माहुताच्या मुख्यानें दीर्घायूला हस्तिशाळेंत ठेऊन घेतलें. तो पहांटेला उठून वीणा वाजवीत असे, व मंजुळ स्वरानें गायन करीत असे. एके दिवशीं ब्रह्मदत्त राजानें पहांटेस जागा होऊन त्याचें गायन ऐकिलें, व तो आपल्या हुजर्‍यास म्हणाला, ''हस्तिशाळेंत सुंदर विणा वाजवून सुस्वर गायन कोण करितो बरें ?''

हुजर्‍यानें राजाला माहुताच्या आचार्यानें एक तरुण मुलगा ठेविला आहे व तो गात असतो इत्यादि वर्तमान सांगितलें. तेव्हां ब्रह्मदत्तानें ताबडतोब दीर्घायूला बोलावून नेऊन विणा वाजवून गावयास सांगितलें. दीर्घायूनें त्याची आज्ञा शिरसा मान्य करून आपल्या विण्याच्या मदतीनें सुंदर गायन केलें. तेव्हां काशिराजा त्यावर अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाला, ''मुला, तूं आजपासून माझ्याजवळच रहा, व मला गाऊन वगैरे दाखीव.''

त्या दिवसापासून दीर्घायुराजकुमार काशीराजाजवळ राहिला, व आपल्या उत्तम गुणांनीं आणि विनम्र स्वभावानें त्यानें अल्पावधींतच राजाची पूर्ण मर्जी संपादन केली. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे दीर्घायुकुमार राजाचा अत्यंत विश्वासू नोकर बनला.

एके दिवशीं काशीराजा दीर्घायूला बरोबर घेऊन आपल्या इतर नोकरांसहवर्तमान शिकारीला गेला. राजाचा रथ दीर्घायूच हाकीत होता. शिकारीच्या निमित्तानें दीर्घायूने रथ भलत्याच ठिकाणीं नेला. काशीराजा थकून गेल्यामुळें दीर्घायूला म्हणाला, ''मुला, आतां रथ सोड. मला थोडी विश्रांती घेऊं दे.''

तो खालीं उतरून दीर्घायूच्या मांडीवर डोकें ठेऊन झोपीं गेला. राजाला गाढ झोंप लागली हें पाहून दीर्घायूच्या मनांत जुनें वैर जागृत झालें. आपल्या आईबापांला ठार मारणारा वैरी आपल्या मांडीवर डोकें ठेऊन स्वस्थ झोंपी गेला आहे, आणि या वेळीं याचा शिरच्छेद करण्यास याचीच तलवार उपयोगी पडणार आहे, हें पाहून दीर्घायूला त्याचा तात्काळ सूड उगवावा असें वाटलें. परंतु बापानें शेवटीं काढलेल्या उद्‍गारांची त्याला आठवण झाली; आणि ''हे दीर्घायूकुमार ! वैरानें वैर शमत नाहीं, परंतु मैत्रीनेंच वैर शमन पावतें.'' हे शब्द तो आपल्याशींच पुटपुटला. सूड उगवण्याची आलेली उत्तम संधी आणि बापानें केलेला उपदेश या दोन गोष्टींवर त्याचें मन आळीपाळीनें एकसारखें उड्या मारूं लागलें. शेवटीं राजाचा सूड उगवण्यासाठीं त्यानें म्यानांतून तलवार बाहेर देखील काढली. इतक्यांत राजा खडबडून जागा झाला, आणि साशंक दृष्टीनें इकडे तिकडे पाहूं लागला. तेव्हां दीर्घायुकुमार त्याला म्हणाला, ''महाराज, आपण घाबरून गेल्यासारखे दिसतां तें कां ?''

राजा म्हणाला, ''मुला, मीं माझ्या स्वप्नांत कोसलराजाच्या तरूण मुलाला पाहिलें. माझ्या मानेवर त्यानें तलवार ठेविली होती असें मला वाटलें. त्या योगें मी एकाएकीं दचकून जागा झालों !''

दीर्घायु डाव्या हातानें राजाचे केस घट्ट धरून आणि उजव्या हातानें तलवार वर उगारून म्हणाला, ''महाराज ! ज्याच्याबद्दल आपणास दुष्ट स्वप्नें पडत आहेत तोच कोसल राजाचा मुलगा मी आहे, आणि माझ्या आईबापांचा सूड उगवण्यास मी आतां सज्ज झालों आहें !''

ब्रह्मदत्त राजा अगदीं कावरा बावरा होऊन गेला आणि तसाच दीर्घायूच्या पायावर पालथा पडून म्हणाला, ''बा दीर्घायु, मला जीवितदान दे !''

दीर्घायु म्हणाला, ''आपणाला जीवितदान देणारा मी कोण ? माझ्या वडिलांचा प्राणघात करून आणि माझाहि प्राण घेण्याची वाट पहात आहां ! तेव्हां प्रथमतः मलाच आपण जीवदान द्या.''

राजा म्हणाला, ''बा दीर्घायु, तूं मला जीवदान दे आणि मी तुला जीवनदान देतों.'' तेव्हां त्या दोघांनीं हातात हात घालून परस्पराशीं मैत्रीनें वागण्याची शपथ घेतली; आणि राजा रथांत बसून दीर्घायूसह परत आपल्या परिवारांत येऊन मिळाला; व सर्व लवाजम्यासह वाराणसीला आला. तेथें मोठा दरबार भरवून तो आपल्या अमात्यांला म्हणाला, ''जर दीघीतिराजाच्या कुमाराला तुम्ही पाहिलें तर त्याला काय शिक्षा कराल ?''

कांहींजण म्हणाले, ''आम्हीं त्याचे हातपाय तोडून टाकुं;'' तर कांहींजण म्हणाले, ''आम्हीं त्याला ठार मारूं.''

त्यावर राजा म्हणाला, ''हा माझ्या शेजारीं कोसलराजाचा एकुलताएक पुत्र बसला आहे ! परंतु याला कोणत्याहि प्रकारें तुम्ही इजा करतां कामा नये. कां कीं, यानें मला जीवदान दिलें आहे.''

दीर्घायूकडे वळून राजा म्हणाला, ''बा दीर्घायू, वैरानें वैर शमन पावत नाहीं परंतु मैत्रीनेंच वैर शमतें असें तुला पिता मरणसमयीं दोन तीनदां म्हणाला तें कां ?''

दीर्घायू म्हणाला, ''महाराज, पित्यानें हा मला उपदेश केला होता. मी पित्याच्या मागोमाग जात असतां मला पाहून त्यानें हे उद्‍गार काढले. याचा अर्थ एवढाच कीं, मी आपला सूड उगविण्याच्या नादाला लागूं नये. मी जर आपला सूड उगवला असता तर पुनः आपल्या अमात्यांनी किंवा आपल्या संततीनें माझा सूड उगविला असता, आणि अशा रीतीनें आमचें वैर चिरकाल चाललें असतें. माझ्या पित्यानें केलेल्या उपदेशामुळेंच मला आत्मसंयमन करतां आलें. आणि शेंवटीं एकातंवास साधून आपली व माझी मैत्री दृढ करण्याची मला सुसंधी सांपडली.''

राजा दीर्घायूवर अत्यंत प्रसन्न झाला, आणि आपल्या मुलीशीं विवाह लावून देऊन त्यानें पुनः दीर्घायूला कोसल देशाच्या गादीवर बसविलें व जी कांहीं त्याच्या बापाची संपत्ति लुटून आणिली होती ती त्याची त्याला परत केली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel