१३३. मातृभक्ति.

(मातिपोसकजातक नं. ४५५)


अनेक जन्मींच्या संसारांत संसरत असतां आमचा बोधिसत्त्व एकदां हत्तीच्या योनींत जन्माला येऊन वयांत आल्यावर मोठ्या गजसंघाचा धुरीण झाला होता. वृद्धापकाळामुळें त्याची आई अंध झाली व हत्तीच्या कळपाबरोबर तिला रानावनांत फिरणें अशक्य झालें. तिला एका सुरक्षित स्थळीं ठेवून बोधिसत्त्व इतर हत्तींबरोबर चांगलीं चांगलीं फळें वगैरे आहाराचे पदार्थ पाठवीत असे. परंतु ते रसलोलूप हत्ती वाटेंतच ती फळें खात असत व बिचार्‍या वृद्ध हत्तीणीच्या वाट्याला पालापाचोळा वगैरे नीरस पदार्थच येत असत.

एकदां आईच्या समाचाराला गेला असतां बोधिसत्त्वाला आपल्या आईची दीनावस्था दिसून आली व त्याचें कारण समजून आल्यावर त्यानें असा निश्चय केला कीं, इतःपर गजसंघाचें नायकत्व सोडून देऊन आपल्या मातेच्या सेवेंत ती जिवंत असेतोंपर्यंत रहावयाचें. त्याचा हा बेत हस्तियूथाला पसंत पडला नाहीं. तथापि तो त्यानें अमलांत आणला.

एके दिवशीं एक वनचर त्या अरण्यांत वाट चुकून इतस्ततः भटकत फिरत असलेला बोधिसत्त्वाच्या पहाण्यांत आला. या अजस्त्र हत्तीला पाहिल्याबरोबर वनचर भयकंपित होऊन पळत सुटला. पण रस्ता बिकट असल्यामुळें त्याला दूर जाता येईना. त्याची अशी गाळण झालेली पाहून बोधिसत्त्व म्हणाला, ''बा मनुष्या, माझ्यापासून तुला भय आहे अशी शंका मनांत आणून इतस्ततः पळूं नकोस. तुझ्यावर कांहीं आपत्ति आली असावी असें मला वाटतें. आणि जवळ येऊन तूं जर मला आपला वृत्तांत सांगशील तर कदाचित या आपत्तीतून तुझा मी उद्धार करूं शकेन.''

वनचरक जवळ जाऊन साष्टांग प्रणिपात करून म्हणाला, ''गजपुंगव, आज सात दिवस मार्ग चुकल्यामुळें मी या अरण्यांत भ्रमण करीत आहें.'' यांतून पार पाडून मला मनुष्यवसतींत नेऊन सोडाल तर मी आपला अत्यंत ॠणी होईन. त्या हस्तिनागानें वनचराला आपल्या पाठीवर बसवून अरण्यांतून पार पाडिला आणि वाराणशीला जाणार्‍या मोठ्या सडकेवर नेऊन ठेविलें.

त्याच वेळीं वाराणशीच्या राजाचा मंगळहस्ती मरण पावला होता व तशा प्रकारचा दुसरा हत्ती मिळणें मुष्कील होतें. राजानें तसा हत्ती मिळवून देणार्‍या मनुष्यास मोठें बक्षिस मिळेल असें सर्व शहरांत भेरी वाजवून जाहीर केलें होतें. द्रव्याच्या लालुचीनें त्या वनचरानें हत्ती पकडणार्‍या राजाच्या माहुतांना बोधिसत्त्वाचें वसतिस्थान दाखवून दिलें.

त्यांनीं बोधिसत्त्वाला घेरून त्याच्यावर शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला. आपणाला वेढणार्‍या सर्व माणसांला तुडविण्याचें सामर्थ्य बोधिसत्त्वाच्या अंगीं असूनहि त्यानें आपल्या गंभीर शांतीचा भंग होवूं दिला नाहीं. तो आपल्या मनाशींच म्हणाला, ''मी क्रोधोन्मत्त झालों तर या सर्वांचा संहार करण्यास विलंब लागणार नाहीं. पण तेणोंकरून मी शीलभ्रष्ट होईन. म्हणून सहनशीलपणानें यांचे प्रहार सोसावे हेंच चांगलें.'' मुख्य माहुतानें बोधिसत्त्वाचीं लक्षणें तेव्हांच ओळखिलीं व तो त्याच्या जवळ जाऊन त्याला मोठ्या प्रेमानें वाराणसीला घेऊन गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel