पुरोहित ब्राह्मण निरुत्तर झाला व तो आणि राजा पुनः राजधानीला येण्यास निघाले. वाटेंत एक बेडूक कावळ्यांनीं अर्धवट खाल्लेला तळमळत पडला होता. तो या दोघांना पाहून म्हणाला ''माझ्यावर जी विपत्ति आली आहे, तीच विपत्ति पांचाल राजावर येवो. यामध्यें पतन पावून कोल्हे कुत्रे त्याचे असेच लचके तोडोत.'' तें ऐकून पुरोहित म्हणाला ''बा मंडुका मनुष्येतर प्राण्याचें रक्षण करणें हें राजाचें कर्तव्य नव्हें. जर तुला कावळ्यानें त्रास दिला, तर तेणेंकरून आमचा राजा अधार्मिक ठरत नाहीं.'' त्यावर बेडून म्हणाला, ''आपण म्हणतां ही गोष्ट खरी आहे. परंतु जर पांचाळराजाच्या राज्यांत सुबत्ता असती तर कावळ्याला शहरांतील लोकांकडून बलिप्रधान मिळालें असतें आणि तेथेंच कावळ्याची तृप्ति झाल्यामुळें ते येथवर येऊन आमचा नाशास प्रवृत्त झाले नसते. आमच्या राजाच्या गैरवर्तणुकीचेंच पाप माझ्यासारख्या गरीब प्राण्याला भोगावें लागत आहे आणि या गैरवागणुकीला जबाबदार तोच आहे.''

हें बेडकाचें भाषण ऐकून राजा पुरोहिताला म्हणाला, ''माझ्या निष्काळजीपणाचा परिणाम येथवर पोहोंचेल याची मला कल्पना नव्हती. मनुष्यापासून बेडकासारख्या यःकश्चित प्राण्यापर्यंत माझ्या अव्यवस्थित राज्यकारभाराचे परिणाम भोगावे लागत आहेत. हें जर मला पूर्वीच ठाऊक असतें, तर माझ्या हातून प्रजेचें कितीतरी कल्याण झालें असतें. पण गेल्याचा शोक करून उपयोग नाहीं. आतांतरी अत्यंत सावधगिरीनें प्रजापालनांत मी दक्ष राहीन अशी मला आशा आहे.

भाग तिसरा समाप्‍त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel