८३. मनुष्यांविषयीं वानराचें मत.

(गरहितजातक नं. २१९)


आमचा बाधिसत्त्व एकदां वानरयोनींत जन्मला होता. एका व्याधानें त्याला आपल्या पाशांत पकडून नेऊन वाराणसीच्या राजाला नजर केलें. राजानें त्याला राजवाड्यांत ठेवलें. तो फार नम्रपणें वागत असे; कोणीं जरी चिडविण्याचा प्रयत्‍न केला तरी तो चिडत नसे. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे सर्व मर्कटचेष्टांपासून तो अलिप्‍त होता. राजानें त्याच्या या गुणावर प्रसन्न होऊन त्याला राजवाड्यांत मोकळें सोंडलें. तथापि तो एखाद्या कोपर्‍यांत बसून राही. हें पाहून राजा त्या व्याधास बोलावून आणून म्हणाला ''तूं आणलेल्या या वानरास राजवाड्यांत चैन पडत नाहीं. तो अतिशय सद्गुणी आहे, पण त्याला ही जागा तुरुंगाप्रमाणें वाटत असावी. तेव्हां जेथें याला पकडला होता त्या ठिकाणीं नेऊन सोड.''

व्याधानें बोधिसत्त्वाला पूर्वी पकडलेल्या अरण्यांत नेऊन सोडलें. तेव्हां त्याला पाहून कळपांतील सर्व वानर गोळा झाले, व त्यांनीं त्याचें उत्तम स्वागत केलें. नंतर ते त्याला म्हणाले, ''आपण या संकटांतून कसें पार पडला ?''

बोधिसत्त्वानें घडलेली सर्व हकीगत सांगितल्यावर ते म्हणाले, ''तुम्हांला मनुष्यलोकांत मिसळण्याची उत्तम संधि सांपडली. वाराणसी सारख्या सर्व सुधारणेंत पुढें असलेल्या शहरांत त्यांत देखील राजवाड्यांत- राहण्याला तुम्हांस सांपडलें. तेव्हां तेथील रीत-रिवाजांची कांहीं माहिती सांगाल तर बरें होईल. आम्हांला त्यापासून फार मोठा ज्ञानलाभ होईल.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''जर तुम्हांला ऐकण्याची इच्छा असेल तर मी सांगतों. बाकी सांगण्यासारखें कांहींच नाहीं.''

त्या वानरगणानें बराच आग्रह केल्यानंतर बोधिसत्तव एका दगडावर बसून आसपास बसेलल्या वानर समुदायाला म्हणाला, ''गडे हो, वाराणसीची आपण फार कीर्ति ऐकत आहों. परंतु 'दुरून डोंगर साजरे' अशांतला प्रकार माझ्या अनुभवास आला. ज्याच्या त्याच्या तोंडून पैसा आणि धन याच्याच काय त्या गोष्टी वाराणसीमध्यें ऐकू येतात. प्रत्येक मनुष्य आपल्या धनदौलतींत इतका गढून गेलेला असतो कीं, दुसर्‍याच्या सुखाची त्याला बिलकूल परवा नसते. आम्हाला जर एखादा फळसंपन्न वृक्ष आढळला तर आपल्या जातभाईंना घेऊन तेथें जातों आणि त्यांनाहि लाभलेल्या फळांचे वाटेकरी करतों. परंतु हा प्रकार मनुष्यलोकांत आढळून येत नाहीं. एखाद्याला जर उत्तम औषध माहीत असेल, तर लोकांस समजल्यानें त्याची किंमत कमी होईल या भीतीनें मरेपर्यंत तो तें आपल्या मुलालाही कळवीत नाहीं. एखाद्याला जर ठेवा सांपडला तर तो दुसर्‍याला त्याचा उपभोग घेऊं देत नाहीं. एवढेंच नाहीं तर, मेल्याबरोबर देखील साप होऊन त्या ठेव्यावर बसतो. अशी ही मनुष्यलोकांतील उलट चाल आहे. आणखी त्यांची गृहपद्धतीहि फारच चमत्कारीक आहे. एका घरांत दोन दोन माणसें राहतात. इतर माणसे तेथें राहिलीं तर तीं त्यांचीं चाकर नोकर होऊन राहतात ! या मुख्य दोन माणसांपैकीं एकाला मिशा नसतात; त्याचे स्तन बरेच मोठे असतात; वेणी फणी करून सर्व देह नाना प्रकारच्या अलंकारांनीं त्याने मंडित केलेला असतो; आणि त्याची वटवट सदोदित चालूं असते ! चाकर नोकरांना त्याचा इतका त्रास असतो कीं, कांहीं पुसूं नये ! या या माणसाला मनुष्यलोकांत बायको असें म्हणतात !*
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळगाथा--
हिरञ्ञं मे सुवण्णं मे एसा रत्रिंदिवं कथा ।
दुभ्मेघानं मनुस्सानं अरिधम्मं अपस्सतं ॥
द्वे द्वे गहपतयो गेहे एको तत्थ अमस्सुको ।
लंबत्थनो वेणिकतो अथो अंकितकण्णको ।
कीतो धनेन बहुना सो तं वितुदते जनं ॥
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वानरसमुदाय एवढें भाषण ऐकल्यावर विटून गेला आणि एकदम ओरडून म्हणाला, ''महाराज आतां मनुष्यलोकीचें वर्णन पुरे करा ! आम्हाला त्या माणसांच्या वर्तनापासून कांहीं एक बोध घेण्यासारखा नाहीं. आमची पोरेंबाळें अशा रीतीनें वागूं लागतील तर तीं स्वातंत्र्याला आणि परस्परांतील बंधुप्रेमांला मुकतील व आमच्या वानर जातीवर मोठा अनर्थ कोसळेल ! असें म्हणून सर्व वानर बोधिसत्त्वासह अरण्यांत निघून गेले आणि त्या पाषाणपृष्ठावर बसून मनुष्याचें विलक्षण वर्तन आपल्या ऐकण्यांत आलें म्हणून त्या पाषाणाला त्यांनीं गर्ह्य-पाषाण असें नांव दिलें !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel