नावाडी आशाभूत होऊन घाईघाईनें म्हणाला, ''द्या तर मग.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''बाबारे, तुला जें कांहीं वेतन मागावयाचें असेल तें उतारू परतीरावर असतानांच मागत जा. कांकीं, तेथें उतारूंना या तीराला येण्याविषयीं फार उत्सुकता असते. परंतु इच्छित स्थळीं पोंचल्यावर त्यांचें मन बदलतें व त्यामुळें कलहाला मात्र वाव मिळतो. म्हणून पैसे घेतल्याशिवाय कोणत्याहि उतारूला नांवेंत बसूं देऊं नकोस.''

नावाडी बोधिसत्त्वाचा हा उपदेश ऐकून फार संतापला आणि म्हणाला, ''हेंच काय तुम्ही देणार आहांत तें ? हें मला नको आहे. नुसते शब्द घेऊन काय करावयाचें ?''

त्यावर बोधिसत्त्व म्हणाला, ''एवढ्यानें तुझी तृप्ती होत नसली तर आणखी एक अत्यंत उपयुक्त वस्तू तुला देतों, ती घे. या वस्तूचा तुला सर्व ठिकाणीं उपयोग होण्यासारखा आहे. गांवांत किंवा जंगलांत जळीं किंवा स्थळीं तूं कोणावर रागावूं नकोस आणि माझा हा उपदेश कधींहि विसरूं नकोस. माझ्याजवळ देण्यासारखें म्हटलें म्हणजे एवढेंच धन आहे.''

नावाडी म्हणाला, ''असलें भिकारडें धन घेऊन तूं नावेंत कां बसलास ? असल्या गप्पा सांगणार आहे असें जर मला तूं पूर्वीच सांगितलें असतें तर मी तुला कशाला माझ्या होडींत बसूं दिलें असतें ? पण तुझ्यासारख्या लुच्चा जोगड्याला फुकट जाऊं देणें मोठा अन्याय होय.''

असें म्हणून त्यानें बोधिसत्त्वाला खालीं पाडलें व तो त्याच्या उरावर बसला. इतक्यांत नवमास पूर्ण झालेली नावाड्याची गरोदर स्त्री तंटा कसला चालला आहे हें पाहण्यासाठीं तेथें आली. बोधिसत्त्वाला तिनें ओळखलें आणि आपल्या नवर्‍याला मिठी मारून ती म्हणाली, ''हा जोगी राजाचा गुरू आहे. याला तुम्ही मारूं नका. राजाला हें वर्तमान समजलें असतां तो तुम्हाला भयंकर शासन करील.''

नावाडी म्हणाला, ''आला आहे राजाचा गुरु ! लबाडाजवळ एक कवडी देखील नाहीं ! आणि म्हणे मोठा राजाचा गुरु ! तूं देखील मोठी लबाड दिसतेस. नाहींतर या जोगड्याचा पक्षपात घेऊन माझ्याशीं कां भांडावयाला आली असतीस ?''

असें म्हणून बोधिसत्त्वाला सोडून देऊन तो आपल्या बायकोच्या अंगावर धावला आणि तिच्या उरावर त्यानें जोरानें लाथ मारिली. तेथल्या तेथेंच गर्भपात होऊन ती स्त्री तात्काळ मरण पावली. तेव्हां लोकांनीं अवार्याला पकडून राजपुरुषांच्या हवालीं केलें. राजानें त्याला योग्य शासन केलें; आणि बोधिसत्त्वाला बोलावून आणून तो म्हणाला, ''आचार्य, तुम्ही मला न कळवितां येथून कां गेलांत ? व वाटेंत या भलत्याच संकटांत कां पडलांत ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, उद्यानपालाला मी सांगून ठेविलेंच होतें. माझ्या जाण्यासंबंधानें मी जर तुझ्याशीं बोललो असतों तर माझ्या मार्गांत तूं पुष्कळ विघ्नें आणलीं असतीं. तेव्हां तुला न कळवितां गेलों हें चांगलेंच झालें. परंतु उपदेशाला पात्र कोण व अपात्र कोण याची जाणीव नसल्यामुळें वाटेंत माझी आणि बिचार्‍या अवार्य नावाड्याची दुर्दशा झाली. तुला जसा मी उपदेश करीत असें, तसाच या नावाड्यालाहि त्याच्या कल्याणाचा उपदेश केला. परंतु त्यामुळें झालें काय माझ्या थोबाडींत बसली, नावाड्याची बायको मरण पावली, व बिचारा नावाडी कैदेंत पडला ! तेव्हां माणसानें उपदेश करण्याला पात्रापात्र ओळखणें किती जरूर आहे बरें ! सत्पात्रीं उपदेश केला असतां त्याला चांगलें फळ येतें, आणि असत्पात्री केला असतां त्याला वाईट फळ येतें, हें या माझ्या गोष्टीवरून सिद्ध होत आहे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel