राजानें आपल्याच उद्यानांत उत्तम पर्णकुटिका बांधून मांडव्याला आणि द्वैपायनाला तेथें ठेऊन घेतलें. परंतु द्वैपायनला कौशांबीच्या जवळपास रहाणें फार आवडत असे. म्हणून तो काशीराजाचा आणि मांडव्याचा निरोप घेऊन कौशांबीला गेला. त्याला पाहिल्याबरोबर मांडव्यगृहस्थानें त्याची योग्य पूजा करून पर्णकुटी झाडून साफसूफ केली आणि आपल्या पत्‍नीच्या मदतीनें तेथें पाण्याची वगैरे व्यवस्था चालविली. द्वैपायनॠषी पर्णकुटिकेंत जाऊन बसल्यावर मांडव्यहि त्याला नमस्कार करून एका बाजूला बसला व द्वैपायनानें वाराणसीला घडलेली सर्व गोष्ट इत्थंभूत सांगण्यास सुरुवात केली.

बाहेरच्या बाजूला यज्ञदत्त नांवाचा मांडव्याचा मुलगा चेंडू घेऊन खेळत होता. त्याचा तो चेंडू उडून एका तृणाच्छादित बिळांत पडला. तो काढण्यासाठीं हात घातला असतां तेथें रहाणार्‍या भयंकर कृष्णसर्पानें यज्ञदत्ताच्या हाताला जोरानें दंश केला. कांहीं पळांत यज्ञदत्ताच्या अंगांत विष चढून तो गतप्राण होऊन पडला. त्याची ओरडाओरड ऐकून मांडव्य, त्याची बायको आणि द्वैपायनॠषी येथें आले. पण यज्ञदत्ताला जिवंत करण्याला सत्यक्रियेवांचून दुसरा इलाज नाहीं असें मांडव्यास दिसून आलें आणि तो म्हणाला, ''भो ॠषिसत्तम, या मुलाला उठविण्यास आतां औषधोपाय चालण्यासारखा नाहीं. तेव्हां आपण सत्यक्रिया करा आणि याला जीवदान द्या.''

द्वैपायन यज्ञदत्ताच्या मस्तकावर हात ठेऊन म्हणाला, ''आज पन्नास वर्षे मी ब्रह्मचर्य पाळीत आहे, परंतु त्यांपैकीं पहिला आठवडाभरच मी तें आनंदानें पाळलें. त्यानंतरचें ब्रह्मचर्य केवळ जबरदस्तीचें होय. या माझ्या सत्यवचनानें यज्ञदत्ताचें विष उतरून तो जिवंत होवो.'' द्वैपायनाच्या सत्यक्रियेनें यज्ञदत्ताचा श्वासोच्छ्वास सुरूं झाला व तो हालचाल करूं लागला. तेव्हां द्वैपायन मांडव्याला म्हणाला, ''मित्रा, तूंहि पण आतां सत्यक्रिया कर म्हणजे हा चांगला बरा होईल.'' तेव्हां मांडव्य आपल्या मुलाच्या मस्तकावर हात ठेऊन म्हणाला, ''मी मोठा दाता आहे अशी सर्वत्र प्रसिद्धी आहे. परंतु संतोषानें मी कधींहि एक पैदेखिल कोणाला दान केलेली नाहीं. आणि संतोषानें मी देत नाहीं. हेंहिपण कोणाला समजून आलें नाहीं. या माझ्या सत्यवचनानें यज्ञदत्ताचें विष उतरून तो जिवंत होवो.'' बापाच्या सत्यक्रियेच्या बळानें यज्ञदत्त उठून बसला. परंतु त्याला उभें राहतां येईना. हें पाहून मांडव्य आपल्या भार्येस म्हणाला, ''भद्रे, तूं देखील आतां सत्यक्रिया कर, म्हणजे आमचा आवडता यज्ञदत्त साफ बरा होईल.'' ती यज्ञदत्ताच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, ''बाळा, तुला चावणारा कृष्णसर्प आणि तुझा पिता या दोघांमध्यें मला माझ्या आयुष्यांत कधींहि फरक वाटला नाहीं. आणि या माझ्या सत्यवचनानें तुझें विष उतरून तूं साफ बरा हो.''

यज्ञदत्त उठून उभा राहिला. आंगांतलें सर्व विष उतरून जमिनींत शिरलें. तिघांनाहि फार आनंद झाला. पण मांडव्य द्वैपायनाला म्हणाला, ''प्रपंचाला कंटाळून ॠषिलोक संसार सोडून जातात असें आम्ही ऐकतों. आणि यदाकदाचित् त्यांचें चित्त अरण्यांत रमलें नाहीं तर ते पुनः गृहस्थाश्रम स्वीकारून रहातात. परंतु आज पन्नास वर्षे तुम्ही ब्रह्मचर्य आचरण करित आहांत तें का ?''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel