१४६. राजाचें पाप प्रजेस फळतें.

(गंडविंदुजातक नं. ५२०)


प्राचीन काळीं कामपिल्य राष्ट्रांत उत्तरपांचाल नावाची मोठी राजधानी होती आणि तेथें पांचाल नांवाचा राजा राज्य करीत असे. लहानपणापासून राजाला योग्य दिशा न लागल्यामुळें तो मोठा चैनी झाला. सिंहासनारूढ झाल्यापासून राज्याचा कारभार पहाण्याचें सोडून देऊन तो अंतःपुरांत रममाण होऊन बसला. अशा निष्काळजी राजाभोवजी तोंडपुजा मंडळींचा घोळका जमावा हें साहजिक आहे. अर्थात् निःस्पृहपणें सल्ला देणार्‍या प्रधानास राजा मिळून पुढें पुढें करणारे लोक अधिकाररूढ झाले. एक पुरोहित तेवढा मात्र साधारण बरा होता. पण राजकारणांत त्याचें अंग कितीसें असणार ! राजाच्या निष्काळजी वर्तनाचा परिणाम लौकरच सर्व राष्ट्राला भोगावा लागला. शेतकर्‍यांना पेरलेल्या शेताचें पीक आपल्या पदरीं पडतें कीं नाहीं याची पंचाईत पडूं लागली. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे सर्व राष्ट्रांत बेबंदशाही माजून राहिली.

त्यावेळीं आमचा बोधिसत्त्व नगराबाहेरील टेंभुरणीच्या झाडावर देवतारूपानें रहात असे. पांचालराजाच्या वडिलापासून या देवदेवतेची पूजा करण्याचा परिपाठ होता. पांचालानेंहि तो क्रम पुढें चालविला. एका उत्सवाच्या दिवशीं देवतेची पूजा करून राजा मोठ्या थाटानें आपल्या वाड्यांत आला. त्या रात्रीं बोधिसत्त्व राजाच्या शयनमंदिरांत प्रवेशला आणि आपल्या तेजानें तें मंदिर त्यानें चकाकून सोडलें. एकदम विलक्षण प्रकाश पडलेला पाहून राजा खडबडून जागा झाला आणि त्या देवतेची मूर्ति पाहून म्हणाला ''या मंदिरांत लहानसहान प्राण्याला देखील प्रवेश होण्याचा संभव नाहीं त्यात तूं प्रवेश कसा केलास ? आणि असें तेजःपुंज शरीर तुला कसें प्राप्‍त झालें ? तूं कोण व येथें येण्याचें कारण काय ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''राजकुलांत ज्याची पूजा होत आहे तोच मी टेंभुरणीवरचा देव आहे. आजपर्यंत तुझे वडील व तूं माझी पूजा केलीस म्हणून तुझ्यावर येणार्‍या भावी विपत्तीचें निरसन करावें हें माझें कर्तव्य आहे असें मीं समजतों. तुझ्या राज्याभिषेकापासून तूं आपल्या प्रजेची हेळसांड केली आहेस व तुझ्या निष्काळजीपणाचें फळ सर्व राष्ट्राला भोगावें लागत आहे. तुझें वर्तन जर सुधारलें नाहीं, तर राज्यकुलावर मोठें संकट ओढवेल म्हणून तुला माझा असा उपदेश आहे कीं, तोंडपुजा लोकांचें न ऐकतां आपल्या प्रजेची स्थिती कशी आहे याचें स्वतः अवलोकन कर व अतःपर प्रजाहित साधण्यांत दक्ष हो असें म्हणून बोधिसत्त्व तेथोंच अंतर्धान पावला.

त्यारात्रीं राजाला नीज कशी ती आली नाहीं. आपल्या प्रमादाचा त्याला अतिशय पश्चात्ताप झाला व सर्व रात्र त्यानें बिछान्यावर तळमळत काढली.

दुसर्‍या दिवशीं पुरोहिताला बोलावून आणून वेष पालटून सर्व राज्यांत फिरण्याचा आपला निश्चय त्यानें त्याला कळविला. पुरोहितहि त्याजबरोबर जाण्यास सज्ज झाला व कोणाला कळूं न देतां वेष पालटून ते दोघेहि बाहेर पडले. नगराबाहेर आल्यावर त्यांनीं खेड्यापाड्यांतून फिरून तेथील लोकांची परिस्थिती सूक्ष्म रीतीनें अवलोकन करण्याचा क्रम आरंभिला. एका खेड्यांत एक म्हातारा आपल्या झोपडीच्या दरवाजापाशी बसून पायांत रुतलेला काटा काढीत होता. हे दोघे त्याच्याजवळ पोहोचले असतां त्यांच्या तोंडून हे उद्‍गार निघाले ''या काट्यानें जें मला दुःख होत आहे तेंच दुःख पांचालराजाला संग्रामांत बाणानें विद्ध झाल्यानें होऊं द्या. तो संग्रामांत पडून मरण पावला ही आनंदाची वार्ता आम्हास कधीं ऐकू येईल !''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel