८. नियमितपणाचा आणि अनियमितपणाचा परिणाम. १

(खारादिय जातक आणि तिपल्लत्थमिग जातक नं. १५, १६)

एके काली बोधिसत्त्व मृगकुलामध्यें जन्माला होता तो मृगमायेंत अत्यंत निपुण होता. त्याच्या दोन बहिणींनीं आपल्या दोन तरुण मुलांना मृगविद्या शिकण्यासाठीं त्याच्या स्वाधीन केलें. पण त्यांपैकीं खारादिया नांवाच्या बहिणीचा मुलगा सात दिवसपर्यंत रोज बोधिसत्त्वानें बोलावल्या वेळीं त्याजपाशीं आला नाहीं. पण दुसर्‍या बहिणीचा मुलगा तिपल्लत्थ हा मामानें नेमून दिलेल्या वेळीं येऊन विद्या शिकत असे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* खारादिय आणि तिपल्लत्थमिग ह्या दोन जातकांच्या आधारें ही गोष्ट लिहिली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
खारादियेचा मुलगा शिकण्याची वेळ चुकवून अरण्यांत भटकत फिरे. एके दिवशीं एका पारध्यानें लावलेल्या जाळ्यांत तो सांपडला व मोठ्यानें आरडाओरडा करूं लागला. आईला ही गोष्ट समजलीं तेव्हां ती धांवत धांवत आपल्या भावाजवळ आली आणी म्हणाली, ''दादा, चार उपदेशाच्या गोष्टी सांगून माझ्या मुलाची कशी तरी सुटका करा.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''खारादिये, तुझ्या मुलाला मीं सातदां वेळेवर येण्यासाठीं बजावून सांगितलें असतां तो मजपाशीं आला नाहीं. त्याला खैर फिरण्याची खोटी संवय लागल्यामुळें मला त्याचें हित करतां आलें नाहीं व आतां तो पाशांत सांपडल्यावर तेथें जाण्यांत कांहीं अर्थ नाहीं. त्याला तर पारधी मारणारच. पण त्याजवळ जाऊन माझ्या जिवाला मात्र मी धोक्यांत घातल्यासारखें होईल.''

खारादिया रडत रडत आपल्या मुलाच्या समाचाराला गेली. पण ती जवळ पोहोंचण्यापूर्वीच पारध्यानें त्याला मारून तेथून उचलून नेलें होतें !

कांही काल लोटल्यावर तिपल्लत्थ जाळ्यात सांपडला. तेव्हां त्याची आई बोधिसत्त्वाला म्हणाली, ''माझ्या मुलाला मी तुझ्या जवळ ठेविलें असतां त्याची ही काय वाट झाली ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''तूं मुळींच घाबरूं नकोस. तुझा मुलगा नियमितपणानें विद्या शिकला आहे. तो शंभर पाशांतूनदेखील मुक्त होऊन येईल. मग ह्या यःकश्चित् पाशाची काय कथा !''

इकडे तो पारधी तेथें येण्यापूर्वी तिपल्लत्थानें आपलें पोट फुगवून, डोळे वटारून आणि हातपाय ताणून मेल्याचें सोंग घेतलें. पारधी तेथें येऊन त्याच्या पोटावर दोनचार टिचक्या मारून व त्याच्या तोंडावाटे निघालेला फेंस पाहून आपणाशींच म्हणाला, ''ह्याला जाळ्यांत सांपडून फार वेळ झाला असावा. आतां याचें मांस तयार करण्याला उशीर लागला तर तें बिघडून जाण्याचा संभव आहे. तेव्हां येथेंच मांस कापून टोपलींत भरून घेऊन जावें हें बरें.''

असें बोलून त्यानें तिपल्लत्थाचे पाश मोकळे केले, व तो आपली सुरी साफ करूं लागला. इतक्यांत तिपल्लत्थ उठून उभा राहिला आणि वातवेगानें पळून जाऊन आपल्या आईला भेटला !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel