नाहीं.'' असें बोलून प्रत्येक बुद्धाकडे वळून बोधिसत्त्व म्हणाला ''भदंत, भिक्षेचें ग्रहण केल्यावाचून येथून जाऊं नका.'' असें बोलून बोधिसत्त्वानें आपल्या हातांत अन्नानें भरलेलें ताट घेतलें, व त्या प्रदीप्‍त खड्डयामध्यें उडी टाकली. पण आश्चर्याची गोष्ट ही कीं, त्या अग्नीपासून बोधिसत्त्वाला कांहीच बाधा झाली नाहीं. जूण काय बोधिसत्त्व कमल पुष्पाच्या राशींतूनच चालत गेला, व त्यानें प्रत्येक-बुद्धाचें पात्र अन्नानें भरलें.

साधूंना सत्कर्मांच्या आड येणारीं विघ्नें आनंदच देत असतात ! आगीच्या खाईं फुलाच्या राशींप्रमाणें वाटतात !!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel