बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आपली गैरसमजूत झाली आहे. हा तापस यथेच्छ खाऊन अजगरासारखा इतस्तः लोळण्यांत सुख मानणारा मनुष्य नव्हे. पूर्वी तो आपल्यासारखा उत्तरेकडील एका प्रदेशाचा राजा होता. तें राज्य आपल्या तरुण मुलांच्या स्वाधीन करून तो माझा अनुयायी झाला. हिमालयावर जे माझे शिष्य आहेत त्यांत हाच प्रमुख होय. आजच तो येथें येऊन पोहोंचला. मार्गांत फार श्रम झाल्यामुळें विश्रांतीसाठी तो जरा ओसरीवर पडला आहे. आतां त्यानें जे उद्‍गार काढिले त्याचें कारण आपल्या लक्षांत आलें नाहीं. जेव्हां तो आपल्या राजवाड्यांत रहात होता तेव्हां आपल्याप्रमाणेंच त्याचे शिपाई त्याचें रक्षण करीत असत आणि तो आपल्या जिवाला धोका न पोहोंचावा म्हणून दुसर्‍या लोकांवर सक्त नजर ठेवीत असे. हांजी हांजी करणार्‍या आणि लांगूलचालन करणार्‍या लबाड धूर्त लोकांनी त्याला घेरलें होतें. आपल्या अंतःपुरांतील स्त्रियांवरदेखील विश्वास ठेवणें त्याला इष्ट वाटत नसे. अशा स्थितींत राजसंपत्ति त्याला विषमय वाटली असल्यास नवल नाहीं. अर्थात् राजवाड्यांतील सुखाला कंटाळून त्यानें त्या बंधनागाराचा त्याग केला; आणि तो हिमालयावर माझ्या आश्रमांत येऊन राहिला. आतां जेव्हां त्यानें आपणाला पाहिलें, तेव्हां आपण अशा राज संपत्तिरूप विपत्तींतून पार पडलों, याची त्याला पुनः एकवार आठवण झाली असावी, व त्यानें ''अहो सुखं, आहे सुखम्'' हे उद्‍गार काढिले असावे.

राजाला बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून फार आश्चर्य वाटलें; व आपण तापसाविषयीं भलतीच कल्पना केली याबद्दल तो खजील झाला. बाहेर जाऊन त्यानें त्या तापसाला वंदन केलें; आणि त्याला त्याचें वृत्त विचारलें. तापसानें आपण राजवाड्यांतील सुखांना कसे कंटाळत गेलों; पण त्यांची संवय झाल्यामुळें त्यांचा पुढे हिमालय पर्वतावरील आपल्या गुरूच्या मोकळ्या आश्रमांत राहूं लागल्यापासून आपणाला किती सुख वाटलें इत्यादि सर्व वृत्तांत राजाला सांगितला; आणि तो म्हणाला, ''महाराज, आज जेव्हां मी हा तुमचा मोठा लवाजमा पाहिला तेव्हां माझ्या राजवाड्यांतील विपत्तीची मला आठवण झाली, व सहजासहजीं 'अहो सुखं, अहो सुखम्' हे उद्‍गार माझ्या तोंडांतून निघाले.''

राजा म्हणाला, ''भो तापस, आपण मला क्षमा करा. मी राज्यसुखांत दंग झाल्यामुळें आपल्यासारख्या सत्पुरुषांची मला पारख करितां येत नाहीं. ज्यानें त्यानें मला मान द्यावा असें मला वाटतें, व जर कांहीं एखाद्या माणसाकडून स्वतंत्रतेचें वर्तन घडलें तर त्याचा मला ताबडतोब तिटकारा येतो. मघाशीं आपण मला पाहून उठलां नाहीं याबद्दल मला राग आला; आणि त्यामुळें आपल्या उद्‍गारांचा मी भलताच अर्थ केला. आपल्या उदारचरिताचा यापुढें माझ्या आचरणावर इष्ट परिणाम होईल अशी मला आशा आहे.''

तापसानें राजाला धर्मन्यायानें राज्य चालविण्याविषयीं उपदेश केला. तेव्हां राजा त्याला वंदन करून निघून गेला.

एक तटस्थ मानसीं । एक सहजची आळशी ॥१॥
दोन्ही दिसती सारखीं । वर्म जाणें तो पारखी ॥२॥
एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोंप ॥३॥
एका सर्वस्वाचा त्याग । एका पोटासाठीं जग ॥४॥
एका भक्ति पोटासाठीं । एका देवासाठीं गांठीं ॥५॥
वर्म पोटीं एका । फळें दोन म्हणे तुका ॥६॥

(तुकाराम)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel