वाटेंत बोधिसत्त्वाची आणि त्याची गांठ पडली. तेव्हां तो बोधिसत्त्वाला म्हणाला, ''आजपर्यंत मीं असा कधींहीं नागवलों नाहीं. तुम्ही अधिकारावर असाल अशा समजुतीनें मीं पांचशें निवडक घोडे घेऊन विकावयास आलों. परंतु त्या राजाच्या आवडत्या मूर्ख अधिकार्‍यानें त्या घोड्यांची अवघी पावशेर तांदूळ किंमत ठरविली ! म्हणजे दुसर्‍या अर्थी मला राजरोसपणें नागविलें म्हटलें पाहिजे !

बोधिसत्त्व म्हणाला, ''आतां तूं तर नागविलेलाच दिसतोस तथापि मीं सांगतों ती एक युक्ति करून पहा. सुदैवानें तिला यश आल्यास तुला पावशेर तांदूळ घेऊन घरीं जाण्याचा प्रसंग येणार नाहीं. हा नवीन अधिकारी अत्यंत लोभी आहे असें मीं ऐकतों. राजाला जरी तो प्रिय आहे तरी लोकांकडून लांच खाऊन त्यांच्या मालाच्या दामदुप्पट किंमत ठरविण्यास तो मागें पुढें पहात नाहीं. त्याच्या कागाळ्या अद्यापि राजाच्या कानापर्यंत गेल्या नसल्यामुळें आणि लांगूलचालनामध्यें पटाईत असल्यामुळें तो अद्यापि त्या अधिकारावर टिकला आहे. तूं त्याजपाशीं जाऊन त्याला मोठें थोरलें अमिष दाखव पण तो म्हणेल कीं एकवार ठरवलेली किंमत पुनः ठरवितां यावयाची नाहीं. तेव्हां तूं त्याला ह्या पावशेर तांदुळाची किंमत ठरविण्यास सांग. मग तो काय करतो तें पाहूं.''

बोधिसत्त्वाच्या सल्ल्याप्रमाणें तो व्यापारी त्या नव्या अधिकार्‍यापाशीं गेला. आणि त्यानें त्याला मोठ्या बक्षिसाची लालूच दाखवून आपल्या पावशेर तांदुळाची किंमत ठरविण्यास सांगितलें. तोव्हां तो अधिकारी म्हणाला, ''ह्या तांदुळाची किंमत राजेसाहेबांच्या हुकुमावांचून ठरवितां येत नाहीं. परंतु तुम्ही त्यांची परवानगी मिळविली असतां मी तुम्हांला खुष करून सोडीन.''

तेव्हां तो व्यापारी राजाजवळ जाऊन राजाला म्हणाला, ''महाराज, एवढे अमोलिक तांदूळ आमच्या देशांत मुळींच खपण्यासारखे नाहींत. या तांदुळाबद्दल पांचशें घोडे तर राहूंच द्या, परंतु एकादा मेंढा किंवा बकरादेखील कोणी देणार नाहीं. तेव्हां ह्या तांदुळाची विक्री मला येथेंच करणें भाग आहे आपण याची किंमत ठरवून मला आमच्या देशांत खपण्याजोगा दुसरा एकादा जिन्नस देण्याची मेहेरबानी करावी.''

राजानें त्याची विनंति मान्य करून दुसर्‍या दिवशीं दरबारांत त्या तांदुळांची आपल्या नवीन अधिकार्‍याकडून किंमत ठरविण्यांत यावी असा हुकूम केला. पांचशें घोड्यांची पावशेर तांदूळ किंमत ठरविण्यांत आली, व पुनः त्या पावशेरभर तांदुळाची उद्यां किंमत ठरविण्यांत येणार आहे, ही दरबारी बातमी शहरांत पसरण्यास उशीर लागला नाहीं.

दुसर्‍या दिवशीं नवा अधिकारी पावशेर तांदुळाची किंमत काय ठरवितो, हें पाहण्यासाठीं लोकांचे थव्यांचे थवे राजद्वारीं जमले. बोधिसत्त्वहि आपल्या कांहीं मित्रांसह तेथें आला होता.

दरबार भरल्यावर ते तांदुळाचें गाठोडें खाली ठेवून तो व्यापारी राजाला म्हणाला, ''महाराज, आपल्या धान्याच्या कोष्ठागारांतून मिळालेले हे तांदूळ आहेत याची यथायोग्य किंमत ठरविण्याची मेहेरबानी व्हावी.''

राजानें त्या नव्या अधिकार्‍याला त्याची किंमत ठरविण्यास सांगितलें, तेव्हां तो तें गाठोडें हातांत घेऊन म्हणाला, ''महाराज, हे तांदूळ पांचशें घोड्याच्या किंमतीदाखल ह्या व्यापार्‍याला देण्यांत आले आहेत, तरी या तांदुळाची किंमत आसपासच्या गांवासह ही वाराणसी नगरी होणार आहे !''

पावशेर तांदुळाची ठरवलेली ही किंमत पाहून जमलेल्या लोकसमूहांत एकच हंशा पिकला ! कित्येकजण टाळ्या पिटून ''आमच्या राजाला योग्य अधिकारी सापडला'' असें मोठमोठ्यानें ओरडूं लागले. दुसरे कित्येकजण म्हणाले, ''आम्हीं आमची राजधानी अमोलिक समजत होतों. परंतु तिची किंमत पावशेर तांदुळापेक्षां जास्त नाहीं हें आम्हाला आजच समजलें. वाहवा किंमत ठरविणारा !''

राजाला अतिशय लाज वाटली. त्यानें तेथल्यातेथें त्या तोंडपुज्या लोभी अधिकार्‍याला अधिकारावरून दूर करून पुनः तो अधिकार बोधिसत्त्वाला दिला, व बोधिसत्त्वानें ठरविलेली घोड्यांची योग्य किंमत त्या व्यापार्‍याला देऊन त्याचें समाधान केलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel