६५. कांट्यानें काढितात कांटा कीं.

(सुहनु- जातक नं. १५८)


एकदां आमचा बोधिसत्त्व वाराणसी राजाचा मुख्यप्रधान झाला होता. तो राजाचीं सर्व कामें पहात असे. त्याला अश्वपरीक्षा फारच चांगली करतां येत असल्यामुळें दुसर्‍या देशांतून घोडे विकावयास आणले असता तोच त्यांची किंमत ठरवीत असे. राजा जरा धनलोभी होता. बोधिसत्त्वानें ठरविलेली योग्य किंमत त्याला आवडत नसे. एके दिवशीं एक व्यापारी कांहीं घोडे घेऊन वाराणसीला आला. व राजेसाहेबांची भेट घेऊन तें विकत घेण्याची त्यानें विनंति केली. राजानें बोधिसतत्वाला न सांगतां दुसर्‍या एका हांजी हांजी करणार्‍या अमात्याला बोलावून त्या घोड्यांची किंमत करण्यास सांगितली. आणि तो म्हणाला, ''हें पहा, या घोड्यांची किंमत करण्यापूर्वी आमच्या पागेंत महासोण नांवाचा जो मोठा उनाड घोडा आहे त्याला त्या घोड्यांवर सोडून दे. लाथा वगैरे मारून त्यानें त्या घोड्यांला दुर्बल केल्यावर मग त्यांची किंमत कर. अमात्य फारच आज्ञाधारक होता. त्यानें महासोणाला त्या घोड्यांवर घातलें आणि त्यांचे हाल करून मग राजाच्या इच्छेप्रमाणें अगदींच थोडी किंमत ठरवली. बिचारा व्यापारी चकित होऊन गेला ! पहिला चांगला किंमत ठरवणारा प्रधान जाऊन त्याच्याजागीं हा भलताच माणूस कसा आला याचें त्याला फार फार आश्चर्य वाटलें ! परंतु विषाद मानण्यांत कांहींच अर्थ नव्हता. ठरलेली किंमत न घेतां घोडे घेऊन कांहीं फायदा झाला नसता. कारण त्या घोड्यांची इतर ठिकाणीं अधिक किंमत आली असती असें नव्हतें म्हणून मिळालेले पैसे घेऊन तो बोधिसत्त्वापाशीं गेला आणि शोकस्वरानें म्हणाला, ''महाराज, आपण योग्य किंमत देत असता, म्हणून इतक्या दुरून घोडे घेऊन आम्ही येथें आलों; परंतु या खेपेला भलत्याच माणसानें आमची फजिती करून टाकिली.''

बोधिसत्त्व सर्व हकीगत ऐकून घेऊन म्हणाला, ''तुम्ही विषाद न मानतां परत स्वदेशीं जाऊन दुसरा एक खोडसळ घोडा मिळत असला तर पहा व त्याला घेऊन येथें या. इकडे महासोणाला घोड्यांवर घालण्यांत आल्याबरोबर तिकडे त्या खोडसाळ घोड्याला सोडून द्या म्हणजे मग काय गंमत होईल ती पाहूं.''

बोधिसत्त्वाच्या सांगण्याप्रमाणें दुसर्‍या खेपेला तो व्यापारी सुहनु नांवाचा एक भयंकर खोडसाळ घोडा बरोबर घेऊन आला. आणि आपल्या इतर घोड्यांना घेऊन राजाला त्यांची किंमत ठरवण्याची त्यानें विनंती केली. वहिवाटीप्रमाणें महासोणाला त्या घोड्यांच्या अंगावर सोडण्यांत आला तेव्हां त्या व्यापार्‍यानें आपल्या सुहनूला सोडून दिलें. त्या दोघांची गांठ पडल्याबरोबर ते परस्परांचें अंग चाटूं लागले. जणूं काय ते सख्खे भाऊच आहेत असें लोकांना वाटलें ! ते पाहून राजा चकित झाला ! आणि बोधिसत्त्वाला म्हणाला, ''मित्रा, हा आमचा घोडा इतका द्वाड असून त्याचें या आगंतुक घोड्याशीं सख्य कसें जमलें ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज हा नवीन घोडा आमच्या महासोणापेक्षांहि अधिक द्वाड आहे. तेव्हां त्या दोघांची मैत्री जमली यांत मोठें नवल नाहीं. या व्यापार्‍यानें काट्यानेंच काटा काढण्याची ही युक्ती योजिली आहे. महाराज, धनलोभाला वश होणें आपल्यासारख्या राज्यपदारूढ पुरुषाला शोभत नाहीं. अशा रीतीनें दूर देशांतून येणार्‍या व्यापार्‍यांची जर आपण हानी केली, तर ते आमच्या देशांत येणार नाहींत, आणि त्यामुळें आमच्या देशांत पैदा न होणार्‍या वस्तूंची किंमत भलतीकडेच जाईल. म्हणून आपल्या फायद्यासाठीं देखील सत्यानें आणि न्यायानें वागणें हें आम्हा सर्वांस हितकारक आहे.''

बोधिसत्त्वाचा उपदेश ऐकून राजानें धनलोभ सोडून दिला आणि तेव्हांपासून तो न्यायानें वागूं लागला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel